अलीकडेच प्रकाशित झालेले ‘स्वप्ने पेरणारा माणूस’ हे शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचे कार्यचरित्र हाती आले. हे पुस्तक वाचणे, हा एक आश्चर्य आणि आनंद यांचा अनुभव आहे, याचे श्रेय चरित्रनायकाच्या समाजपरिवर्तनाच्या तळमळीने झपाटलेल्या व्यक्तिमत्त्वास द्यावे की, लेखिकेच्या सहजसुंदर लेखनशैलीस व अभ्यासपूर्ण निवेदनास द्यावा, असाच प्रश्न मनात उमटला.
चरित्रनायकाच्या पानसे सर यांच्या लहानपणापासूनच्या व्यक्तिविकासास व जडणघडणीस लेखिकेने अर्थातच प्रारंभीच्या भागात महत्त्व दिले आहे. भरपूर खेळ, मस्ती आणि तेवढेच अनेकविध उपक्रमांत सहभागी होणे, स्वतः उपक्रम आखून ते पूर्णत्वास नेणे, अशा प्रकारचे हे बालपण व कुमारवय यात सर जसे रमले असतील, तसाच वाचकही ते वाचताना रमतो, इतके हे लेखन रंजक व मनोवेधक झाले आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण झाला पाहिजे, असे जणू बाळकडूच त्यांना मिळाले असावे, याचा प्रयत्न पूर्ण पुस्तकाच्या पानोपानी येतो, हे बीजारोपण या भागात झाल्याचे दिसून येते.
अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे ‘एसएनडीटी’मध्ये कार्यरत राहून विद्यापीठात विषयप्रमुख असता हे सर्व सोडून बालशिक्षणाच्या माध्यमातून सर समाजपरिवर्तनाकडे वळले, ते त्यांच्या शिक्षणविषयक तळमळीमुळे, सामाजिक जाणिवेमुळे आणि त्याला निमित्त झाले, ते ज्येष्ठ समाजकार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ अशा अनुताई वाघांमुुळे. अनुताईंचे सरांची आतेबहीण असणे, हा एक शुभयोगच. त्यांच्या कोसबाडमधील कार्यास मदतीचा हात देता-देता सर त्यांचा उजवा हातच झाले आणि मग पुढे आपला या ज्येष्ठ भगिनीच्या कार्यकतर्र्ृत्वाचा वारसा त्यांनी चालवला, वाढवला खूप-खूप पुढे नेला.
आदिवासींचे दारिद्य्र, अज्ञान, अनारोग्य आणि अभावग्रस्त जीवन यांमुळे मनात कणव दाटून येत असता, हे सारे दूर करण्यासाठी, त्यांच्यासाठी कार्य करण्याच्या संधीही चालून आल्या. मुळातच उत्साही, उद्यमशील असणारे सर एखादी संधी आली की, त्यांच्यातील या क्षमता अधिकच तीव्र आणि तीक्ष्ण होतात. आपले सारे बळ, सारी बुद्धी, अभ्यासूवृत्ती, कार्यशक्ती पणाला लावून ते त्या संधीचे सोने करण्यास सिद्ध होतात, असे उल्लेख प्रस्तुत कार्यचरित्रात वारंवार येतात आणि त्या दिंडीत ते आपले आप्त, मित्रपरिवार, विद्यार्थिनी आणि नवे-जुने परिचित यांनाही ओढून घेत आले आहेत, असे दिसते.
लोकसंग्रह करण्याच्या या विलक्षण क्षमतेमुळेच ते आदिवासी भागात इतकी वर्षे १९८२ पासून आजतागायत कार्यरत आहेत. एवढेच नाहीतर आदिवासींसाठी सुरू केलेले बालशिक्षणाचे कार्य त्यांनी आज महाराष्ट्रात जवळपास बहुतेक सर्व जिल्ह्यांत विस्तारले आहे. त्यांच्या काम करणार्या कार्यकर्त्यांमध्ये विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र कोकण इत्यादी सर्वच भागांतील मंडळी कार्यरत आहेत.
आदिवासीच काय पण एकूणच समाजपरिवर्तन होणे आवश्यक असेल, तर ते बालशिक्षणापासून सुरू झाले पाहिजे. सरांच्या या ठाम मतावर संपूर्ण पुस्तकाचा भर आहे. मुळात अर्थतज्ज्ञ असलेले पानसे १९८२-८३ पासून बालशिक्षण व रचनावादी शिक्षणपद्धती या कार्यात संपूर्णतः बुडालेले दिसतात. शिकणे ही मुलांची सहजप्रवृत्ती आहे. म्हणून शिकणे व शिकवणे आणि परीक्षापद्धत यात जखडलेली, शिक्षणपद्धती मोडून अनौपचारिक प्रकारे साधनांमधून शिकणे घडत जावे, यासाठी त्यांनी सारा शिक्षणव्यवस्थेचा विचार पिंजून काढून, त्यातला धागा मोकळा करून अत्यंत स्पष्ट आणि सुलभ अशी वैचारिक मांडणी केली आहे. याचा सविस्तर लेखाजोखा पुस्तकात समाविष्ट केला आहे.
लेखिकेने मांडलेले हा कार्यप्रवासाचा, समाजपरिवर्तन विकासकार्य शिक्षणातील क्रांतिकारक बदलांचा प्रपंच हा खरोखर विलक्षण आहे. एखादा मनुष्य आपल्या बुद्धीने, श्रमांनी, तळमळीने, अदम्य उत्साहाने किती आयुष्ये बदलू शकतो, घडवू शकतो, उभी करू शकतो, याचे हे उदाहरण प्रेरणादायक आहे.
अखेर इतकेच की शिक्षण, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, शिक्षण पद्धती, शिक्षण व्यवस्था, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि या सर्वांचे धोरण ठरवणारे अध्वर्यू या सार्यांसह सर्वच बालकांचे पालक शिक्षक, प्रशिक्षक, मुख्याध्यापक, व्यवस्थापक अशा सर्वांनी वाचावे म्हणजेच प्रत्येक घरोघरी वाचले जाते, असे हे एक अमूल्य पुस्तक आहे. विशेषतः सध्या माजलेल्या शिक्षणमहर्षींच्या बाजारू शिक्षणव्यवस्थेत गांजलेल्या सर्वांनी तर ते अवश्य वाचावे.
डॉ. मीरा केसकर
९२२१३२४७३७