म्हापसा (गोवा) : दुर्गम क्षेत्रात विकास पोहोचल्यामुळेच तिथे होणाऱ्या नक्षलवादी कारवाया आता कमी झाल्या आहेत असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी केले आहे. गोव्यातील म्हापसा येथे एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. केंद्र सरकारद्वारा सर्वत्र सुरु असलेल्या विकासामुळेच नक्षलवाद व हिंसाचार कमी झाल्याचा दावा अकबर यांनी यावेळी केला.
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ सर्वदूर दुर्गम क्षेत्रातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचाच परिणाम म्हणून अतिदुर्गम क्षेत्रातील नागरिक देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या दुर्गमतेचे व दारिद्र्याचे भांडवल करून नक्षलवाद फोफावला आता प्रत्यक्ष त्या भागात विकास पोहोचायला लागल्यामुळे तेथील नक्षलवाद कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. या भागातील लोकांनी विकास कधी पाहिलाच नव्हता असे अकबर यावेळी म्हणाले.
नरेंंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून केंद्र सरकारने गरीब आणि उपेक्षित जनताच विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रम आखले गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच मोदी सरकारच्या काळात रोजगारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच रोजगार उपलब्ध झाल्यामुळेच लोक समाधानी असून असे झाले नसते तर लोक रस्त्यावर उतरले असते असे अकबर यावेळी म्हणाले.