स्वरसम्राज्ञीची पुनर्भेट!

    17-May-2025
Total Views | 10

Talented singer Manik Verma
 
चतुरस्र गायिका माणिक वर्मा यांच्या गायिकीने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारत आणि जगाच्या पाठीवर शास्त्रीय संगीताची वेगळी छाप सोडली. त्यांच्या जीवनाचा आढावा घेणार्‍या ‘माणिक मोती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. दि. 16 मे पासून माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आपण पदार्पण केले. त्यानिमित्ताने या तेजस्वी गायिकेच्या संगीतविश्वाचा घेतलेला धांडोळा...
 
शास्त्रीय संगीताच्या भावविश्वाचा आढावा घेताना, पंडित सुरेश हळदणकर, पंडित सी. आर. व्यास ते आता आतापर्यंत आपल्या गायिकीने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या प्रभाकर कारेकर यांच्यापर्यंत अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्या थोर गायकांच्या मांदियाळीत एक असं नाव आपल्यासमोर येतं, ज्यांनी संगीतविश्वाला आपल्या गाण्यातून नवा आकार दिला. त्यांचं गाणं त्यांच्या स्वभावाप्रमाणेच मुक्त होतं. त्याला कुठल्याही प्रकारच्या बंधनांमध्ये त्यांनी अडकवून ठेवलं नाही. हे मुक्त असणे हीच त्यांची ओळख बनली आणि त्यांच्या या स्वतंत्र शैलीवर लोकांनी मनापासून प्रेम केलं. अशा लोकप्रिय गायिका म्हणजे माणिक वर्मा. सच्ची, सात्विक, निर्मळ अशा अनेक विशेषणांनी माणिक वर्मा यांचा गौरव केला जातो. परंतु, या सगळ्यांमध्ये पु. ल. देशपांडे यांनी केलेलं कौतुक उठून दिसतं. माणिक वर्मा यांचा उल्लेख करताना पु. ल. त्यांना ‘गुणिजन माणिक’ असं म्हणतात. त्यांच्या एका लेखांमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात गीतांचा एक उत्सव सुरू झाला होता, ग. दि. माडगूळकर हे या गीतोत्सवाचे प्रणेते होते. जोडीला शब्दांना संगीतातून रंगून काढण्याची प्रतिभा लाभलेले सुधीर फडके होते आणि ती स्वरसज्ज गीत घरोघरी पोहोचवणारा सोज्वळ मोहक सुंदर असा आवाज होता तो माणिकचा!” पुलंच्या या गौरवोद्गारांमध्ये आपल्याला त्या काळाचेच दर्शन घडतं.
 
