योगिक चक्र साधना लेखांक-42 भाग-7

    26-May-2025
Total Views | 16
योगिक चक्र साधना लेखांक-42 भाग-7
चक्रातील शक्ती, देवता कोणत्या याविषयी आपण विशुद्ध चक्रापर्यंतचा अभ्यास मागील लेखांत पाहिला. अनेक प्रकारची वर्णने अनेक ग्रंथांमध्ये, त्या त्या साधकांच्या अनुभवाप्रमाणे दिलेले आढळतात. स्वानुभव व मार्गदर्शकाकडून झालेला दृष्टांत हे याबाबत फार महत्त्वाचे ठरतात. याविषयी ‘श्रीमद्भगवद्गीते’पासून ‘श्रीज्ञानेश्वरी’पर्यंतची संकल्पना, तसेच पातंजल योग सूत्रापासून आद्य शंकराचार्यांपर्यंतची आलेली वर्णने, घेरंड संहितेत काही अंशी वेगळी मिळतात.


’ There is nothing wrong and right in this world’ या उक्तीचा अर्थ कोणी चूक किंवा बरोबर असा न घेता, त्या त्या ठिकाणी ते ते बरोबरच आहेत असा घ्यावा. जसे योगोपचार देताना एका आसनाने एकाची व्याधी बरी होते, तर तीच व्याधी असलेल्या दुसर्‍याला बरे वाटण्याऐवजी त्रास होतो कारण, दोघांची प्रकृती सारखी नसते. म्हणूनच आधी नाडी परीक्षा करून प्रकृती तपासावी लागते, मग योगोपचार काय द्यायचा ते ठरते. तसेच काहीसे चक्र साधनेचेही आहे. प्रत्येकाचे अनुभव भिन्न स्वरूपाचे असले, तरी तेथील तत्त्व व शक्ती, देवता मात्र एकच असतात. प्रकृतीपरत्वे अनुभव वेगळाले असू शकतील. प्रकृती म्हणजे सत्व, रज, तम या तीन गुणांचे मिश्रण. यच्चयावत जीवसृष्टी या तीन गुणांनीच व्यापली आहे. त्यांच्या मिश्रणाने कमी अधिक प्रमाणावर वात, पित्त, कफ हे दृश्य स्वरूपात दिसतात. त्यांचे कमीअधिक असणे यावरूनच माणसाचा स्वभाव ठरतो. चंचल, रागीट, शांत स्वभाव याचा व्यक्तीला अनुभव येत राहतो. यातील बर्‍याच गोष्टी या माणसाच्या ताब्यात नसतात कारण, त्यांचा सर्व संबंध हा पूर्व कर्माशी असतो. जे कर्म घडून चुकले आहेत. याच जन्मातील कर्म नव्हे, पूर्व जन्मीचेसुद्धा, जे घडून गेले ते बदलणार कसे? ते बदलण्यास साधना करावी लागते. म्हणजे आपल्यात बदल घडवून आणण्यासाठी 26 सद्गुणांची जोपासना करावी लागते व ती करण्यासाठी यम, नियम पाळावे लागतात. प्रत्याहाराचा दंडूका उगारून सहा दुर्गुणांची हकालपट्टी करावी लागते, ते काम तेवढे सोपे नाही. त्यासाठी सद्गुरूंचा आशीर्वाद लागतो व सद्गुरूंचा आशीर्वाद मिळविण्यासाठी नम्रता बाळगावी लागते. मी, मी करणे सोडावे लागते. आपण समजुतीने म्हणतो, ‘ज्ञानेशो भगवान विष्णु.’ पण, त्यांची गुरू निवृत्तीनाथाप्रति केवढी नम्रता! अहो, वाचकांनासुद्धा त्यांनी संत आणि गुरू संबोधून ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली. आपण नम्रतेत कुठे आहोत, ते आपले आपण कृपया तपासावे.


