दिग्दर्शनातील ‘राजा’ माणूस....

    20-Feb-2021
Total Views | 193

8888 _1  H x W:
 
 
 
व्यक्तिगत आणि सामाजिक मूल्ये हे चित्रपटातील बलस्थान जपणारे अभिनेते-दिग्दर्शक म्हणजेच राजा परांजपे....
 
 
 
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बसवलेल्या माधवराव जोशी यांच्या ‘विश्ववैचित्र्य’ नाटकात एका कलावंताने एक विनोदी भूमिका केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तारुण्यात आले, तो मूकपटांचा काळ होता. अशा मूकपटांना पार्श्वसंगीत देण्याच्या इराद्याने या कलावंताने चित्रपटगृहामध्ये प्रवेश मिळवला आणि तेथून या माध्यमाशी त्यांचा संबंध जुळून आला. पडद्यावर पाहिलेली उत्तमोत्तम चित्रपटांतील पात्रे पाहून ते भारावून जात आणि त्यातून त्यांची अभिनयाची आवड अधिकच वाढत गेली. या काळात त्यांनी एस. व्ही. वर्तक यांच्या ‘लपंडाव’ नाटकात ‘वाटाणे’ नावाचे विनोदी पात्र रंगवले. यानंतर जोमाने पुढे येणार्‍या मराठी चित्रपटसृष्टीकडे ते आकर्षित झाले आणि त्यांनी बाबूराव पेंटर यांच्या ‘सावकारी पाश’मध्ये पहिली भूमिका केली. या यशस्वी पदार्पणानंतर या कलाकाराने पेंटर यांच्याच ‘प्रतिभा’ मध्ये चकण्या मंडूकचे काम केले. यामध्ये केशवराव दाते आणि दुर्गा खोटे यांच्याही भूमिका होत्या.
 
 
भालजी पेंढारकरांच्या ‘गोरखनाथ’मधील या कलाकाराने यांचा विनोदी भोलेनाथ चांगलाच गाजला. यामध्ये त्यांनी दोन गाणीही गायली. अशा प्रकारे, चित्रपटसृष्टीशी जवळीक साधलेली असताना त्यांना चित्रनिर्मितीच्या विविध बाबी समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली नसती तरच नवल होते. म्हणून त्यांनी भालजी पेंढारकर आणि मास्टर विनायक, तसेच ‘नजम नक्वी’, ‘शोरी’, ‘वेदी’ या हिंदी चित्रपट दिग्दर्शकांना साहाय्य केले. जवळपास ४० वर्षांची चित्रसंपदा, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक तसेच क्वचित प्रसंगी गायक अशा विविध क्षेत्रांत ८० मराठी आणि हिंदी चित्रपटांशी आलेला संबंध अशी बहारदार कारकिर्द असलेले अभिनेते-दिग्दर्शक म्हणजेच राजा परांजपे...
 
राजा परांजपे यांचा जन्म २४ एप्रिल, १९१० रोजी झाला होता. राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो मात्र नट वा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना लहानपणपासून संगीताचं वेड होतं. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थीदशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना लागले. पण, रोज रोज नाटक, सिनेमा पाहायचं म्हटलं तर पैशाची चणचण त्यांना भासू लागली. पण, त्यासाठी त्यांच्या संगीतवेडातूनच त्यांना एक नवीन मार्ग सापडला. राजा परांजपे यांची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना ‘लपंडाव’ या नाटकात अचानक संधी मिळाली. या नाटकातील एक कलाकार अचानक नाटक सोडून गेला. दात्ये यांनी त्याच्या जागी राजा परांजपे यांना संधी दिली, त्या संधीचे त्यांनी चीज केले. पुढे केशवराव दात्ये यांनीच त्यांना ‘सावकारी पाश’ या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. त्यानंतर ते भालजी पेंढारकर यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. ‘सावकारी पाश’मधील भूमिकेनंतर ते छोटी-मोठी कामे करत होते. पण, खर्‍या अर्थाने ते दिग्दर्शक झाले ते १९४८ मध्ये ‘बलिदान’च्या माध्यमातून.
 
