पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे युद्धाशिवाय पर्याय नाही, असे मानणारा देशात बहुसंख्यांचा एक गट. दुसरीकडे युद्ध हे कोणत्याही समस्येवरचे समाधान असू शकत नाही, या विचारांसह ‘हे युद्धाचे नव्हे बुद्धाचे युग’ या उक्तीवर विश्वास ठेवणारा दुसरा वर्ग. आज बहुसंख्यांचा आवाज सर्वत्र कानी पडतोय. युद्ध का हवे, याची त्यांनी दिलेली कारणेही योग्यच. पण, मग ‘युद्ध नको’ असे मानणार्या दुसर्या बाजूचे तत्वज्ञान नेमके काय? त्याचे केलेले हे तात्विक चिंतन...
तत्त्वज्ञान हे मानवतेच्या शोधाचे शास्त्र आहे. सत्य, न्याय, शांतता आणि नीतिमूल्यांचा शोध घेणारे. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोपासून ते आधुनिक युगातील गांधीजी आणि दलाई लामांपर्यंत अनेक विचारवंतांनी युद्धाच्या संकल्पनेवर कठोर प्रश्न उपस्थित केले. इतिहासात युद्धे अनेकदा न्यायासाठी, सन्मानासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी लढली गेली असली, तरी तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात पाहिल्यास हे स्पष्ट होते की, युद्ध माणसाच्या समस्यांचे हे खरे उत्तर नाही; उलट ते संकटांना अधिक गहिरे करते. महाभारत युद्ध जरी अत्यंत विनाशकारी असले, तरी त्यामध्ये खोल तत्त्वज्ञान दडलेले आहे. हे युद्ध केवळ दोन घराण्यांमधील संघर्ष नसून, धर्म (न्याय, कर्तव्य) आणि अधर्म (अन्याय, लोभ) यांमधील संघर्ष आहे. हे युद्ध हिंसेचे महत्त्व सांगत नाही, तर ते मानवी जीवनातील नैतिक संघर्षांचे प्रतीक आहे.
बहुतेक नैतिक तत्त्वज्ञान, नीतिमत्तेपासून ते बुद्धांच्या करुणेपर्यंत, प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्गत मूल्यांच्या अस्तित्वावर आधारित आहेत. तथापि, युद्धात मात्र माणसांना शत्रू, लक्ष्य किंवा बळी बनवले जाते. युद्धात मानवी जीवनाचे मूल्य संपते आणि माणसाचे अस्तित्व केवळ राजकीय यंत्रणेच्या उपयोगासाठीच उरते. अमूर्त ध्येये, राष्ट्राभिमान किंवा राजकीय सत्तेसाठी मानवी जीवनाचे बलिदान दिले जाते.
सॉक्रेटिसने विचार मांडला की, कोणतीही समस्या चर्चेतून सोडवली जाऊ शकते. युद्ध म्हणजे मानवी संवादाचे पूर्णपणे अपयश! जेव्हा देश किंवा समाज आपापसांत बोलणे थांबवतात, तेव्हा युद्ध उगम पावते. तत्त्वज्ञानाने नेहमी शांतीचा, समजुतीचा आणि चर्चेचा मार्ग सूचवला आहे. युद्धातून आलेला निर्णय कधीच स्थायिक राहात नाही. संवाद हे मानवतेचे खरे साधन आहे.
युद्ध मूळ समस्यांवर उपाय करत नाही. तत्त्वज्ञान आपल्याला नेहमी वरवरच्या थरावरील लक्षणांपेक्षा मूळ कारणांकडे पाहायला शिकवते. युद्ध एका संघर्षाचे भौतिक उत्तर असू शकते, पण ते मूळ कारणे म्हणजे अन्याय, विषमता, शोषण, अज्ञान यांवर उत्तर देत नाहीत. उलट, युद्धामुळे या समस्या अधिकच तीव्र होतात. युद्धानंतर जो शांततेचा काळ येतो, तो अनेकदा सूडभावनेने भरलेला असतो आणि त्यामुळे पुन्हा नव्या संघर्षांची बीजे पेरली जातात. बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मांमध्ये कर्मसिद्धांत आहे. म्हणजे प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया असते. युद्ध ही एक अत्यंत हिंसक कृती आहे आणि त्यातून जन्मते दुसरी हिंसा, सूड, अराजकता. फ्रेंच तत्त्वज्ञ सिमोन वेल किंवा अस्तित्ववादी लेखक अल्बेर कामू यांनीही म्हटले आहे की, हिंसा ही निव्वळ परिणाम नाही, ती एक संस्कृती बनते. शांततेसाठी हिंसेवर मात करणे गरजेचे आहे, अन्यथा युद्ध चक्र पुन्हा सुरू होते.
