_202505161901310521_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकार येत्या काही दिवसांत विविध देशांमध्ये बहुपक्षीय संसदीय शिष्टमंडळे पाठवण्याची शक्यता आहे. तथापि, या संदर्भात सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याचवेळी मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने या उपक्रमात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकवर निर्णायक हल्ले करून तेथील दहशतवादी तळांना उध्वस्त केले आहे. त्यासोबतच भारतातील शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी कराची ते इस्लामाबाद येथील सैन्यतळे, हवाईतळांवर हल्ले करून पाकचे कंबरडे तोडले आहे. त्याचवेळी पाकला चीनकडून प्राप्त हवाई संरक्षण यंत्रणा, लढाऊ विमाने आणि तुर्कीकडून प्राप्त ड्रोनदेखील कुचकामी असल्याचे सिद्ध झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला एकटे पाडणे, तेथील दहशतवाद आणि सैन्याची भूमिका जगासमोर आणणे आणि पाकच्या अण्वस्त्रांचा जगाला धोका असल्याचे सिद्ध करण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. त्यासाठी आगामी काळात केंद्र सरकार बहुपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांमध्ये पाठविण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सत्ताधारी भाजपसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह अन्य पक्षांच्या खासदारांचा समावेश असेल. याविषयी अद्याप सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.