मुंबई : तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात याव्यात तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (एसटीपी) तत्काळ बसविण्यात यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तळोजा एम.आय.डी.सी.संदर्भात आढावा बैठक पर्यावरण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयीन दालनात पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, पर्यावरण विभागाचे संचालक डॉ. बि. एन. पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक (जल), डॉ. य. बा. सोनटक्के, प्रादेशिक अधिकारी नवी मुंबई, डॉ. अ. ना. हर्षवर्धन, पनवेल एम.आय.डी.सी.चे अधिक्षक अभियंता नितिन वानखेडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कदम म्हणाले, तळोजा एम.आय.डी.सी.मधून मोठ्या प्रमाणावर केमिकल कंपन्यातून सोडण्यात येणारे प्रदुषणयुक्त पाणी कासार्डी नदीमध्ये सोडण्यात येते. यामुळे मोठ्या प्रमाणावर नदी प्रदुषित होत आहे. याचबरोबर आसपासचा परिसर प्रदूषणयुक्त होत आहे. याला आळा घालण्यासाठी प्रदूषणयुक्त सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांनी तत्काळ सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा, याचबरोबर घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी, असेही यावेळी कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. ज्या कंपन्यांमध्ये इटीपी, तसेच एसटीपी यंत्रणा कार्यान्वित नाही अशा कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्यात. तसेच तळोजा एमआयडीसीतील कंपनीमध्ये २५ टक्के पाणी कपात करण्यात यावी. तसेच संबधित ज्या कंपनीकडे या दोन्ही यंत्रणा आहेत त्या कार्यान्वित आहेत की नाही हे तत्काळ तपासून अहवाल सादर करावा, असेही निर्देश पर्यावरण मंत्री यांनी यावेळी दिले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/