गेल्या आठवड्याच्या लेखात आपण पाकिस्तानचा बलुचिस्तान हा प्रांत कसा स्वतंत्र होऊ पाहात आहे, याचा आढावा घेतला होता. आता खबर घेऊया सिंध प्रांताची. गुलाम मूर्तझा सय्यद किंवा जी. एम. सय्यद या नावाने जास्त परिचित असलेल्या सिंधी मुसलमान नेत्याने 1972 सालीच ‘जिये सिंध तहरीक’ अशी चळवळ सुरू करून वेगळ्या ‘सिंधुदेशा’ची मागणी केली होती. 1971 साली बंगाली भाषिक मुसलमानांचा ‘बांगलादेश’ निर्माण झाला. तसाच आम्हा सिंधी भाषिक मुसलमानांना वेगळा ‘सिंधुदेश’ हवा, अशी त्यांची मागणी होती. पाकिस्तान सरकारने सय्यदना त्यांच्या घरातच कैदेत टाकले आणि त्यांच्या असंख्य अनुयायांना ठार मारले.
महाभारत काळात या प्रांताचे नाव होते सिंधु देश. त्याची राजधानी होती बीतभय. म्हणजे जिथून भय, भीती दूर निघून गेले आहे ती. त्या राज्याच्या राजाचे नाव होते वृद्धक्षात्र. हा राजा आपला कर्तबगार राजपुत्र जयद्रथ याला राज्यावर बसवून तपस्या करण्यासाठी वनात निघून गेला. राजा जयद्रथाने आपल्या पराक्रमाने शेजारची सौवीर आणि शिबी अशी दोन राज्ये आपल्या राज्याला जोडून घेतली. यामुळे त्याला ‘सिंधु-सौवीर नरेश जयद्रथ’ असे म्हणू लागले. सौवीर म्हणजे आजचा कच्छ आणि सौराष्ट्र. अशा पराक्रमी राजाला हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र याने आपली 100 पुत्रानंतर झालेली कन्या दुःशला देऊन जावई करून घेतले. तिथेच गडबड झाली. जयद्रथ दुर्योधन-दुःशासन यांचा मेहुणा बनला आणि त्यांच्याचसारखा वागू लागला. असो. पुढचा इतिहास आपल्याला माहीतच आहे.
पण, या झाल्या महाभारतकालीन म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी. इसवी सन पूर्व तिसर्या शतकात म्हणजे आजपासून साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडरचा सामना याच सिंधु देशाचा सम्राट पुरु (पोरस हा भ्रष्ट उपचार) याच्याशी झाला. शेकडो प्रशिक्षित लढाऊ हत्तींच्या वर स्वार होऊन लढणार्या सिंधी वीरांनी अलेक्झांडरच्या तोंडाला फेस आणला. मात्र, सम्राट पुरुचा हत्ती ग्रीक सैनिकांच्या वेढ्यात सापडला आणि त्यांनी तो पळवत पळवत थेट ग्रीक छावणीत आणला. एवढ्यावरूनच असे म्हटले जाते की, पुरु पराभूत झाला. इसवी सन 711-712 मध्ये आक्रमक अरब मुसलमानांची पहिली जमिनीवरची स्वारी सिंधवर धडकली. यावेळी मात्र राजा दाहीर किंवा दाहीरसेन हा पराभूत झाला. यानंतर क्रमाक्रमाने तुर्क, अफगाण आणि इराणी मुसलमान सिंधवर धडकत राहिले. सिंधी हिंदू पराभूत झाले, पण समूळ संपले मात्र नाहीत.
पुढच्या खलजी, तुघलख, लोदी आणि बाबरापासून पुढच्या मुघल बादशहांच्या काळात सिंध सतत या ना त्या सल्तनतींच्या गुलामीतच जखडलेला होता. 18व्या शतकात दिग्विजयी मराठी फौजा दिल्लीवरून पुढे पंजाबात पेशावर आणि अटकेपर्यंत पोहोचल्या. पण, पश्चिमेकडे त्यांची धडक गुजरात नि पुढे सौराष्ट्रापर्यंतच पोहोचली. आणखी थोडा अवधी मिळाला असता, तर ते नक्कीच पुढे कच्छ आणि सिंधपर्यंत पोहोचले असते. पण...