 
 
मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील सर्वात यशस्वी त्रयी म्हणजे राजा परांजपे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर होय. ग. दि. माडगूळकर यांच्या पटकथेवर राजाभाऊ आपल्या दिग्दर्शन कौशल्याचा असा काही प्रभाव पाडत की, तो चित्रपट वेगळाच होऊन जाई. शब्दप्रभू माडगूळकरांनी राजा परांजपे यांना परिसाची उपमा दिली होती. तुमच्या पटकथेवर इतरांना राजा परांजपेच्या इतके यश का नाही मिळवता आले, असे त्यांना एकदा विचारले असता गदिमा म्हणाले, “राजाभाऊ हे परिसासारखे आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखी किमया इतरांना कशी जमेल?” राजा परांजपे यांनी केवळ मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले असे नाही, तर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चार हिंदी चित्रपटांनाही चांगले यश मिळाले. त्यातील ‘दो कलियाँ’ हा चित्रपट तर प्रचंड यशस्वी ठरला होता. आज आपण अनेक दिग्दर्शकांच्या वैविध्यपूर्ण शैलींबद्दल बोलत असतो. पण, कोणताही गाजावाजा न करता, राजाभाऊ वेगवेगळ्या प्रकृतीचे चित्रपट त्या काळात दिग्दर्शित करत होते आणि यश मिळवत होते. ‘पुढचं पाऊल’, ‘ऊन पाऊस’, ‘देवघर’ यासारखे कलात्मक चित्रपट राजा परांजपे यांनी यशस्वी करून दाखवले होते.
 
 
राजा परांजपे यांनी दिग्दर्शन केले आणि ज्यामध्ये त्यांनी स्वतः काम केले अशा ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाची सगळीकडेच वाहवा झाली, त्याचबरोबर या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते. अर्थात, हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता. ‘पाठलाग’ या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. त्याचबरोबर या चित्रपटाचे यश पाहून हिंदीमध्येही त्याचा रीमेक केला गेला. ‘मेरा साया’ नावाने हा चित्रपट हिंदीत आला. नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजा परांजपे यांचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. भूमिका कोणतीही असो, मग ती विनोदी असो किंवा कौटुंबिक अथवा कारुण्यमयी, राजाभाऊ त्या भूमिकेला आपला रंग देत असत. हेच कौशल्य त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करताना ठेवले, त्यामुळे एकाच वेळी भिन्न प्रकृतीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही त्यांनी त्यामध्ये लक्षणीय यश मिळवले. व्ही. शांताराम यांनी त्यांची तुलना करताना त्यांना सत्यजित रे यांच्यापेक्षा अधिक गुण दिले होते. कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना ते त्या चित्रपटाचेच होऊन जात असत, त्यावेळी दुसरा विचारच त्यांना सुचत नसे.
 
 
स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी चित्रसृष्टीचे शिल्पकार म्हणून विख्यात चित्रकर्ते राजाराम दत्तात्रेय परांजपे यांचा नेहमीच उल्लेख करण्यात आला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात लहानसहान भूमिका करीत राजाभाऊंनी स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये एक महत्त्वाचा चित्रकर्ता म्हणून मान्यता मिळवली. या काळामध्ये राजा परांजपे यांनी मराठी चित्रपटांना आवश्यक असलेले नावीन्य तर दिलेच; पण त्याचबरोबर विषय आणि सादरीकरण यातही ताजेपणा आणला. रेखीव पात्ररचना आणि कल्पनापूर्ण दिग्दर्शन यांनी त्यांचे चित्रपट समृद्ध असत. राजाभाऊंना मास्टर विनायकांच्या विनोदपटांची परंपरा पुढे चालविल्याचे श्रेय दिले जाते. पण, परांजपे यांचा विनोद हा चार्ली चॅप्लीनच्या शैलीशी अधिक मिळताजुळता आहे. रहस्य, उपहास, मनोविश्लेषण अशा अनेक कथाविषयांवर त्यांनी चित्रपट केले आणि त्यांपैकी काही तर मराठीमध्ये प्रथमच निर्माण झाले होते. आपल्या चित्रपटांबद्दल कमीत कमी व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या मोजक्या भारतीय चित्रकर्त्यांपैकी ते एक होत. कामुक, हिंसक आणि अश्लील दृश्ये दाखवून प्रेक्षकांची मने चाळवण्यापेक्षा विनोद, उपहास, कल्पनारम्यता, तसेच मौज यांतून त्यांचे मृदू मनोरंजन करणे त्यांनी पसंत केले.
 
