अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद : इतिहासाचा साक्षेपी दस्तावेज

    11-Jan-2025
Total Views | 67
Shree Ram Mandir

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती आता अवघ्या काही दिवसांवर. अयोध्येचा लढा हा काही फक्त एका मंदिरासाठीचा लढा नव्हता, या लढ्याला अनेक कंगोरे होते. या यशस्वी लढ्यातून भारतीयांनी काय कमावले, त्यासाठी किती संघर्ष केला, याविषयी भाष्य करणार्‍या ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’ या पुस्तकाचे परीक्षण...

दि. २२ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण भारतवर्षाला ज्या सोहळ्याची अतीव प्रतीक्षा होती, ज्या घटनेसाठी भारतीय जनमानसाने जवळजवळ ५०० वर्षांचा अखंड, अविरत स्वरूपाचा संघर्ष केला तो अयोध्येतील श्रीराम मंदिरातील ‘रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा’ म्हणजे, कित्येक पिढ्यांनी केलेल्या संघर्षयज्ञाची सांगता होय. या संघर्षयज्ञात अनेक लोकांनी आपल्या प्राणाचे मोल देऊन, हा संघर्षयज्ञ अविरत चालू ठेवला. अनेक पातळ्यांवर हा लढा देऊन, ‘मंदिर वही बनाएंगे’ ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरवली. दि. २२ जानेवारी २०२५ रोजी या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने हा लेखनप्रपंच.

दि. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर, साधारण पाच महिन्यांनी भारतातील शैक्षणिक वर्तुळातील एक नामवंत तज्ज्ञ व अभ्यासक अशी ओळख असणारे डॉ. अशोक मोडक व डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी लिहिलेल्या ‘अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद’ या पुस्तकाचे प्रकाशन ठाणे येथे, परमपूजनीय श्री गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले. अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारच्या प्रकाशन सोहळा स्वामी गोविंददेवगिरी महाराज, भैय्याजी जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मराठी भाषेत या विषयावर लिहिलेल्या, एका उत्तम दस्ताऐवजाची मराठी साहित्यात भर पडली.

मुळात मागच्या अनेक वर्षांपासून भारतातील अनेक भाषांमध्ये रामजन्मभूमी आंदोलन व त्यात संघ परिवार तसेच, विश्व हिंदू परिषद यांच्या सहभागाची चर्चा करणारे साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले होते. असे असले तरी देखील हे पुस्तक अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण आपल्यासमोर मांडते आणि हाच या पुस्तकाचा जमेचा भाग आहे. मुळात या पुस्तकाची विषयवस्तू ही भावनिकतेला आवाहन करणारी असली, तरी देखील लेखकांनी अत्यंत संयत, वास्तववादी व सर्वस्पर्शी अशाप्रकारे विषयवस्तू हाताळली आहे. या पुस्तकाचे संपादन अरुण करमरकर यांनी केलेले असून, ठाण्यातील प्रसिद्ध अशा ‘परममित्र प्रकाशन संस्थे’तर्फे हे पुस्तक लोकांपर्यंत आणण्यात आले आहे.

पुस्तकाच्या बांधणीचा विचार करता, साधारण दहा प्रकरणांमध्ये अयोध्या आंदोलनाचा लेखाजोखा यात मांडलेला दिसून येतो. या पुस्तकातील प्रकरणांचा विचार करता, रामजन्मभूमी आंदोलनाचा प्रदीर्घ इतिहास, या आंदोलनासंबंधीची न्यायालयीन लढाई, त्यादरम्यान देशभर झालेले वैचारिक मंथन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर उमटलेल्या सर्व स्तरातील प्रतिक्रिया अशी साधारण विभागणी केलेली दिसून येते.

