‘मेक इन इंडिया’त भारताचे ‘स्मार्ट’ पाऊल

    19-Jan-2023
Total Views | 63
 
Make in India
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचा सुवर्णकाळ सुरू झाला, असे नुकताच बोलताना सांगितले. त्यांच्या नेतृत्वात प्रगतीचा आलेख वाढतच आहे आणि त्याचा लाभ नागरिकांना तर होतोच आहे, पण देशाच्या आर्थिक वृद्धीसाठीदेखील तो तितकाच पोषक आहे. ते कसे याचाच हा उहापोह...!
 
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी येथील बहुतांश जनतेच्या मानगुटीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाश्चिमात्त्य संस्कृतीला अंगीकारण्याचे भूत मुद्दाम बसवून ठेवण्यात आले होते आणि तत्कालीन सरकारची धोरणेही त्यासाठीच पूरक होती. येथील तरुणाईच्या बुद्धिमत्तेचा उपयोगदेखील इतर राष्ट्रांनी घेतला आणि स्वतःचेच खिसे भरुन घेतले. मात्र, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर ही पाश्चिमात्त्य संस्कृती स्वीकारण्याची मानसिकता हळूहळू बदलली आणि आता आपल्याच देशातील तरुण आपल्याच देशात उपयुक्त ठरेल आणि इतर राष्ट्रेदेखील त्याचा स्वीकार करतील, असे तंत्रज्ञान विकसित होताना दिसते. त्यामुळे इतर देशांचे नवं काही स्वीकारण्याची मानसिकता बदलू लागल्याचे आश्वासक चित्र निर्माण झाले. त्याचे सकारात्मक आणि देशाला लाभदायी असे परिणामही दिसू लागले. हा ‘स्मार्ट’ उपाय यशस्वीपणे अमलात येण्यास कारणीभूत ठरले ते ’मेक इन इंडिया’ हे धोरण! या धोरणातून सुरू झालेली भारताची वाटचाल एक ’स्मार्ट’ पाऊल पुढे, अशा धाटणीची आज बघायला मिळत आहे.
 
 
मोबाईल फोन आल्यापासून जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने यावर मक्तेदारी प्रस्थापित करण्याची एकही संधी दवडली नाही. दुर्दैवाने त्याचा लाभ आकर्षणाला सहज भूलणारी भारतीय जनता सर्वाधिक प्रमाणात घेऊ लागली आणि चीनची तिजोरी आयतीच फुगू लागली. याला कारण होते, आधीच्या सरकारचे कुचकामी धोरण, जिथे भारतीय तंत्रज्ञान विकसित करण्यास फारसा वाव तर नव्हताच. मात्र, भारतातील पैसादेखील हा देश सहजगत्या गिळंकृत करीत होता.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ‘डिजिटल हब’ बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकीत इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच मोबाईल फोन भारतातच निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह’ (पीएलआय) आणली आणि यानंतर भारतात जागतिक स्तरावर मोबाईल फोननिर्मितीत आश्वासक वाढ झाली. यामुळे चिनी उत्पादनांना झटका बसलाच, शिवाय भारतीय लोकांच्या मानगुटीवर असलेले पाश्चिमात्त्य वस्तू वापरण्याचे भूतदेखील हळूहळू उतरू लागले. भारतात आता मोबाईल फोन आणि त्याला लागणारी उपकरणे जसे की, चार्जर, केबल, बॅटरी, चिप्स स्क्रीन इत्यादीची निर्मिती होत आहे. ’मेक इन इंडिया’चे हे ‘स्मार्ट’ पाऊल समजले जाते. भारतातील मोबाईल वापरणारा व्यक्तीदेखील आता भारतीय बनावटीचा मोबाईल फोन दिमाखात मिरवतो. यामुळे रोजगार निर्मिती आणि कौशल्य बळाचा योग्य वापर भारतात होऊ लागला आणि देशातील पैसा देशाच्याच प्रगतीसाठी उपयोगात येऊ लागला, ही सकारात्मक बाब अधोरेखित करणे आवश्यक आहे.
 
