बोर्डाची परीक्षा तोंडावर येऊन ठेपली आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असणारच! मग त्यासाठी अपार कष्ट आणि मेहनत घ्यावीच लागणार. कोरोनाने परत डोके वर काढले असल्याने आरोग्याची उत्तम काळजी घेऊन परीक्षेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा, बारावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी आपल्या दिनचर्येचे, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
बारावीच्या परीक्षेस आता अवघा महिनाच शिल्लक. त्यामुळे अभ्यास करताना तो साहजिकच नियोजनबद्ध करावा. जवळपास सगळच ‘पोर्शन’ आता महाविद्यालय आणि क्लासेसमध्ये पूर्ण झालेला असेल. त्यामुळे प्रत्येक विषयाची उजळणी केली पाहिजे. जो एक महिना बाकी आहे, त्याचे वेळापत्रक तयार करून सगळ्या विषयांना योग्य ‘वेटेज’ देऊनच विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. अभ्यासासाठी योग्य नियोजन आखल्यामुळे सगळ्या विषयाचा अचूक आणि सखोल अभ्यास पूर्ण होईलपहाटेची वेळ ही ब्रह्म मुहूर्ताची असते. त्यावेळी सर्वत्र शांतता ही असते. तेव्हा पहाटे केलेला अभ्यास लवकर लक्षात राहतो. मन शांत आणि एकाग्र चित्ताने अभ्यास केल्यास तो दीर्घकाळ लक्षात राहतो. सकाळी उठून १५ ते २० मिनिटे शांत सुमधूर संगीत ऐकून ध्यान केले, तर मन एकाग्र आणि शांत होते. त्यामुळे आपला दिवसही छान जातो आणि केलेला अभ्यासही नीट लक्षात राहतो.
विद्यार्थ्यांनी परीक्षेचा मनावर कोणताही ताण न घेता आनंदी राहावे आणि सात ते आठ तास झोप पूर्ण घ्यावी. परीक्षा जवळ आलेली असेल तेव्हा आंबट, तेलकट, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे. शरीरास हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी. अभ्यास करत असताना काही शंका आल्यास लगेचच शिक्षकांना विचारून त्या शंकांचे निरसन करावे. भाषांचा अभ्यास व्यवस्थित करावा. जास्तीत जास्त लेखनाचा सराव करून हस्ताक्षर चांगले काढावे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव करावा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याने परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येतात, याची काठीण्य पातळी समजते आणि प्रश्नपत्रिका जर वेळ लावून सोडवल्या, तर तुम्हाला एक अंदाज येतो की, परीक्षेला लेखनाचा वेग किती असावा आणि जर लेखनाचा वेग कमी असेल, तर रोजच्या सरावाने वेग वाढवता येईल म्हणून शक्यतो वेळ लावूनच प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे.
पेपर लिहिताना कोणती काळजी घ्याल?
१) उत्तर पत्रिकेवरील माहिती अचूक भरावी. आपला सीट नंबर योग्य टाकावा आणि परत एकदा तपासून घ्यावा.
२) प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती आधी व्यवस्थित वाचून घ्यावी.
३) शांत व एकाग्र चित्तेने पेपर लिहिण्यास सुरुवात करावी.
४) प्रश्न व उपप्रश्न यांचा क्रमांक अचूक लिहावा.
५) नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करावा.
६) हस्ताक्षर चांगले काढावे.
७) पेपर प्रेझेंटेशन व्यवस्थित ठेवावे कुठेही इतरत्र खाडाखोड करू नये.
८) पुरवण्या घेतल्या असतील, तर त्या मुख्य उत्तर पत्रिकेला व्यवस्थित बांधाव्या.
९) पुरवणी बांधली की संपूर्ण पेपर परत एकदा तपासून घ्यावा.
अशाप्रकारे परीक्षेला जाताना व पेपर लिहिताना काळजी घेतली, तर परीक्षेमध्ये तुम्ही नक्कीच चांगल्या मार्कांनी यशस्वी व्हाल. ऑल द बेस्ट!
परीक्षेला जाता जाता...
१) पेन, पेन्सिल, पट्टी, रायटिंग पॅड हे साहित्य सर्व व्यवस्थित घेतले आहे का, ते एकदा नीट तपासून घ्यावे. सोबत जास्तीचे पेन जवळ ठेवावे.
२) पेपरला जाताना परीक्षेचे हॉल तिकीट व आयकार्ड हे जवळ असणे महत्त्वाचे.
३) पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
४) ज्या ठिकाणी पेपर आहे तेथे जाऊन आपला ब्लॉक नंबर शोधून आपला कोणत्या बेंचवर नंबर आहे ते व्यवस्थित शोधावे. घाई घाई करू नये. मन शांत ठेवावे.
-दीपाली पवार