प्रभू श्रीरामांचे चरित्र हा या भारतभूमीतील जनमानसाचा जीवनरस असून, रामजन्मभूमी आंदोलन हा भारताच्या दृष्टीने अस्मितेचा व आत्मप्रतिष्ठेचा विषय का होता? आणि त्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी त्यांच्या त्यांच्या परीने हातभार लावून, या आंदोलनाची यशस्वी परिणती कशी घडवून आणली याची सविस्तर मांडणीच ‘रामजन्मभूमीचा मुक्तिसंग्राम’ या प्रकरणात केलेली दिसून येते. भारत देशातील जनमानस हे रामचरित्राने व्यापलेले असून, प्रभू रामाचे चरित्र ही भारत वर्षाच्या अक्षय सांस्कृतिक परंपरेची ओळख आहे. हीच ओळख पुसून टाकण्याचा मनसुबा असलेल्या मुघल बादशहा बाबराच्या विध्वंसक कृतीपासून, म्हणजे १५२८ सालापासूनचा इतिहास आणि कालपट ‘प्रभू श्रीराम आणि भारत वर्ष’ या प्रकरणात, मुद्देसूद पद्धतीने मांडला आहे. मुघलकालीन सांस्कृतिक गळचेपी, ब्रिटिशकालीन भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत अशा वेगवेगळ्या कालखंडात, राम जन्मभूमी आंदोलनाचे बदलत गेलेले स्वरूप व विविध पातळ्यांवरती हिंदू समाजाने दिलेला लढा, त्याचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीशी असलेला संबंध अत्यंत वस्तुनिष्ठपणे या पुस्तकात मांडलेला दिसून येतो. हे विवेचन मांडत असताना, प्रभू श्रीराम हे या देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहेत हे प्रकर्षाने नमूद केलेले आहे. ‘हजारो वर्षानंतरही कोणी भारताच्या अस्तित्वाबाबत प्रश्न निर्माण करण्याचे साहस करू पाहील, तर इतिहास त्याला बजावून सांगेल की, क्षत्रिय राम आणि भिल्ल माता शबरी यांनी हे राष्ट्र निर्माण केले आहे’ हे वाक्य वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे आहे.

१९८६ साली झालेल्या मुजफ्फरनगर येथील अधिवेशनानंतर, ‘विश्व हिंदू परिषदे’ने रामजन्मभूमी आंदोलनात घेतलेला सक्रिय सहभाग व त्यासाठी सुरू केलेली सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक चळवळ आणि तिची परिणामकारकता, याचे सविस्तर विवेचन या पुस्तकात आले आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेची आंदोलनामागची स्पष्ट भूमिका आणि त्यावरील इतर समाज घटकांच्या प्रतिक्रिया यावर एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आलेले आहे. अयोध्येच्या बरोबरीनेच काशी, मथुरा आदी तीर्थक्षेत्रांची मुक्ततेची चळवळ आणि देशातील डाव्या पुरोगामी विचारवंतांची त्याबाबतची वैचारिक भूमिका, यांचा समाचार घेणारे एक प्रकरण या पुस्तकात असून, देशातील सेक्युलर शक्तींनी आजवर या आंदोलनाची केलेली हानी आणि समाजमनाची केलेली दिशाभूल, याचीही सविस्तर मांडणी या प्रकरणात आहे.

अयोध्या आंदोलनाचे राजकीय परिमाण पाहिल्यास या चळवळीची वैचारिक पार्श्वभूमी तयार होत असतानाच्या काळात, या चळवळीचे सर्वात जास्त वैचारिक नुकसान हे तथाकथित सेक्युलर म्हणणार्‍या डाव्या पुरोगाम्यांनी केले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतरच्या काळात तसेच, आंदोलनाच्या न्यायालयीन लढाई दरम्यान या पुरोगामी विचारवंतांचा वैचारिक बुरखा उतरवण्याचे काम संघ तसेच, ‘विश्व हिंदू परिषदे’सारख्या संघटनांसाठी कार्यरत असलेल्या सज्जनशक्तीने पार पाडले आहे, असे यातून प्रकर्षाने जाणवते. विचारसरणीच्या दृष्टीने हे काम उजव्या शक्तींनी केले आहे असे मानल्यास, सांस्कृतिक व न्यायालयीन लढ्यादरम्यान अयोध्या आंदोलनातून भारतात शींहपेलीरलू म्हणजेच, संस्कृती तंत्र अथवा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रकर्ष आणि उत्कर्ष झाल्याचे निर्विवादपणे म्हणता येईल. देशातील बहुसंख्य हिंदूंचा नैतिक विजय म्हणजे, या आंदोलनाची यशस्विता. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकात, अयोध्या आंदोलन आणि काश्मीर प्रश्न, ‘कलम ३७०’, भारताने भूषवलेले ‘ॠ२०’चे अध्यक्षपद, जगात होत असलेले भूराजकीय संघर्ष, चिनी ड्रॅगनचा विळखा, भारतातील आर्थिक स्थित्यंतरे, बाबरी ढाचा जमीनदोस्त होणे, मुस्लीम बोर्डाचे मंदिराच्या जागेवरील हक्क सांगणारे युक्तिवाद, सुप्रीम कोर्टाची विषय हाताळण्याची पद्धत, या सर्व सामाजिक आणि राजकीय बदलांचा परामर्श घेतलेला असून, हेच या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

