संत रामदास स्वामींचा ‘रघुवीर समर्थ’ (भाग-2)

    03-Aug-2024
Total Views | 64
sant ramdas swami


संत रामदास स्वामींना अनेकवेळा प्रत्यक्ष रामदर्शन व साक्षात्कार झाले, हे आपण त्यांच्याच साहित्यातून उत्कटपणे पाहू शकतो. राम साक्षात्कारानंतर सारे जग त्यांना राममय दिसू लागले. ‘दाही दिशा रामची दिसे’ अशी त्यांची अवस्था झाली. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन रामरूप झाले. त्यामुळे ते भक्त न राहता रामरूपच झाले, समर्थ झाले. गुरू-शिष्य, भक्त-देव यांच्या ऐक्यरूपाचे विलोभनीय दर्शन आपणास त्यांच्या ‘पंचसमासी’तून घडते.
रामायणाचा प्रभाव

टाकळी येथे समर्थ रामदास स्वामींनी 12 वर्षे वास्तव्य केले. या काळात संपूर्ण ‘वाल्मिकी रामायण’ त्यांनी लिहून काढण्याचे तप केले. आपणास धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरात समर्थांच्या हस्ताक्षरातील शंकरराव ऊर्फ नानासाहेब देवांनी परिश्रमपूर्वक मिळवलेले व जपलेले संपूर्ण रामायण पाहावयास मिळते. (कै. देव म्हणतात - महाराष्ट्राचे केवढे भाग्य की, श्री समर्थांनी लिहिलेली 910 पत्रसंख्येची वाल्मिकीय रामायणाची संपूर्ण प्रत उपलब्ध व्हावी.)

समर्थभक्त श्री. देव यांना मिळालेल्या सात कांडांपैकी आदिकांड, आरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड ही पाच कांंडे प्रतिलिपी समर्थांनी माघ शके 1544 ते वैशाख शके 1546 या सव्वा वर्षात लिहिलेली आहेत आणि हा काळ म्हणजे समर्थांच्या टाकळी येथील 12 वर्षांच्या पुरश्चरणाचा काळ होता. याचा अर्थ टाकळी येथील तपकाळातच समर्थांनी ही पाच कांडे लिहिली होती. उर्वरित दोन कांडे, उत्तरकांड व अयोध्याकांड यांचा लेखनकाळ अनुक्रमे कार्तिक शके 1567 आणि शके 1571 असा आहे, हा काळ समर्थांचा मसूर, शहापूर या भागातील वास्तव्याचा आहे. यावरून समर्थांनी टाकळीच्या पुरश्चरण काळात वाल्मिकी रामायणाच्या पाच कांडांचे लेखन केले, हे सिद्ध होते. या रामायण प्रतिलेखनाचा समर्थांवर जो विलक्षण प्रभाव पडला, तो पुढे त्यांच्या संपूर्ण जीवनकार्यावर दिसून येतो.

प्रभू रामचंद्र म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. भगवद्गीतेत वर्णन केलेल्या दैवी गुणसंपदेचा मूर्तिमंत आदर्श. प्रभू रामचंद्रांचे धैर्य, वीर्य, तेजस्विता, बुद्धिवैभव, धर्मज्ञता, नीतीनिष्ठा, ज्ञानसंपन्नता, औदार्य, कर्म कुशलता, प्रजाहितनिष्ठा, सामर्थ्यशील सत्यवचनी बाणा, कृतज्ञता या दिव्यगुणांनी समर्थांचे मन अत्यंत प्रभावित झालेले होते. रामदासांच्या मूळच्या बालसुलभ संस्कारी भक्तीला आता रामायण वाचनाने व रामनामाच्या जपाने ज्ञानोत्तर भक्तीची परिपक्वता लाभली होती. रामाविषयीचा अनन्यभाव अधिक परिणत झाला होता. श्रीराम हे समर्थांचे केवळ इष्ट दैवतच नव्हे, तर श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू होते. वयाच्या आठव्या वर्षीच समर्थांना श्रीरामाचे दर्शन होऊन अनुग्रह लाभला होता. (संदर्भ ः समर्थ सेवा मंडळ प्रकाशित दासबोध 2009 पारायणप्रतमधील श्री समर्थांच्या जीवनातील ठळक घटना) आठव्या वर्षी लाभलेल्या अनुग्रहानंतर छोटा नारायण, नारायण न राहता त्याचक्षणी ‘रामदास’ झालेला होता. त्याला त्याची वाट रामकृपेने स्पष्ट आकळली होती. ‘आदित्ये अंधकार निवारे’ असे छोट्या नारायणाचे जीवन दिव्य प्रकाशाने उजळून गेले होते. ‘राम माझा जीव प्राण। काही नेणे मी रामावीण।’अशी त्यांची भावावस्था झालेली होती. तपाचरणाने, पुरश्चरणाने त्यांच्या या मूळच्या भावावस्थेला नवी झळाळी लाभली होती. या काळातील उपासनेचा स्वानुभव त्यांनी पुढे दासबोधात व अन्य अभंगादी साहित्यात विशद केलेला आहे. उपासनेबद्दल समर्थ म्हणतात -

