मुंबई : द केरळ स्टोरी चित्रपट पहिल्याच आठवड्यात प्रदर्शित होऊन अनेक उच्चअंक गाठत होता. ७ व्या दिवशी सर्व सीमा बंधने तोडत एकूण ३८ राष्ट्रांत प्रदर्शित झाला. या सर्वच देशांतून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत होता परंतु चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांच्या मायभूमीत, बंगालमध्ये मात्र चित्रपटावर बंदी घातली गेली आहे. याबाबत सुदिप्तो सेन यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हात जोडून विनंती केली आहे.
ए एन आय ला दिलेल्या मुलाखतीत सुदिप्तो सेन म्हणाले, "मी हात जोडून ममतादीदींना सांगू इच्छितो की तुम्ही चित्रपट पाहा आणि तुम्हाला काही वाटले तर आमच्याशी बोला. आम्ही त्यांचे सर्व वैध मुद्दे ऐकून घेतल्यानंतर आमचे मुद्दे मांडू. ही लोकशाही आहे. माझी विनंती आहे आणि आम्ही वाट बघू. तर सुदीप्तो सेन म्हणाले, ‘सेन्सॉर बोर्डाने पास केल्यानंतर कोणतेही राज्य चित्रपटावर बंदी घालू शकत नाही. ही बंदी बेकायदेशीर होती. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, प्रत्येकाला चित्रपट पाहण्याचा अधिकार आहे, तुम्हाला तो आवडो किंवा न आवडो, पण तुम्ही जबरदस्तीने त्यावर बंदी घालू शकत नाही. आमचा न्यायालयावर विश्वास होता आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार.”
‘द केरला स्टोरी’ ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आधी ते काश्मीर फाइल्स घेऊन आले होते, आता ही केरळची कहाणी आहे आणि नंतर बंगाल फाइल्सची योजना आखत आहेत. भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहे? ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट चुकीच्या तथ्यांसह केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.”