प्राणायामच्या अनेक प्रकारच्या क्रियांमध्ये शुद्धीसाठी असणार्या क्रिया मुख्यत्वे आपण पाहिल्या. आता सिद्धीसाठीच्या क्रिया बघू. त्या उद्देशाने केला जाणारा प्राणायाम म्हणजे त्रिबंध मुद्रा प्राणायाम.
बंध याचा अर्थ बांधणे किंवा आवळणे असा घ्यावा. ‘त्रिबंध मुद्रा’ हे योगाचे तंत्र आहे. यामध्ये मूलबंध, जालंधर बंध आणि उड्डियन बंध हे तिन्ही बंध एकत्र लावले जातात. ही मुद्रा शरीरातील प्राण किंवा ऊर्जा नियंत्रित करते.
‘जालंधर बंध’ म्हणजे मान खाली घालून हनुवटी छातीला चिकटवून ठेवणे.
‘उड्डियन बंध’ म्हणजे पोट आत ओढून नाभि प्रदेश जास्तीत जास्त आत खेचणे.
‘मूलबंध किंवा मूलाधार बंध’ म्हणजे गुदद्वार वर ओढून धरणे होय.
विधी :
१) यासाठी कंबर व मान सरळ ठेवून पद्मासन, सिद्धासन किंवा सुखासन क्रियेमध्ये बसावे.
२)आता दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा.
३)गुडघे हाताने धरून, शक्य तितके श्वास घ्या आणि पूर्णपणे श्वास बाहेर सोडा.
४)आता गुदद्वाराचे स्नायू वरच्या बाजूला खेचून मूलबंध लावा.
५)तसेच पोट शक्य तितके आतील बाजूस खेचून उड्डियान बंध लावा.
६)नंतर डोके पुढे घ्या आणि हनुवटी छातीवर दाबून जालंधर बंध लावा.
७)येथे बाहेर श्वास रोखून धरा आणि शक्य तितके या आसनात बसून राहा.
८)जेव्हा श्वासाची गरज भासेल, तेव्हा हळूहळू तुमची मान सरळ करत श्वास घ्या आणि पोटाचे स्नायू सैल सोडा. त्यानंतर, शेवटी, मूलबंधदेखील सोडा.
९)असा तीनवेळा सराव करा.
पथ्य :
उच्च रक्तदाब, हृदयविकार, मानदुखी, पाठदुखी, हर्निया आणि कोलायटिस असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.
फायदे : त्रिबंध मुद्राचे अनेक फायदे आहेत, जसे की :
१)त्रिबंध मुद्रा जीवनशक्ती वाढवते.
२)महत्त्वाची इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना बळ देते.
३)या सरावाने शरीर हलके होऊ लागते.
४)आपल्याला तरुण राहण्यास मदत होते.
५)लैंगिक शक्ती वाढवते व मनाला शांत करते.
६)याच्या अभ्यासाने शरीराची ऊर्जा ऊर्ध्वगामी होऊन उधरेतस होण्यास मदत होऊन प्रज्ञा विकास साधतो.
७)पोटाचे सर्व आजार टाळण्यासाठी हा एक अनोखा व्यायाम आहे.
८) हे लठ्ठपणा आणि मधुमेहासाठीदेखील उपयुक्त आहे आणि थायरॉईड ग्रंथीदेखील निरोगी ठेवते.
९)गळ्यातील, छातीतील संसर्ग, बाधा (ळपषशलींळेपी) कमी होते.
(क्रमशः)
गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५