विवेक फणसाळकर यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. संजयकुमार वर्मा, सदानंद दाते, रितेश कुमार, अर्चना त्यागी, देवेन भारती आणि अमिताभ गुप्ता यांची नावे चर्चेत होती. त्यापैकी देवेन भारती यांच्या गळ्यात माळ आयुक्तपदाची माळ पडली. डॅशिंग आयपीएस अधिकारी, अशी त्यांची ओळख. 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या तपासात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कुख्यात दहशतवादी कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले.अशा कर्तबगार अधिकार्याकडे मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!
मुंबई पोलीस आयुक्तपद हे प्रतिष्ठेचे आणि जबाबदारीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या नव्या जबाबदारीसोबत देवेन भारती यांना नवी आव्हानेदेखील पेलावी लागतील. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे आव्हान म्हणजे धार्मिक उन्माद रोखणे. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लांगूलचालनाच्या राजकारणाला उत आल्याचे सभोवताली दिसते. मुंबईतल्या काही विभागांमध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांना वसवून ‘व्होट बँक’ तयार केली जात असल्याचे गंभीर वास्तव दै. ‘मुंबई तरुण भारत’ने वेळोवेळी मांडले. मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. हे प्रकार वेळीच रोखले नाहीत, तर मुंबईचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. देवेन भारती त्याबाबत कठोर पावले उचलतील, अशी अपेक्षा.
दुसरे, मुंबईतील ड्रग्ज तस्करी रोखण्याचे आव्हान. इतके दिवस केवळ हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये चालणारी ड्रग्जची साखळी, आता मुंबईतील गल्लीबोळांमध्ये पोहोचलेली दिसते. युवा पिढी अमली पदार्थांची शिकार होऊन, त्यांचे करिअर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दिवसागणिक हे प्रमाण वाढत असल्याने, महाविद्यालयांमध्ये फोफावत जाणारे अमली पदार्थांचे जाळे तोडण्याचे सर्वांत मोठे आव्हान देवेन भारती यांच्यासमोर असेल. त्याचबरोबर वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालणेही तितकेच महत्त्वाचे. ही सगळी आव्हाने समर्थपणे पेलून, मुंबईला सुरक्षित करतील, हीच अपेक्षा. त्यांना या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा!
बेताल वक्तव्ये
इच्छिलेले घडत असते, तर भिक्षूकदेखील राजे झाले असते, असे म्हणतात. संजय राऊतांचेही अगदी तसेच. शिवसेनेतील फुटीनंतर, शिंदेंचे पानिपत होईल; महाविकास आघाडीची सत्ता येऊन उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी अनेक स्वप्ने त्यांनी पाहिली. पण, प्रत्यक्षात पदरी उपेक्षा आली. त्यामुळे निराश झालेल्या राऊतांच्या तोंडून बेताल वक्तव्यांची जणू मालिकाच सुरू झाली. आपण काय बोलतो? त्यात तथ्य किती? संदर्भ, पुरावे आहेत का? याचा विचार न करता, तोंडाला येईल, ते अखंड बरळत राहावे, असा कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला. त्यातून फलनिष्पत्ती काय? ‘ब्रेकफास्ट न्यूज’मध्ये चर्चेत राहण्यासाठीच बहुदा हा सगळा आटापिटा!
असो. पण, मागच्या महिन्यात त्यांनी केलेल्या एका दाव्यातून त्यांची पत्रकारिता किती कच्ची, खोटी आहे आणि खोट्याचे खरे करण्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा अंदाज महाराष्ट्रातील जनतेला आला. “वर्षा’ बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्याने मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा या बंगल्यात राहायला तयार नाहीत. ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला गेलो, तरी रात्री तिकडे झोपणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे आहे. कामाख्या देवीच्या मंदिरातून आणलेली रेड्यांची शिंगे ‘वर्षा’ बंगल्यात पुरली असून, कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळेच देवेंद्र फडणवीस या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला. आठ दिवस माध्यमांमध्ये हा विषय हेडलाईनमध्ये राहिल्याने जनताही संभ्रमित झाली. पण, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सहकुटुंब गृहप्रवेश करून फडणवीसांनी राऊतांना तोंडावर पाडले. वास्तवात ‘वर्षा’ बंगल्यावर सुरू असलेली डागडुजी आणि त्यात मुलगी दिविजा हिची दहावीची परीक्षा, यामुळे फडणवीसांनी आणखी काही दिवस ‘सागर’ निवासस्थानी मुक्काम करण्याचे ठरवले. ही दोन्ही कामे झाल्यानंतर त्यांनी प्रथेनुसार विधिवत पूजा करून ‘वर्षा’वर मुक्काम हलवला. अशावेळी राऊतांच्या फसव्या दाव्याबाबत माध्यमांमध्ये चर्चा व्हायला हव्या होत्या. पण, ते तोंडावर पडल्याची बातमी एकानेही चालवली नाही? याचा अर्थ ‘घोडे कमावते आणि गाढव खाते’ असाच समजावा का? असो. पण, राऊतांच्या सांगण्याप्रमाणे महाराष्ट्रातील मीडिया चालणार असेल, तर त्यांची स्थिती भविष्यात राऊतांच्या पक्षासारखी होईल, हे निश्चित!