पण, सिंधचा असा नाही तसा महाराष्ट्राशी संबंध यायचाच होता. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने हळूहळू अख्खा भारतच गिळला. साधारणपणे ज्या क्षेत्रातल्या सेनापतीने जो भाग जिंकला असेल, त्या क्षेत्राकडेच त्या नव्या भागाचे प्रशासन सोपवायचे, असा इंग्रजांचा खाक्या होता. सन 1840च्या सुमारास सिंध प्रांतातल्या अनेक सरदार-जहागिरदारांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’विरुद्ध बंड पुकारले. तेव्हा गव्हर्नर जनरल लॉर्ड अॅलनबरो याने तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील ‘बॉम्बे आर्मी’चा प्रमुख सेनापती जनरल चार्ल्स नेपियर याला ती बंडे मोडून काढण्याचा हुकुम दिला. जनरल नेपियर त्यावेळी 60 वर्षांचा होता. पण, तो इतका तडफदार होता की, त्याने नुसतीच बंडे मोडण्याऐवजी सिंध आणि जोडीला बलुचिस्तान दोन्ही प्रांत सरळ कंपनी सरकारच्या साम्राज्याला जोडून टाकले. यालाच म्हणतात, ‘न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी.’
अशा तर्हेने सन 1843 मध्ये मुंबई इलाख्याला जोडला गेलेला सिंध प्रांत थेट 1936 पर्यंत राज्याचा भाग होता. मॅट्रिकच्या नि विद्यापीठाच्या परीक्षा द्यायला विद्यार्थी कराचीहून मुंबईला यायचे. खरे म्हणजे सगळे ठाकठीक होते. पण, हळूहळू सिंधी लोकांच्या पोटात दुखायला लागले. ‘आम्हाला मुंबई राज्यातून वेगळे करा,’ अशी त्यांची इंग्रज सरकारकडे पिरपिर सुरू झाली. थांबा! मी सिंधी लोकांची ‘पिरपिर’ असे म्हटले, ते अधिक स्पष्टपणे सांगायला हवे. ‘सिंधी मुसलमानांची पिरपिर सुरू झाली,’ असे म्हणणे जास्त बरोबर ठरेल.
लारकाना हे सिंध प्रांतातले एक मोठे नि महत्त्वाचे शहर. तिथे फेब्रुवारी 1920 मध्ये काँग्रेसचे पुढारी मौैलाना आझाद आणि मौलाना शौैकत अली यांनी एक जंगी सभा घेऊन मुसलमानांना आवाहन केले की, तुर्कस्तानमध्ये ‘खिलाफत’ ही संस्था रद्द करण्यात आली आहे, तर भारतातल्या मुसलमानांनी या घटनेचा जोरदार निषेध केला पाहिजे. या जंगी सभेचा गुलाम मूर्तझा सय्यद नावाच्या एका कोवळ्या तरुणावर जबरदस्त परिणाम झाला. अवघ्या 16 वर्षांच्या या मुलाने लगेच मार्च 1920 मध्ये आपल्या सना या गावी ‘खिलाफत’ चळवळीच्या समर्थनासाठी सभा आयोजित केली. तेव्हापासून सिंध प्रांतातल्या मुसलमानांना नेता मिळाला, जी. एम. सय्यद. पुढे सिंधी मुसलमानांनी ‘आम्हाला मुंबई राज्यापासून वेगळे करा,’ अशी जी मागणी सुरू केली; तिच्या मुळाशी ही भावना होती की, ‘मुंबई राज्यात सत्ता इंग्रजांची असली तरी, व्यापारासह इतर सर्वच क्षेत्रांत हिंदू लोक पुढे आहेत. त्यामुळे आम्हाला, म्हणजे मुसलमानांना पुढे सरसावायला वाव मिळत नाही.’ इंग्रज सरकारने बराच काळ या मागणीकडे दुर्लक्षकेले. पण, 1936 साली मात्र त्यांनी ही मागणी मान्य करून सिंध प्रांत मुंबई राज्यातून वेगळा काढला.
आता सिंधचे वेगळे प्रांतिक कायदेमंडळ अस्तित्वात आले. 1937 साली जी. एम. सय्यद या कायदेमंडळावर निवडून आले. 1938 साली त्यांनी रीतसर ‘मुस्लीम लीग’ या पक्षात प्रवेश केला आणि 1940 साली ते सिंध प्रांताचे शिक्षणमंत्री बनले. त्याचवर्षी ‘मुस्लीम लीग’ने ‘आम्हाला पाकिस्तान हा वेगळा देश हवा,’ अशी मागणी अधिकृतपणे पक्षाच्या लाहोर अधिवेशनात मांडली. पुढच्या सात वर्षांत बॅरिस्टर जिनांनी अचूक खेळ्या करीत, नेभळट हिंदू नेत्यांना घाबरवून सोडत आणि इंग्रजांच्या सक्रिय सहकार्याने पाकिस्तान कसा अस्तित्वात आणला, हे आपल्याला माहीतच आहे. या सगळ्या वाटचालीत जिनांना खरा जोरदार पाठिंबा दिला, तो उत्तर प्रदेशातल्या मुसलमानांनी आणि मग त्याखालोखाल पंजाबी आणि सिंधी मुसलमानांनी.