माणिक वर्मा यांच्या ‘सावळाच रंग तुझा’ या गीताची मोहिनी आजसुद्धा लाखो प्रेक्षकांमध्ये आहे. ‘कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम’ हे गीत ऐकताना आजही आपण मंत्रमुग्ध होतो. माणिक वर्मा या विद्यापीठशी पुनर्भेट होण्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ लेखिका शोभा बोंद्रे यांनी त्यांच्यावर लिहिलेले पुस्तक आणि पुस्तक प्रकाशानाचा सोहळा. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आ. अ‍ॅड. आशिष शेलार, ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले, अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते ‘माणिक मोती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पाडला. पुस्तक प्रकाशनाच्या या सोहळ्याला राज्यभरातून माणिकताईंचे चाहते आले होते. माणिक वर्मा यांच्या शिष्या शैला दातार, आपले मनोगत व्यक्त करताना भावूक झाल्या होत्या. गुरू-शिष्य नात्यातून जे अनुबंध कायमचे तयार होतात, ही त्याचीच अभिव्यक्ती होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
लेखिका शोभा बोंद्रे आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी म्हणाल्या की, “माणिक वर्मा यांचं गाणं आजसुद्धा आपल्याला ताजं वाटतं. कारण, त्यांच्या गाण्यांमध्ये आपण विविधतेचा अनुभव घेतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व भुरळ पाडणारे आहे. त्याचबरोबर माणिक वर्मा अंतरबाह्य एकच होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कृत्रिमपणा नव्हता, यामुळे त्यांचं गाणं निर्मळ आणि प्रवाही राहिलं.”
माणिक वर्मा यांच्या भावगीतांनी महाराष्ट्राला वेड लावलं होतं. परंतु, त्यांची मूळ बैठक ही शास्त्रीय संगीताची होती. किराणा घराण्याची तालीम घेऊन माणिक वर्मा यांच्या सप्तसुरांच्या प्रवासाला सुरुवात झाली. हिराबाई बडोदेकर या तर त्यांच्या गुरू. परंतु, त्या कुठल्याही घराणेशाहीमध्ये अडकून राहिल्या नाहीत. माणिक वर्मा यांच्या संगीत सृजनाच्या कक्षा मुळातच रुंदावल्या होत्या. म्हणूनच त्यांनी आपल्या गीतामध्ये प्रयोगशीलता आणली. या प्रयोगशीलतेमुळेच माणिक वर्मा यांनी यशाची वेगवेगळी शिखरे गाठली. जितक्या तन्मयतेने माणिक वर्मा यांच्या भावगीतांचा आस्वाद प्रेक्षकांनी घेतला, तितक्याच उत्साहात ‘जाळीमदी पिकली करवंद’ या लावणीचासुद्धा लोकांनी स्वागत केलं. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर माणिक वर्मा यांच्याविषयी म्हणाल्या होत्या की, “माणिक आणि मी लहानपणापासून फक्त स्वरांचे विश्व शकलो. पण, ‘सावळाच रंग तुझा’ हे माणिकच गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मला जाणवलं की शब्दांमध्येही सूर असतो. माणिकताईंच्या गाण्यातून मी जे जे शिकले, ते माझ्या गाण्यात उतरवण्याचा मी कायम प्रयत्न केला.”
 
संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचं अलौकिक स्थान निर्माण करणार्‍या माणिक वर्मा, तितक्याच कुटुंबवत्सल गृहिणीदेखील होत्या. बर्‍याचदा कलाकाराच्या जीवनातील एकच एक पैलू लोकांच्या समोर येतो. परंतु, त्या कलाकाराला आणि त्याच्यातील सृजनशक्तीला घडवणारे अनेक वेगवेगळे प्रवाह एकाचवेळी कार्यरत असतात, त्यांच्या याच जीवनाचा वेध ‘माणिक मोती’ या पुस्तकाच्या माध्यमातून शोभा बोंद्रे यांनी घेतला आहे. या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचा वेध घेताना, जाणवणारे सत्य हेच आहे की, माणिक वर्मा खर्‍या अर्थाने स्वरसम्राज्ञी होत्या. या स्वरसम्राज्ञीची पुनर्भेट खर्‍या रसिकाला घ्यावीच लागेल, यात काही शंका नाही.
 
शास्त्रीय संगीताचा वारसा पुढच्या पिढीच्या हाती!
 
आईच्या (माणिक वर्मा) स्वरशताब्दी वर्षानिमित पुढच्या वर्षभरात अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ’अमृताहुनी गोड’ या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात तर झालेली आहेच. त्याचबरोबर माणिक वर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑनलाईन संगीत स्पर्धेचे आयोजनही करण्यात येईल. त्याचबरोबर आईचे शास्त्रीय संगीत, तिने गायलेले राग लोकांसमोर आलेले नाहीत. म्हणूनच आईच्या जन्मदिनी एका नव्या यूट्यूब चॅनेलची सुरुवात आम्ही केली, ज्याच्या माध्यमातून दर शनिवारी आईने गायलेले काही राग जे फारसे परिचित नाहीत, तसेच थेट प्रक्षेपण असणार्‍या कार्यक्रमांमध्ये सादर केलेले गीत आम्ही या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहोत.
 
-राणी वर्मा, (गायिका आणि माणिक वर्मा यांच्या कन्या)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121