न्या. भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ
14-May-2025
Total Views | 17
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपूत्र न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी देशाच्या ५२ व्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. बुधवार, १४ मे रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. न्यायमूर्ती गवई यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून सुमारे सहा महिन्यांचा कार्यकाळ असेल. दि. २३ नोव्हेंबर २०२५ मध्ये ते निवृत्त होतील. न्या. गवई हे अनुसुचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश आहेत.
न्या. भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. त्यांनी १९८७ ते १९९० पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली केली. १९९० नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर वकिली केली. न्या. गवई यांनी संवैधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यात वकिली केली. ते नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते.
ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ या काळात गवई यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १७ जानेवारी २००० रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. १४ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. न्या. गवई १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. मुंबई येथील प्रमुख पदावर तसेच नागपूर, औरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठांवर सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या असलेल्या खंडपीठांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी देशासाठीच्या अनेक प्रमुख निर्णयांत महत्वाची भूमिका बजावली.