 
जागतिक पातळीवर 2021-22 या आर्थिक वर्षात आधीच्या तुलनेत मोबाईल फोन निर्मितीत 27.15 टक्के वृद्धी नोंदवण्यात आली. भारताने ‘जीपीएलआय’ योजना सुरू केली, त्याचा लाभ निर्मात्या कंपन्यांना ’इन्सेंटिव्ह’च्या रुपात मिळू लागला. त्यामुळे या वस्तूंच्या निर्मितीत भारतीय कंपन्या उत्साहाने उतरल्या. परिणामी, मार्च 2020 नंतर भारतात ’इलेक्ट्रॉनिक्स’ निर्माण आणि निर्यातीच्या 314 युनिट स्थापण्यास मंजुरी मिळाली, यात जवळपास 217 युनिटमध्ये 31 हजार, 416 कोटीची गुंतवणूक करण्यात आली. याचा परिणाम असा झाला की, 2022-23च्या पहिल्या तिमाहीत या वस्तूंच्या एकूण निर्यातीत 24.5 टक्के वाढ झाली. इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या गेल्या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीत 1 लाख, 16 हजार, 894 कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात भारताने केली आहे, ती आधीच्या वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत 42 टक्के अधिक आहे.
 
 
केंद्राच्या योजनेचा लाभ मिळवीत आणि चीनच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी असल्याने मोबाईल निर्मिती करणार्‍या कंपन्या भारतात सक्रिय तर झाल्याचे मात्र यामुळे कुशल मनुष्यबळ येथे प्रभावित झाले आणि रोजगार निर्मितीला चालना मिळाली.
उदाहरणच द्यायचे झाले, तर अ‍ॅपलचे कंत्राटी उत्पादक आणि घटक पुरवठादारांनी भारतात पाच हजार नोकर्‍या निर्माण केल्या आहेत. अन्य कंपन्या आकर्षित झाल्या. यामुळे आपला भारत हा जागतिक पातळीवर ’स्मार्टफोन’ निर्मितीच्या क्षेत्रात दिग्गज कंपन्यांचे ‘हब’ बनू लागला. ‘आयफोन’साठी लागणारे घटक तयार करण्यासाठी ‘टाटा समूहा’ने हरसौरमध्ये 500 एकरचा प्लांटही उभारला आहे. येथे सुमारे दहा हजार कामगार आहेत. पुढील 18 महिन्यांत ही संख्या 45 हजारांपर्यंत वाढवण्याची ‘टाटां’ची योजना आहे. ‘टाटा समूह’ ‘विस्ट्रॉन ग्रुप’सोबत भारतात ‘आयफोन’ बनवण्याबाबत चर्चा करत आहे. केवळ मोबाईलनिर्मितीत नव्हे, तर आता विदेशात वापरल्या जाणार्‍या वस्तूची निर्मिती भारतात होत आहे. यात ‘फोर्ड इको स्पोर्ट’ची निर्मिती चेन्नईत, हेलिकॉप्टर ‘मरीन वन’च्या केबिनची निर्मिती भारतात होत आहे. ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनण्याच्या दिशेने भारताची पडणारी ही पावले ‘स्मार्ट’ वाटचाल आहे, हे मान्य केले पाहिजे.
 
 
यातील एकूणच आशय हा आहे की, भारताची ही ‘मेक इन इंडिया’च्या अनुषंगाने ‘स्मार्ट’ कामगिरी होत आहे. ती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात लक्षणीय तर आहेच. मात्र, आता आपण खरोखरच सुवर्णकाळात वाटचाल करीत आहोत, हे सिद्ध करणारीदेखील आहे.
 
 
 
 
 -अतुल तांदळीकर
 
अग्रलेख
जरुर वाचा
लॉस एंजेलिस पेटले! ट्रम्पच्या

लॉस एंजेलिस पेटले! ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे आंदोलन चिघळले; ४४ जण ताब्यात

अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे स्थलांतरित समुदाय आणि यूएस इमिग्रेशन व कस्टम्स एन्फोर्समेंट यांच्यातील संघर्ष हिंसक वळणावर गेल्याचे निदर्शनास येते आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेले निदर्शन हाताळणे कठीण होत चालल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निदर्शकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्याचवेळी, निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक आणि फटाके फेकले. संपूर्ण परिसरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्तपणे नॅशनल गार्ड तैनात केल्यानंतर निदर्शनांना हिंसक वळण आल्याचे समोर येते आहे. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121