 
राजा परांजपे यांना ‘बलिदान’ (१९४७) या पहिल्या वहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळाली. यानंतर पुढच्याच वर्षी आलेल्या ‘जीवाचा सखा’ने एका बाजूला रौप्यमहोत्सव साजरा केला, तर दुसर्‍या बाजूला राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांना एकत्र आणले. या त्रिकुटाने नंतरच्या काळात अनेक महत्त्वाचे चित्रपट दिले. ‘पुढचं पाऊल’ (१९५०) चित्रपटाने परांजपे यांच्या कारकिर्दीची पुढची दिशा ठरवली. यामध्ये गदिमा आणि पु. ल. देशपांडे यांनी भूमिका केल्या होत्या. पण, त्याहीपेक्षा लोकांच्या लक्षात राहिला तो परांजपे यांनी रंगवलेला कोकणी सुहृद चिपळूणकर. यानंतरचा काळ म्हणजे, राजाभाऊंच्या उत्तुंग प्रतिभेचे आणि प्रतिमेचे दर्शन घडवणारा ठरला. ‘पेडगावचे शहाणे’ (१९५२) मध्ये त्यांनी एकाच घरात राहून वेगवेगळ्या जीवनशैलींमुळे कुटुंबप्रमुखाला जेरीस आणणारी पात्रे सादर केली. यामध्ये त्यांना वठणीवर आणणारे वेडे आणि शहाणे काका अशा राजाभाऊंच्या दुहेरी भूमिकांचे आणि कल्पक दिग्दर्शनाचे खूपच कौतुक झाले. या यशाने प्रेरित होऊन त्याच वर्षी राजाभाऊंनी ‘लाखाची गोष्ट’ अधिक आत्मविश्वासाने सादर केला. यामध्येही उपहास होता आणि त्याला कारुण्याचीही झालर होती. यातील रेसकोर्स आणि स्वप्नदृश्यांची खूप चर्चा झाली.
 
 
दरम्यानच्या काळात, करदार स्टुडियोने ‘चाचा चौधरी’ (१९५३) या ‘पेडगावचे शहाणे’च्या हिंदी आवृत्तीची निर्मिती केली आणि अर्थातच यातील दुहेरी भूमिका आणि दिग्दर्शन राजाभाऊंनी केले. राजा परांजपे यांच्या ‘ऊन पाऊस’ (१९५४)मध्ये त्यांच्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने आणखी मोठी उंची गाठली. आपल्या काळाच्या पुढे जाऊन आईवडील आणि मुले यातील संघर्ष त्यांनी अतिशय उत्कटतेने सादर केला. म्हातारपणी झालेली पती-पत्नीची ताटातूट आणि त्यांची अगतिकता दाखवताना परांजपे यांच्या मानवी स्वभावाच्या जाणिवांचे दर्शन घडले. ‘गंगेत घोडं न्हालं’ (१९५५) हा एक मजेदार फार्स होता. त्याचे रसिकांनी आणि समीक्षकांनी चांगले स्वागत केले. याच वर्षी भारतीय चित्रकर्त्यांच्या अधिकृत शिष्टमंडळासहित राजाभाऊ चीनला गेले आणि तेथील चित्रसृष्टीची माहिती घेतली. त्यांच्यासमवेत बलराज साहनी, बिमल रॉय, चेतन आनंद, पृथ्वीराज कपूर असे मातब्बर कलाकारही होते. यानंतर यशस्वी दाक्षिणात्य निर्माते ए. व्ही. मैयप्पन यांच्यासाठी राजभाऊंनी ‘बाप बेटे’ (१९५९)चे दिग्दर्शन केले.
 
 
 
चेन्नई येथे निर्मिती झालेल्या या चित्रपटात अशोककुमार, श्यामा, कन्हैयालाल यांनी भूमिका केल्या, तर रमेश देव यांचे हिंदी चित्रसृष्टीत पदार्पण झाले. चेन्नईहून परत आल्यानंतर राजा परांजपे यांनी ‘श्रीपाद चित्र’ ही संस्था सुरू करून स्वत:च्याच कथेवर आधारित ‘जगाच्या पाठीवर’ (१९६०)चे निर्मिती-दिग्दर्शन (आणि त्यात अभिनयही) केले. नाव नसलेल्या पात्राविषयीच्या या चित्रपटात राजाभाऊ, गदिमा आणि सुधीर फडके पुन्हा एकत्र आले. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटानंतर राजा परांजपे यांनी ‘सुवासिनी’ (१९६१) या सर्वांगसुंदर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. दरम्यान, बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ (१९६३) मध्ये परांजपे यांनी सदाशिवबाबू या उतारवयातील पोस्टमास्तरची भूमिका केली. संगीताची जाण असलेल्या परांजपे यांनी वैष्णव पदे गाऊन स्वावलंबी विचाराची ही प्रतिष्ठित भूमिका अधिकच रंगतदार वठवली. याच वर्षी, चार्ली चॅप्लीनच्या ‘द किड’ (१९२१) वर आधारित ‘हा माझा मार्ग एकला’चे दिग्दर्शन केले. या वेळी राजाभाऊंचे वय ५३ होते आणि त्यांनी केसांचा टोप वापरून नायकाची भूमिका सजीव केली.
 
