मुंबई : कोल्हापुरमधील कृष्णा नदीच्या किनारी हजारो मासे मृत्युमुखी पडलेले दि. १० मार्च रोजी आढळुन आले. नदीमधील प्रदुषित पाण्यामुळे त्यांचा मृत्यु झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘कृष्णे’काठी मृत माशांचा अक्षरशः खच पडल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
मृत मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असुन ते मासे खाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडुन केले जात आहे. कृष्णा नदीपात्रात वाढलेल्या औद्योगिक वसाहत तसेच कारखाण्यांमुळे प्रदुषित पाणी विना प्रक्रिया सोडले जाते. या प्रदुषित पाण्यामुळे माशांचा जीव गेला आहे. २०२२ मध्ये जुलैच्या महिन्यात अशाचप्रकारे माशांचा तडफडुन मृत्यु झाला होता. तेव्हा प्रदुषित पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवले गेले होते मात्र, माशांचे मृत्युचे कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते. त्यानंतरही या घटनेची अनेकदा पुनरावृत्ती झाली.
ही घटना आता पुन्हा घडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असुन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोर मृत मासे फेकले आहेत.
शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानासमोर पाच ते सहा पोती मृत मासे फेकले आहेत. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर रात्रीच्या वेळी घोषणाभाजी करत आंदोलन केले आहे.