ll श्री शंकर ll
जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥
गीता अ.७-१६
म्हणौनि भक्तु एकु पाहीं ।
ज्ञानिया जो l
ज्ञानदेव अ.७ ओवी १११
माघ शु.दशमी ही मराठी संस्कृतीच्या जिव्हाळाची तिथी कारण मराठी संस्कृतीचा व वारसाच्या अविभाज्य भाग म्हणजे वारी आहे. पंढरपूरच्या तीन वा-या फार महत्वाच्या. पहिली आषाढी, दुसरी कार्तिकी व तिसरी माघी या माघीवारीचे महत्त्व म्हणजे संतश्रेष्ठ तुकोबारायांना या माघातील शुद्ध दशमीस गुरूपोदेश झाल्याची समस्त श्रद्धावंत भाविकांची तशीच परंपरेची श्रद्धा आहे. अशा या पवित्र तिथीस तीर्थस्वरुप पू.गार्गीताई नारायण चरणी विलीन झाल्या ही घटना ईश्वरीइच्छा असणार असे म्हणावे लागेल. ज्ञानयुक्त भक्ती आणि गुरुभक्तीचा परमोच्च आदर्श म्हणजे पू.अक्कांचा जीवनपट होय.
भगवंताने गीतेत भक्तांचे चार प्रकार सांगताना ज्ञानीभक्त हा माझ्या सर्वात जवळचा आणि मला जाणणारा आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. पू.ताईंची गुरुभक्ती आणि वरदनारायणाप्रती असलेली त्यांची अनन्य भक्ती आपण सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवली. भक्तीला अधिकारप्राप्तीत्वाच्या लौकिकाची गरज नसते तर त्यासाठी लागणारी निष्ठाच हे सगळे पूर्ण करते. उदाहरण द्यायचे आद्य शंकराचार्य व तोटकाचार्य, निवृत्ती व ज्ञानेश्वर, रामकृष्ण व विवेकानंद, दासगणु महाराज व स्वामी वरदानंद भारती तसेच स्वामी वरदानंद भारती व गार्गीताई या गुरुशिष्यांच्या जोडी बद्दल म्हणता येईल. या जोडीतील प्रत्येक शिष्यांनी म्हणजे तोटकाचार्य ,ज्ञानोबाराय, विवेकानंद, अनंतमहाराज आणि आता गार्गीताई यांनी आपल्या आचार-विचारांनी आपल्या गुरुंचे महद् पद वाढवून दाखविले आणि त्याला अधिक विशाल केले. गुरुंचा उपदेश घेणे म्हणजे शिष्यत्व नव्हे तर त्यांच्या अनुग्रहाच्या माध्यमातून तो कृतीच्या साहाय्याने आत्मसात करणे म्हणजे काय हे पू. ताईंनी आपणासमोर मांडले. गुरुमंत्राच्या जपाने मनोबल वाढेल तसेच मानसिक शांतताही लाभेल यात तीळमात्र शंका नाही पण आतापर्यंत गुरुआज्ञेचे आणि गुरुपरंपरेचे आचरण निष्ठेने पालन आणि अनुसरण करणारे आपण फक्त आपल्या इतिहासात ऐकले आणि वाचले मात्र आपल्या समोर गुरुआज्ञेचे आणि विचारांचे निष्ठेने आचरण तद्वतच अनुसरण करणारे दोन मूर्तीमंत प्रत्यक्षदर्शी उदाहरण म्हणजे पू. स्वामी वरदानंद भारती आणि ती. आदरणीय ताई.
पू.स्वामीजींनी दासगणू परंपरा समर्थपणे समोर आणली व चालवली तर पू.ताईंनी या परंपरेचा समर्थपणे विस्तार केला.
जसे आद्य शंकराचार्या यांनी सदानंदास पद्मपाद बनविले समर्थांनी अंबादासचे कल्याण केले तसेच पू. स्वामीजींनी वसुताईंस गार्गी हे नाव दिले. गार्गी नुसते नाव नाही तर उपनिषदीय साहित्याचे अभ्यासक असलेल्यांना या नावाचे अलौकिक महत्व काय आहे हे माहीत आहे.
पू. अप्पा म्हणतात
तुझे नाव वसुमती l
वसु म्हणजे धनसंपत्ती ll
ज्ञानरुपाने तिची प्राप्ती l
होवो तुझिया अंतरंगी ll
आजपासून तुला भले l
गार्गी हे नाव ठेविले ll
ज्ञान मिळवुनी त्याचे l
सार्थ करी प्रयत्नाने ll
पू. अप्पांच्या या आज्ञेचे कठोर पालन करत व तपस्येने पू.ताईंनी ते सिद्ध केले. पू.ताईंचे जीवन म्हणजे सद्गुरू चरणी सर्वस्व समर्पण म्हणजे काय असते हे लक्षात येते.
संत परंपरेचा आचार सांभाळुन ज्ञानयुक्त भक्तीचा आणि धर्माचा प्रसार आणि तन मन धनाने सद्गुरूचरणी समर्पण कसे करावे याचा विशाल आदर्श पू.ताईंनी आपल्या समोर अर्थात दासगणू परिवारासमोर आणि समाजासमोर हि घालुन दिला. शेवटी पू.दासगणु महाराज , पू. स्वामी वरदानंद भारती आणि पू. गार्गीताईंच्या चरणी एकच प्रार्थना जी आपल्या रोजच्या उपासनेत आपण म्हणतो त्यातील कडवे लेखनकर्त्याचे व आपलेही आवडते असले ते लिहुन लेखणीला विराम देत पू.ताईंच्या चरणी हि शब्दसुमनांजली समर्पित करतो.
गुरुपंथ चालवाया l
दे शक्ती तुच सदया l
दोषास घाली पोटी l
शिशुवरती ठेवी माया.
ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll
योगेश काटे