शहापूर : शहापूर तालुक्यातील महावितरणच्या कडून गेल्या दिड वर्षात तालुक्यतील ५०४ ग्राहकांवर वीजचोरी अंतर्गत कारवाई करून सुमारे दीड कोटींची वसुली महावितरणे केल्याचे समोर आले आहे. तर या दरम्यान तालुक्यातील ८० गांवे व ७ पाडयातील ६०० आदीवासी बांधवांना सौभाग्य योजनेतून मोफत वीज कनेक्शन दिल्याची माहिती महावितरणचे उपअभियंता अविनाश कटकवार यांनी दिली.
“शहापूर तालुक्यात २२८ गावे व ३६५ पाडयांच्या कार्यक्षेत्रात सामान्य ग्राहक ६९ हजार ९०० इतके असून औद्योगिक ग्राहक १२१,लघु उद्योग ग्राहक १०६० ,पाणीपुरवठा योजना १०२ व ग्रामपंचातयतीच्या ७०० ग्राहकांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. या सर्व ग्राहकांकडून महिन्याला सुमारे १५ कोटी रूपये देयकांच्या माध्यमातून सुमारे ८० ते ९० टक्के वसुली होते. मात्र ही वसुली करताना स्थानिक अधिका-यांचे गोपनिय पथक तयार करून तालुक्यात गेल्या दीड वर्षात वीजचोरी अंतर्गत केलेल्या कारवाईत १ कोटी ४० लाख इतकी दंडासह वसुली एकुण ५०४ ग्राहकांकडून केली.” माहिती उपअभियंता अविनाश कटकवार यांनी दिली.
दरम्यान तालुक्याच्या शहरीकरणाचा विचार करून आमदार पांडुरंग बरोरा यांनी वीज महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून तालुक्यातील जनतेच्या हितासाठी शहरी आणि ग्रामीण असे दोन डिव्हिजन करण्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच महावितरणकडून सबस्टेशन, पोल बदलणे, नवीन विद्युत वाहिन्या टाकणे आदी अनेक विकास कामे सुरू असल्याचेही कटकवार यांनी सांगितले. जर ३ सबस्टेशन व २ डिव्हिजन झाले तर तालुक्यातील ग्राहकांच्या समस्या दूर होतील असा विश्वास उपअभियंता कटकवार यांनी व्यक्त केला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/