अर्जुनासारखा धर्मनिष्ठ योद्धासुद्धा युद्धभूमीवर गोंधळतो, विषाद करतो. भगवद्गीतेत कृष्ण सांगतो की, “धर्म हा नेहमी स्पष्ट नसतो, तो अंतर्मनातून शोधावा लागतो.” कृष्णाने युद्ध टाळण्यासाठी शांतिदूत म्हणून अथक प्रयत्न केले. संवाद फसल्यावर आणि अधर्म आक्रमक झाल्यावरच युद्ध अपरिहार्य ठरते.कुरुक्षेत्र केवळ बाह्य युद्ध नाही, तर माणसाच्या अंतर्गत संघर्षाचेही प्रतीक आहे. अहंकार, मोह, भीती यांच्याशी सत्य आणि कर्तव्याचा संघर्ष. महाभारत दाखवते की, अगदी योग्य हेतूने लढलेले युद्धसुद्धा विनाश घडवते. म्हणून निर्णय घेणार्यांनी परिणामांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात एका देशातील युद्धाचा परिणाम दुसर्या देशांवरही होतो. निर्वासित संकट, अतिरेकी गटांचा उदय, आर्थिक मंदी आणि राजकीय अस्थिरता यांमुळे संपूर्ण जग अस्थिर होते. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अविश्वास वाढतो.
अॅरिस्टॉटलने ‘युडायमोनिया’ अर्थात ‘मानवी भरभराट’ ही संकल्पना मांडली. म्हणजेच मानवी उत्कर्ष हा खरा आनंद. ही संकल्पना युद्धाच्या संदर्भात साकार होऊ शकत नाही. युद्धशिक्षण, आरोग्य, समुदाय आणि सर्जनशीलता. मानवांना अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या परिस्थितींमध्ये व्यत्यय आणते. तात्त्विकदृष्ट्या मानवी क्षमतेला पद्धतशीरपणे कमी करणारी कोणतीही कृती प्रश्नचिन्ह उपस्थित करते आणि युद्ध नेमके तेच करते. मानवाची समृद्धी शांततेतच शक्य आहे.
तत्त्वज्ञ मार्था नुसबॉम यांनी युद्धासंदर्भात नैतिक संकल्पनेवर भर दिला. म्हणजे काय, तर एक सामान्य माणूस म्हणून आपण इतरांच्या दुःखाची कल्पना करू शकणे. युद्धाच्या वेळी शत्रूला माणूस म्हणून पाहणे आपण थांबवतो. तो एक धोकादायक वस्तू, एक अडथळा बनतो आणि जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या वेदनेची कल्पनाही करू शकत नाही, तेव्हा मात्र युद्ध सुकर वाटायला लागते. म्हणूनच युद्ध हे केवळ राजकीय अपयश नाही, ते नैतिक अधःपतनाचे चिन्ह आहे.
बर्याच वेळा शांततावादाला दुर्बलता समजले जाते. परंतु, तत्त्वज्ञान सांगते की, शांत राहणे, क्षमा करणे, अहिंसक मार्गाने लढणे यासाठी फार मोठे नैतिक धैर्य लागते. गांधीजी, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारून सामाजिक परिवर्तन घडवून आणले. तत्त्वज्ञान सांगते की, सच्चा विजय तोच असतो, जो मानवी संहाराविना आणि विनाशाविना मिळतो. युद्धात नुकसान सर्वसामान्य माणसाचे होते, सैनिक, नागरिक, बाळंतिणी, शेतकरी, विद्यार्थी. पण, युद्धाची कारणे ठरवतात, मात्र मूठभर लोक, राज्यकर्ते, राजकारणी, शस्त्रनिर्माते. युद्ध कोणी सुरू केले आणि कोण त्यात बळी पडले, या असमानतेला जाणीवपूर्वक ओळखणे सर्वसामान्यांसाठी आवश्यक आहे.
तत्त्वज्ञान आपल्याला शिकवते की माणूस केवळ पशुप्रवृत्तीने जगत नाही. आपल्याकडे विचार करण्याची, समजून घेण्याची आणि एकत्र जगण्याची क्षमता आहे. युद्ध ही त्या क्षमतेची नकारात्मक बाजू आहे. कोणतीही खरी समस्या युद्धातून सुटत नाही. उलट, तात्पुरत्या विजयामागे कायमस्वरूपी नुकसान लपलेले असते. समस्यांवर उपाय शोधायचा असेल, तर आपल्याला न्याय, समानता, समजूत आणि संवाद यांचा मार्ग स्वीकारावा लागेल. हेच तत्त्वज्ञान सांगते आणि हेच माणुसकीचे खर्या अर्थाने संरक्षण करणारे शस्त्र आहे!
डॉ. शुभांगी पारकर