 
रहस्यपट म्हणजे भीतिदायक वातावरण, एकाकी इमारती, भयावह चेहरे, खून अशा कल्पना मोडीत काढत राजाभाऊंचा हा चित्रपट इतका लोकप्रिय ठरला की, राज खोसला यांनी ‘मेरा साया’ ही त्याची हिंदी आवृत्ती काढली. शिवाय याच्या तामिळ आणि तेलगू भाषेतही आवृत्त्या निघाल्या, त्या वेगळ्याच. ‘पडछाया’ (१९६५) द्वारे राजा परांजपे यांनी एक गूढकथा सादर केली. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या पितृत्वाबद्दल शंका असलेल्या एका डॉक्टरचे मनोविश्लेषण मांडले. एक वृद्ध माणूस आणि तरुण मुलगी यांच्यातील प्रेमाचा नाजूक दुवा सादर करणारा ‘आधार’ (१९६९) हा राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट. यानंतर त्यांनी काही मराठी तसेच हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या. त्यांचेच शिष्य राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘या सुखानो या’ (१९७५) मध्ये परांजपे यांनी आपली अखेरची भूमिका केली.
 
 
व्यक्तिगत आणि सामाजिक मूल्ये हे परांजपे यांच्या चित्रपटातील बलस्थान असे. त्यांनी इतर दिग्दर्शकांबरोबर केलेल्या चित्रपटांतूनही ही गोष्ट आवर्जून असे. परांजपे यांना आपली संस्कृती, कुटुंबपद्धती, समाज याबद्दल प्रचंड आदर होता आणि तो त्यांच्या चित्रपटांतून प्रतिबिंबित होत असे. त्यांच्या पात्रांमधील संवाद हा बहुधा ओघवते संभाषण वाटे. त्यामुळे त्यातून एका क्षणाला हासू तर दुसर्‍या क्षणाला आसू, असेही होऊ शके. एक यशस्वी चित्रकर्ता म्हणून कारकिर्द असलेल्या राजा परांजपे यांना प्रेक्षक आणि समीक्षक यांनी भरभरून दाद दिली. केवळ मराठीच नव्हे, तर इंग्रजी वृत्तपत्रांतूनही त्यांच्याबद्दल रकानेच्या रकाने भरून मजकूर प्रसिद्ध होत असे. आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी दोन राष्ट्रीय आणि चार राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त केले. एकूण २७ चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या या माणसाचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते. अनेकांना चित्रपटसृष्टीत उभे केलेल्या या दिग्दर्शकाने आपल्या काळात अक्षरशः राजासारखे राज्य केले. शरद तळवलकर, सीमा आणि रमेश देव, राजा गोसावी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर व सचिन पिळगावकर यांच्यात एक समान बाब कोणती असे विचारले, तर चटकन सांगता येईल ती म्हणजे, ही सर्व मंडळी एका स्कूलची आहेत. स्कूल अर्थातच राजा परांजपे यांचं. या मंडळींच्या कारकिर्दीला सर्वाधिक आकार दिला तो राजा परांजपे या कसबी दिग्दर्शकाने. राजा परांजपे यांचे ९ फेब्रुवारी, १९७९ रोजी निधन झाले. अशा दिग्गज कलावंताला मानाचा मुजरा...
 
 
- आशिष निनगुरकर
 
९०२२८७९९०४
अग्रलेख
जरुर वाचा
१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

१४ ऑगस्ट २०२५ रोजी दादर स्टेशनवरून ०१०२७ रोजी चार्टर्ड सेकंड एसी कोचद्वारे अयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा

या टूरमध्ये काशी विश्वनाथ मंदिर, रामजन्मभूमी, हनुमान गढी, त्रिवेणी संगम आणि इतर पर्यटन स्थळे समाविष्ट केली जातील भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नवरत्न' सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चार्टर्ड कोचद्वारे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग यात्रा सुरू करून आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे. ही विशेष तीर्थयात्रा १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादरहून निघणाऱ्या भारतातील तीन सर्वात आदरणीय शहरे - वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121