कल्याण: (cleanliness campaign in Kalyan-Dombivali) “कल्याण, डोंबिवलीत आधुनिक तंत्रज्ञानातून ‘शहर स्वच्छता अभियान’ राबविले जात आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक शहराची ओळख ही त्या शहरातील स्वच्छतेवरून होते. त्यामुळे हे अभियान कल्याण-डोंबिवली शहराच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून, या अभियानामुळे ही दोन्ही शहरे राज्यातीलच नव्हे, तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारूपास येतील,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘केडीएमसी’अंतर्गत येणार्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘केडीएमसी’च्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतूक, रस्तेसफाई व शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा रविवार, 18 मे रोजी डोंबिवली पूर्वेतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. तसेच, या प्रसंगी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आणण्यात आलेल्या शेकडो वाहनांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजांकन केले.
या ‘स्वच्छता अभियान’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘केडीएमसी’च्या सात प्रभागातील कचरा संकलन व वाहतूक याचबरोबर रस्ते सफाईकरिता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून ‘शहर स्वच्छता अभियान’ राबविण्यात येणार आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हे अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. “कल्याण, डोंबिवली या दोन्हीही शहरांचा वेगाने विकास होतो आहे. येथील वाढती लोकसंख्या पाहता या शहरांची स्वच्छता ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा असणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर हे अभियान हाती घेतले आहे,” असे मत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, आ. रविंद्र चव्हाण, आ. राजेश मोरे, आ. विश्वनाथ भोईर, आयुक्त अभिनव गोयल, आशुतोष डुंबरे, टाटाचे सुशील कुमार यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
लोकांच्या हिताचे काम करणारे सरकार : रविंद्र चव्हाण
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीत वेगवेगळ्या प्रकल्पांचे वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वातील जनसामान्यांच्या हिताचे काम करणारे सरकार आहे. कल्याण-डोंबिवलीत ‘चेन्नई पॅटर्न’ राबविला जात असला, तरी त्यांचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांची असून ते त्या दिशेने जातील, एवढी खात्री आहे.”
कौशल्यवर्धन केंद्रातून रोजगार : खा. डॉ. शिंदे
“कल्याण शहरातील दावडी येथे ‘टाटा टेक्नोलॉजी लि.’ संचलित कौशल्यवर्धन केंद्र, सेंटर फॉर इन्व्हेंशन इनोव्होवेशन, ‘इक्युबेशन अॅण्ड ट्रेनिंग सेंटर’ची उभारणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार असून, त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे,” असे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.