नवनिर्मित पाकिस्तानची राजधानी कराची हे सिंध प्रांतातले शहर राहील, हा निर्णय जिनांचा होता. ‘मुस्लीम लीग’च्या पंजाबी नेत्यांना तो फारसा पसंत नसावा. पण, पाकिस्तान निर्मितीनंतर अवघ्या 13 महिन्यांत जिना मरण पावले. मग पंजाबी मुसलमान नेत्यांनी आपले दात आणि नखे एकदमच बाहेर काढली. पाकिस्तानच्या सर्व क्षेत्रांतील सर्व सत्तास्थानांवर फक्त पंजाबी मुसलमानांचाच भरणा होऊ लागला. तेव्हा जी. एम. सय्यदसारख्या नेत्यांना जाणवू लागले की, हा देश मुसलमानांचा नसून फक्त पंजाबी मुसलमानांचा आहे. इथे आपणा सिंध्यांना काही भवितव्य नाही. उगाच त्या सिंधी हिंदूंना दूर लोटले.
पण, हे कळेपर्यंत 1958 साल उजाडले. पाकिस्तानी सैन्यातला एक महत्त्वाकांक्षी सेनापती जनरल मोहम्मद अयुबखान याने बंड पुकारून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा याला पदच्युत केले आणि सत्ता हाती घेतली.
भ्रमनिरास झालेल्या जी. एम. सय्यदनी इथून पुढे सिंधी भाषिक मुसलमानांना एकत्र करून त्यांचा एक दबावगट बनवण्याचा खूप प्रयत्न केला. आंदोलने केली, तुरुंगवास भोगला, पुस्तके लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. 1971 मध्ये बंगाली भाषिक मुसलमानांचा, भारताच्या मदतीने, बांगलादेश बनल्यावर त्यांना परत आशा वाटू लागली. 1972 साली ‘जिये सिंध तहरीक’ सुरू करून त्यांनी झुल्फिकार अली भुत्तोंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. भुत्तोसुद्धा सिंधी भाषिक होते. पण, भुत्तो उच्चशिक्षित, अति श्रीमंत, खानदानी जमीनदार घराण्यातले, जगभर भाषणे करीत हिंडणारे नि जी. एम. सय्यद जमीनदार असले, तरी एकंदर सामाजिक प्रतिष्ठेत भुत्तोंपेक्षा कमीच. म्हणून बहुदा भुत्तोंनी सय्यदना बरोबर घेतले नाही. पुढे सिंधी भुत्तोंना पंजाबी झिया-उल्-हकने फासावर लटकावले. जी. एम. सय्यद 1995 साली घरातच नजरकैदेने मरण पावले.
सांई म्हणने आदरणीय. सय्यद यांचे अनुयायी त्यांना ‘सांई सय्यद’ म्हणून ओळखतात. आपले मराठी लोक सगळ्या उत्तर प्रदेशी लोकांना ‘भय्या’, सगळ्या कानडी लोकांना ‘अण्णा’ म्हणतात; तसेच सगळ्या सिंध्यांना ‘सांई’ म्हणतात.
सय्यद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ‘जिये सिंध तहरीक’मधून ‘जिये सिंध कौमी महज’ हा राजकीय पक्ष निघाला. पण, 2000 साली त्यातून ‘जिये सिंध मुत्ताहिदा महज’ हा पक्ष वेगळा झाला. पुन्हा 2006 साली आणखी फूट पडून ‘जिये सिंध कौमी महज (असरार)’ हा वेगळा पक्ष निर्माण झाला.
या अशा भांडणांमुळे त्यांच्या चळवळींचा प्रभाव मर्यादितच राहिला आहे. पंजाबी-मुसलमान बलुचींप्रमाणे नि पठाणांप्रमाणेच सिंध्यांनाही चेपत असतात. 1959 साली हुकुमशहा अयुबखानने देशाची राजधानी सिंधच्या कराचीहून पंजाबच्या रावळपिंडीत हलवली. सिंधी नेते मनगटे चावण्यापलीकडे काहीही करू शकले नाहीत. पाकिस्तानी राजकारणाप्रमाणेच पाकिस्तानी लष्करातही सिंधी सेनापती नि सिंधी सैनिक अत्यल्प आहेत. लढाऊ हत्तींवरून अलेक्झांडरशी झुंजणारे सिंधी एवढे प्रभावहीन का बरे झाले? हिंदुत्वापासून दूर गेल्यामुळे तर नव्हे?