डोंबिवली : रेल्वेचा भार हलका करण्यासाठी तसेच कल्याण-डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मुंब्रा ते डोंबिवली हा रेल्वे समांतर मार्गाचा प्रश्न गेले तीन दशके प्रलंबित आहे. रेल्वेवर येणारा ताण पाहता मुंब्र्यात झालेल्या अपघाताने आता पुन्हा एकदा समांतर रस्त्यांची मागणी जोर धरू लागली आहे.
कल्याण ग्रामीणचे माजी आ. राजू पाटील यांनी सातत्याने समांतर रस्त्याचा पाठपुरावा केला आहे. आमदारांनी हिवाळी अधिवेशनातील त्यांचे शक्तिशाली अस्त्र लक्षवेधी सूचनेचा वापर करत हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. ठाणे जिल्ह्याचे मोठ्या झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. येथील चाकरमानी हा नोकरीनिमित्त लोकलने प्रवास करतो. लोकलवरील वाढलेला ताण पाहता नागरिक खासगी किंवा सार्वजनिक वाहनाने रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारत आहेत. ठाणे पल्याडच्या नागरिकांना कल्याण-शीळ रोड हा एकमेव वाहतुकीचा मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहनकोंडी होत आहे. ही वाहनकोंडीची समस्या आताची नसून गेल्या 20 वर्षांपासून अधिक काळ भेडसावत आहे. हे पाहता तत्कालीन डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आ. दिवंगत हरिश्चंद्र पाटील यांनी डोंबिवली मुंब्रा समांतर रस्ता तयार करण्याची मागणी केली होती. तत्कालीन आ. एकनाथ शिंदे यांनी त्यास समर्थन दिले होते.
2007 साली मुंबई महानगर प्रादेशिक विभागाच्या बैठकीत रस्त्याच्या ‘डीपीआर’ तयार करण्यासाठी 93 कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला होता. मात्र, पर्यावरण विभागाच्या परवानग्या मिळाल्या नसल्याने रेल्वे समांतर रस्ता हा कागदावरच राहिला आहे. येथील वाहनचालक मात्र आजही वाहतुककोंडीचा सामना करत आहे.
रस्ता झाल्यास दहा मिनिटांत ठाणे
शासनाकडे चाररस्त्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यात शासनाने प्रस्तावित केलेला 25 मीटरचा रस्ता हा रेतीबंदर ते दिवा हा ठाण्याच्या विकास आरखड्यात समाविष्ट आहे. दुसरा मुंब्रा ते डोंबिवली हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन जुना व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ जुना हा मार्ग काटई नाका ते बदलापूर कजर्तमार्गे खोपोली येथे पोहोचेल. तिसरा पर्याय शिळफाटा रस्त्यावरून मुंब्रा कोसामार्गे जाणारा रस्ता आणि चौथा पर्याय मोठागाव, डोंबिवली ते माणकोली राष्ट्रीय महामार्ग जुना असा रस्ता आहे. यात मुंब्रा-डोंबिवली समांतर रस्ता झाल्यास कल्याण-डोंबिवलीकर पाऊण तासाऐवजी पाच ते दहा मिनिटांत ठाणे गाठू शकतो.
मुंब्रा डोंबिवली समांतर रस्ता झाला असता, तर रेल्वेवर येणारा ताण कमी होऊन काही प्रवाशांनी रस्तेमार्गाचा वापर केला असता. पण, अजूनही मुंब्रा-डोंबिवली समांतर रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. झालेल्या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंब्रा-डोंबिवली समांतर रस्त्यांची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अपघाताला रेल्वे प्रशासन जबाबदार
मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ झालेली घटना दुर्दैवी असून याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी दिल्या आहेत. या अपघातानंतर सर्वत्र खळबळ उडाली असून रेल्वे प्रवास कसा जीवघेणा झाला असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत. कर्जत, कसाराहून मुंबईच्या दिशेने नोकरीसाठी येणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु, या स्थानकातून एक ते दीड तासांच्या अंतराने लोकल गाड्या धावतात. त्यामुळे या लोकल गाड्यांमध्ये कायमच प्रवाशांची गर्दी असते.
मृत्यूचा सापळा!
रेल्वे अपघातात मृत्यू होणार्यांची संख्या मोठी आहे. गेल्या 20 वर्षांत मुंबईत उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या अपघातात 51 हजारांहून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, तरीही हे अपघात थांबण्याचे नाव नाही. नोकरीनिमित्त मुंबईलगतच्या शहरांतून सकाळच्या सत्रात खच्च भरलेल्या गाड्यांमधून अपघाताची शक्यता अधिक असते. त्यामुळे यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
डोंबिवलीतून सुटतात 36 गाड्या
डोंबिवली रेल्वे स्थानकातून छशिमटकडे जाण्यासाठी पिक अव्हर्समध्ये 36 गाड्या सुटत आहेत. त्यामध्ये सकाळी 8.14 ची एक गाडी आहे. एसी सेमी फास्ट सकाळी 11.48 मिनिटांची, सायंकाळी 16.55 मिनिटांची याशिवाय कल्याणातून येऊन एक डबल फास्ट गाडी डोंबिवलीतून सुटते. ही गाडी 6.14 मिनिटांची आहे. याशिवाय धीम्या गतीने जाणार्या 32 गाड्या अशा एकूण 36 गाड्या डोंबिवली स्थानकातून सुटत आहे. लोकलच्या डबे वाढविण्यात याव्यात, अशी मागणीही नागरिकांनी यावेळी केली.