शहापूरवासीयांच्या घशाला कोरड!

- शहापुरात भीषण पाणीटंचाई

    16-May-2025
Total Views | 7
 
Shahapur residents water problem
 
शहापूर: ( Shahapur residents water problem ) शहापूर तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावपाड्यांमध्ये नागरिक पाण्याविना तहानले आहेत. ‘धरण उशाला, पण कोरड घशाला’ अशी अवस्था सध्या शहापूरवासीयांची झाली आहे. शहापूर तालुका जरी मुंबई आणि ठाणे या महानगरांना पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत असला, तरी इथल्या शेतकर्‍यांना मात्र सिंचनासाठी पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे.
 
ठाणे जिल्ह्यातील भातसा नदीवर उभारलेले भातसा धरणाची एकूण साठवण क्षमता 976 दलघमी आहे. त्यापैकी सुमारे 695 दलघमी पाणी वापरासाठी उपलब्ध असते. यापैकी 40 टक्के पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आले असले, तरी डाव्या कालव्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने त्यातील सुमारे 20 टक्के पाणी समुद्रात मिसळून खारट होत आहे. परिणामी, तालुक्यातील सिंचन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
 
‘बिरवाडी उपसा जलसिंचन योजना’ पूर्ण झाली असती, तर बिरवाडी, शेंड्याचापाडा, नावुचापाडा, मेंगाळपाडा, चौकीचापाडा आणि पेंढरघोळ या आदिवासी भागांतील 1 हजार, 267 हेक्टर शेती सिंचनाखाली आली असती. विशेष म्हणजे ही योजना राज्यातील पहिली अशी योजना होती, ज्यात 40 मी. सक्शन हेडवरून पाणी उचलून 70 मी. उंचीवर टाकीत पोहोचवण्याचे तंत्रज्ञान वापरणार होते. त्यामुळे सुमारे तीन हजार एकर शेतीला सिंचनसुविधा मिळाली असती. तालुक्यात पाणी असूनही अंमलबजावणीच्या कमकुवतपणामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रखडलेली कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक आणि शेतकरी करत आहेत.
 
‘बिरवाडी जलसिंचन योजने’वर कोट्यवधींचा खर्च वाया
 
शहापूर तालुक्यातील बिरवाडीसह इतर पाड्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने 2005 साली ‘बिरवाडी उपसा जलसिंचन योजने’स 8.27 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. ही योजना 2009 साली पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, वनविभागाच्या परवानग्या, यांत्रिक विभागाचे डिझाईन, विद्युत विभागाच्या मंजुर्‍या व निधीअभावी योजना रखडत गेली. यानंतर योजनेची सुधारित किंमत 19.56 कोटी झाली असून, 2017 सालापर्यंत यावर 15.44 कोटी खर्च झाले आहेत. मात्र, योजना अर्धवट राहिल्याने कोट्यवधींचा निधी वाया गेला आहे.
 
भातसा धरणाचा डावा कालवा अधांतरी
 
भातसा धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असले, तरी डाव्या कालव्याचे काम 40 वर्षांनंतरही रखडलेलेच आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वनजमिनी असल्याने परवानग्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. भातसा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे नव्हे, तर नदीतून पाणी सोडले जाते आणि ते पीसा धरणात अडवले जाते. मात्र, पीसा धरण पुरेशी साठवणक्षमता नसल्यामुळे उर्वरित पाणी थेट खाडीमध्ये मिसळून खारट होते.
 
धरण उशाला, कोरड घशाला!
 
मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा ही जलाशये शहापुरात असतानादेखील याठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121