सत्ता गेल्यापासून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांचे सातत्याने पतन होताना दिसते. त्यात त्यांच्या सोशल मीडिया टीमने तर अनेकदा कहर केलाच. त्यातूनही त्यांची लोकप्रियता वाढण्याऐवजी सातत्याने घटतच गेली. पुलवामा हल्ला असो अथवा दहशतवाद्यांचे कृत्य काँग्रेसी नेहमीच शत्रू पक्षाला मदत होईल, असेच वर्तन करत असल्याचे वारंवार दिसून आले. आता हेच पाहा ना, गेल्या १७ दिवसांपासून ४१ मजूर एका बोगद्यात अडकून पडले होते. त्या मजुरांच्या सुटकेसाठी तांत्रिक स्तरावर दिवसाचे २४ तास प्रयत्न सुरू होते. त्यासाठी देश-विदेशातील तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यालयाचे या घटनेकडे बारकाईने लक्ष होते. तसेच आवश्यकतेप्रमाणे सूचना आणि मार्गदर्शनही केले. एकंदरीतच सर्वांच्या प्रयत्नातून अखेर त्या मजुरांचा सुटकेचा मार्ग सुकर झाला. या वृत्ताची दखल संपूर्ण जगाने घेतली. त्याचवेळी काँग्रेसच्या सोशल मीडियातील उपद्रवी मंडळींनी परिस्थितीचे गांभीर्य न पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी शोधली. ज्या बोगद्यात मजूर अडकून होते, त्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरव्या झेंड्यासह उभे असल्याचे खोटे छायाचित्र ’व्हायरल’ केले. या उपद्रवींना वाटले की, आपण यातून जास्तीत जास्त ’लाईक्स’ मिळवून, वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतो. परंतु, त्याचा उलटाच परिणाम झाला. सोशल मीडियावर पंतप्रधानांचे ते छायाचित्र ’व्हायरल’ होताच, नेटकर्यांनी सोशल मीडियावरील काँग्रेसी उपद्रवींना चांगलेच झोडपून काढले. काँग्रेसला विषयाचे गांभीर्य कधी कळेल, काँग्रेसचा बालिशपणा, परिपक्वतेचा अभाव, प्रवाहाविरोधात वर्तन, अशाप्रकारच्या टिप्पण्यांनी सोशल मीडिया दिवसभर गाजत होता. एकंदरीतच काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व आणि त्यांचे अनुयायी यांना राष्ट्रहिताचे गांभीर्य कालही नव्हते अन् आजही नाही. परिणामी दिवसेंदिवस त्यांची आचार आणि विचारांची पातळी घसरतच चालली आहे. त्यातूनच ते असे उपद्रव करत असतात. अर्थात, त्यातून त्यांच्या हाती काही एक पडत नाही. प्रवाहाविरुद्धच्या काँग्रेसच्या या मार्गाचा शेवट पतनाकडे जाणार, ऐवढे मात्र निश्चित!
मुंबईच्या लोकल रेल्वेत विनातिकीट प्रवास करणार्या मुलीला तिकीट तपासनीसाने खडसावताच, तिच्या प्रियकराला राग आला आणि त्याने कर्तव्यावरील टीसीला मारहाण केली. नुकतीच घडलेली बोरिवली स्थानकातील ही घटना पहिलीच आहे, असे नाही. यापूर्वीदेखील टीसीला मारहाण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर मोटरमनलाही काही टपोरींनी मारहाण केली. भाईगिरी करणारे हे टपोरी स्वतःला हिरो समजतात आणि हिरोगिरी करण्याच्या किंवा दाखविण्याच्या प्रयत्नात ते कर्तव्यावरील अधिकार्यांना मारहाण करतात. त्यात मग वाहतूक पोलीस, डॉक्टर, शासकीय कर्मचारी आदींचाही समावेश. एवढेच नव्हे तर ज्याठिकाणी मारहाण करणे शक्य नाही, तेथे तोंडाला काळे फासणे किंवा अंगावर शाई फेकण्याच्या घटनाही घडतात. एखादा अधिकारी कर्तव्यावर असताना त्याला नेमून दिलेले काम करत नसेल, तर त्याची तक्रार वरिष्ठांकडे करता येते किंवा त्याने गैरवर्तन केले तरी त्याची दखल घेऊन कडक कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, हिरोगिरी करणारी ही मंडळी लोकप्रियता वाढेल किंवा आपल्याला लोक चांगले म्हणतील, यासाठी अधिकार्यांना मारहाण करतात. टीसीला मारहाण करणारा युवक आपल्या प्रेयसीच्या नजरेत ‘हिरो’ होण्याचा प्रयत्न करत होता. वास्तविक त्याची प्रेयसी विनातिकीट होती. तिला तिकीट विचारणे म्हणजे कर्तव्याचे पालनच! तेच त्या प्रियकराला खटकले आणि त्याने केलेल्या मारहाणीचा परिणाम त्याच्यावर दंडात्मक कारवाईने झाला. दोन वर्षांपूर्वीची एक घटना नोंद घ्यावी अशीच आहे. ‘नो पार्किंग’मध्ये एका व्यक्तीने कार लावली, त्याची पत्नी आणि लहान मूल कारच्या बाहेरच होते. ज्यावेळी टोईंगवाले ती कार घेऊन जाऊ लागले, त्यावेळी ती महिला कारमध्ये बसली आणि तिने पोलिसांवरच उलट आरोप केले. घटनेची दुसरी बाजू न पाहता, ‘वाहतूक पोलिसाचा निर्दयीपणा’ असे वृत्त सर्वत्र झळकले. त्यातूनच त्या पोलिसाला निलंबित करण्यात आले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दडलेले सत्य बाहेर आले आणि त्या वाहतूक पोलिसाला पुन्हा कामावर घेतले. कर्तव्य करणारा कुणीही असो, त्याला रोखून भाईगिरी करणे कितपत योग्य, याचा विचार करायला हवा.
मदन बडगुजर