राम उपासना ऐसी। ब्रह्मांडव्यापिनी पाहा।
राम कर्ता राम भोक्ता। रामरूप वसुंधरा॥ (मानपंचक)
‘उपासनेचा आश्रयो मोठा’ म्हणत त्यांनी रामोपासनेला सर्वोच्च प्राधान्य दिले.
नवविधभक्ती याचकारणे। जे आपण स्वये रामचि होणे।
स्वयेचि रामपणे ठाकणे। स्वानुभवे करोनी॥
उपासनेमध्ये नवविधभक्तीला ते सर्वोच्च स्थान देतात व या भक्ती योगे स्वये राम होणे आणि रामासारखेच सर्व प्रसंगी धीरोदात्तपणे उभे ठाकणे समर्थांनी समाजाला उपदेशिले आहे.


अनेक वेळा रामदर्शन

समर्थांना केवळ एकदाच नव्हे, तर अनेक वेळा सद्गुरू श्रीरामाचा साक्षात्कार झालेला आहे, असे डॉ. म. रा. जोशी (समग्र समर्थ साहित्य ः प्रस्तावना) म्हणतात. समर्थांनी लिहिलेल्या ‘पाचसमासी’मध्ये ‘ऐशा जी सद्गुरुरामा। अगाध तुमचा महिमा।’ असा सद्गुरू श्रीरामाचा महिमा वर्णन केलेला आहे. ‘दासबोध’, ‘आत्माराम’प्रमाणे समर्थांची 151 ओव्यांची ‘पंचसमासी’ एक प्रमुख रचना आहे. या पंचसमासीचे वैशिष्ट्य म्हणजे, या ओव्यातून श्रीराम साक्षात्कारानंतरची स्थिती समर्थांनी व्यक्त केलेली आहे.

वृत्ति मूळाकडे पाहे। तव रामचि दिसताहे।
स्तब्ध होवोनिया राहे। तवं रामचि दिसे॥
मन मुरडलिया वाटे। तव मार्गी राम भेटे।
मागे पुढे प्रगट। रामचि अवघा॥
दाहि दिशा अवलोकिता। रामचि भासे तत्त्वता।
वदन चुकवू जाता। सन्मुख श्रीराम॥
राम जालिया सन्मुख। कल्पांती नव्हे विन्मुख।
नेत्र झांकिता अधिक। रामचि दिसे।
मग विसरोनि पाहिले। तव ते रामचि जाले।
जीव सर्वस्वे वेधले। संपूर्ण रामे॥
रामेविण सर्वथा कांही। अणुमात्र रिते नाही।
दृश्य द्रष्टा दर्शन तेही। रामचि भासे॥
रामरूपी वेधले मन। तेणे राहिला कुलाभिमान।
पूर्व दशेचे लक्षण। पालटोनी गेले॥
ऐसा राम प्रगटला। दृश्य पदार्थ लोपला।
असतच नाहिसा जाला। सद्गुरु प्रतापे॥
श्रीराम दर्शनानंतर - साक्षात्कारानंतर रामदासांची स्थिती कशी झाली होती व त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, जागृतीत, स्वप्नी, सुषुम्नीत केवळ रामच राम दिसत होता. भक्ताचे, शिष्याचे, दासाचे इष्टदेवता रूप ऐक्य कशा प्रकारे होते आणि त्याचे अस्तित्व कसे गुरुरूप होते, याचे या ओव्या म्हणजे विलोभनीय दर्शन आहे. गुरू - शिष्याच्या या ऐक्यालाच ‘अद्वयभक्ती’ म्हणतात, ‘पराभक्ती’ म्हणतात. अशा स्थितीनंतर शिष्य-शिष्य राहत नाही. समर्थांचेही तसेच झाले. ते रामदास न राहता ‘श्रीरामोस्मि’ (मी रामच आहे) झाले. रामदासांचे ‘समर्थ’ झाले आणि त्यांनी परदास्यामुळे आत्मविस्मृत, निद्रिस्त झालेल्या हिंदू समाजात श्रीरामाच्या पुरुषार्थी रामकथेद्वारे देशभर ठिकठिकाणी अनेक मठ स्थापून जनजागरण केले.

देव मस्तकी धरावा। अवघाची हलकल्लोळ करावा।
मुलुख बुडवावा की बडवावा। स्वराज्या कारणे॥
असे त्यांच्या राष्ट्रजागरणाचे थोडक्यात जाज्वल्य स्वरूप होते.

विद्याधर ताठे
9881909775
(पुढील अंकात ः संत रामदास स्वामींचा ‘रघुवीर समर्थ ’भाग तिसरा)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121