त्यावर उपाय म्हणजे प्रश्न आणि शंकांना बाजूला सारून, डोळसपणे तार्किक विचार करून धारणा दृढ करावी लागते. हे सर्व करून गुरू उपदेशाने नियमित साधना करावी लागते. ती सुरू असतानासुद्धा तार्किक आणि चिकित्सक बुद्धीतला फरक जाणून, तार्किक बुद्धीने पुढे जायचे असते. अन्यथा बुद्धीचा अडथळा एवढा जबरदस्त असतो की, ती कमावलेले सर्व गमवायला लावते. म्हणून डोळसपणे उभारलेली श्रद्धा हेच या मार्गातील भांडवल असते. ज्याप्रमाणे व्यावसायिक व्यापारात नफा नाही मिळाला, तरी आपले भांडवल गमावत नाहीत. उलटपक्षी नफा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवतात, तसे या मार्गातही सुरुवातीला अनुभव आले नाहीत तरी चालेल. पण, श्रद्धेचे भांडवल न गमावता साधनेचे प्रयत्न सुरू ठेवावे लागतात.
पुढील सहावे चक्र म्हणजे आज्ञा. तिथे जायला दोन मार्ग असतात. मोहात टाकणार्‍या सिद्धींचा फसवा मार्ग व दुसरा योग सिद्धीचा खरा मार्ग. इथे साधकाची परीक्षा असते. तो लोभी असेल, तर पहिल्या मार्गाने जाऊन, सगळी साधना व्यर्थ घालवून पहिल्या पायरीच्याही खाली घसरेल. म्हणजे रूढ समजुतीप्रमाणे नरकात जाईल व लोभी नसेल, तर योगमार्गात यशस्वी होत परमेश्वरात विलीन होऊन (वैकुंठात) पुढे परमेश्वर इच्छेने परत येऊन सेवाकार्य करेल किंवा मुक्त होऊन आत्मसमर्पित होईल. हे सर्व परमेश्वर इच्छेनेच होईल. शेवट परमेश्वरालासुद्धा या विश्वाला वंद्य करण्यासाठी सेवक वर्ग लागतोच. हे योगसिद्ध साधकच, सेवक म्हणून परमेश्वराचे कार्य पुढे चालवतात.
आज्ञा चक्राला कुठलेही बीज नाही, ते निशब्द आहे ज्योतीसारखे. म्हणून तिथे फक्त प्रकाश आहे. ज्योतीरूप प्रकाश. याच्या साधनेसाठी भृकुटीमध्यावर नजर ठेवून, मुर्ध्नि मुद्रेत ज्योतीची धारणा करायची असते. ज्योती-जिचे तीन रंगात स्वरूप आहे. काळा, पिवळा आणि पांढरा. ज्योती ध्यानातून तिचा प्रत्यय येतो. तीच परमेश्वराची शक्ती आहे, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. ही ज्योती म्हणजेच तिसरा नेत्र, तो प्रखर असतो. म्हणून खर्‍या योगसाधकाच्या नजरेला नजर मिळवणे खोटारड्या, ठग लोकांना शक्य नसते. कारण तिथे सत्याचे (सत्य म्हणजे पहिला यम) तेज असते. ते समोरच्याचे विपरीत विचार नष्ट करते. म्हणून असे साधक स्वभावाने समोरच्याला खूप तापट वाटतात. ते शिस्तीने खूप कडक असतात. त्यांना शुचिर्भूत होऊनच राहणे आवडते. त्यात बदल झाला तर ते तडकतात. पण, समोरच्या वर नाही, स्वतःवर. स्वतःलाच ते शिक्षा करून घेतात. कदाचित ते जेवणार नाहीत, वाढलेले ताट सोडून उठून जातील. स्वतःला मारून घेतील. बघणार्‍यांना ते सर्व विपरीत वाटते. पण, आपण जसे शाळेत शिकलो, ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ हे त्यांचे वागणे काहीसे त्या प्रकारात मोडते. ते दुसर्‍यावर रागावत नाहीत. कारण, त्यांची आत्मैक्य दृष्टी झालेली असते. ‘सर्वांभूती परमेश्वर’ ही त्यांची धारणा असते, म्हणूनच स्वतःला शिक्षा. ज्याच्या प्राप्तीसाठी साधना करायची त्याच्यावरच कसे रागवायचे, ही त्यांची श्रद्धा दृढ झालेली असते. इतरांना त्यांच्या अशा वागणुकीची भीती वाटते, तो भाग अलाहिदा.
‘आज्ञा चक्राच्या ध्यानाने’ आत्मानात्मविवेक जागृत होऊन दिव्य ज्ञान दृष्टी (जिला आपण अंर्तदृष्टी किंवा इन्ट्यूशन म्हणतो), दूरदर्शन किमया, आत्मज्ञान दृष्टी, आत्मज्ञान किमया प्राप्त होतात. जोपर्यंत साधक त्याची प्रसिद्धी करत नाही किंवा अहंकार ठेवीत नाही, तोपर्यंत त्या साधकाजवळ राहतात.
या पुढील ‘चक्र सहस्रार चक्र’. त्याचे स्थान : टाळू मध्य, देवता : शिव-पार्वती (पार्वती म्हणजेच कुंडलिनी). इथे साधना करण्यासाठीची परवानगी गुरूकडून घ्यावी लागते. साधकाची आधीच्या चक्राची सिद्धता किती आहे, त्यावरून ते ठरवतात. लाभ : सायुज्यता, समिपता, सलोकता व शेवट स्वरूपता. पथ्य : प्रचंड धोका पत्करण्याची क्षमता. येथून चुकून प्राणशक्ती (जिवात्मा) बाहेर निघून गेली, तर साधकाचे शरीर मृतवत होते. त्यामुळे ही साधना फक्त आणि फक्त गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करावी. कारण, जिवात्मा बाहेर पडल्यास त्याने कोठे जावे, परत कसे यावे, हे फक्त कल्याणकारी गुरूच त्यांच्या संरक्षणाखाली ठरवू शकतात. अन्यथा भूत, प्रेत, पिशाच्च योनीतील जीवात्मे त्याला घेरून आपला वासनात्मक हेतू पूर्ण करण्यासाठी, याचा वापर करू शकतात. म्हणून जप, तप, साधना हे सर्व तांत्रिक नसावे, तर श्रद्धापूर्वक असावे. ज्यातून भगवंताची प्राप्ती म्हणजे योग साधेल, वियोग नाही.
म्हणूनच या साधना करताना भगवंतावर प्रेम व आत्मैक्य भाव ठेवणे गरजेचे आहे. तर भगवंत आपल्यावर प्रेम करतो आणि योग साधतो. यासाठीच भगवंताचे वचन आहे, ‘श्रद्धावान लभते ज्ञानं’ कारण ही ज्ञानसाधना आहे. येथे ‘चक्र साधना’ हा विषय संपवून, पुढच्या लेखापासून ‘योगोपचार’ या विषयावर लेखन केले जाईल.
 
- डॉ. गजानन जोग 
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याण लोकलमध्ये

कल्याण लोकलमध्ये 'बोकड प्रवासी'! कुर्ला स्थानकावर गोंधळ, फेरीवाल्यांचा उद्रेक आणि रेल्वे प्रशासनाची गंभीर दुर्लक्ष

कल्याणकडे जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये बोकड घेऊन प्रवास करणारा प्रवासी आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना कुर्ला स्थानकावरून सुरू झाल्याने, या स्थानकावरील अराजकता, प्रचंड गर्दी, फेरीवाल्यांचा वावर आणि रेल्वे प्रशासनाची हलगर्जी पुन्हा एकदा समोर आली आहे.गर्दीच्या तासात झालेल्या या प्रकारामुळे लोकल डब्यात गोंधळ उडाला. बोकड मोकळा फिरत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही प्रवाशांनी हा प्रकार मोबाईलवर टिपून सोशल मीडियावर शेअर केला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121