रामजन्मभूमी आंदोलन ही सांस्कृतिक, धार्मिक चळवळ आहे या दृष्टीने, भारतावर परिणाम करणार्‍या अंतर्गत तसेच बाह्य घटकांचा सखोल विचार या पुस्तकात केला असल्यानेच हे विश्लेषण सर्वस्पर्शी ठरते. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाची ओघवती, प्रवाही आणि संदर्भ संपृक्त भाषा. अयोध्या आंदोलनाच्या संबंधाने वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या ठिकाणी केलेले भाष्य, लिखाण, न्यायालयीन लढाईच्या दरम्यान प्रसिद्ध झालेले विविध लेख, अहवाल आणि सरकारी स्पष्टीकरणे या सर्वांचा अंतर्भाव, पुस्तकाच्या विविध प्रकरणात करण्यात आलेला आहे.

या पुस्तकाचे सगळ्यात महत्त्वाचे बलस्थान म्हणजे, अयोध्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजाच्या बदलत्या मानसिकतेचा धांडोळा! त्याचा समावेशदेखील या पुस्तकात घेतला गेला आहे. मुस्लीम कट्टरतावाद आणि सुधारणावादी पुरोगामी मुस्लीम गट यांच्यातील टोकाचे विरोध आणि त्यातून उमटणार्‍या रामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रक्रियेवरील प्रतिक्रिया यांचे विवेचन, मुक्तीसंग्राम आणि मुस्लीम मानसिकता या प्रकरणात विशेषत्वाने केलेले आहे. या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आणि भारतीय मुसलमान यांच्यातील बदलते अंतरप्रवाह, यांची कालसुसंगत मांडणी लेखकांनी केलेली असून, नव्या भारताच्या निर्माणासाठी सुधारणावादी पुरोगामी मुस्लीम समाज कितपत भूमिका निभावू शकेल? या दृष्टीने हे विवेचन आलेले आहे. या संदर्भात मुस्लीम लेखक सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यांचा, अत्यंत खुमारीने समाचार घेतलेला आहे. इतरही अनेक अस्मितावादी मुस्लीम लेखक व विचारवंतांच्या प्रतिक्रियांचा ऊहापोह या प्रकरणांमध्ये, विश्लेषणाच्या ओघात आलेला आहे. मुस्लीम कट्टरतावाद, सेक्युलॅरिझम आणि डावी विचारसरणी व त्यातून होणारी सामाजिक व वैचारिक घुसळण, यासंबंधीचा विचार पुस्तकात अनेक ठिकाणी दिसून येतो. राजकीयदृष्ट्या २०१४ साली झालेले सत्तांतर, मोदी सरकारची आंदोलनाबाबतची भूमिका व कार्य तसेच, उत्तर प्रदेशात आलेले योगी सरकार या सर्वांचा अयोध्या आंदोलनावरील परिणाम, याचा विचार एका विशिष्ट प्रकरणात केलेला आहे.

मागच्या पाच शतकात रामजन्मभूमी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी प्रतीक्षा करणार्‍या व्यथित हिंदू समाजाने दिलेला राजकीय, सामाजिक आणि न्यायालयीन लढा, त्याची परिणती, त्यातून हिंदू समाजाने मिळवलेला आत्मविश्वास आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी तसेच, २०४७ सालापर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी अयोध्या आंदोलनातून मिळालेला धडा आणि सकल हिंदूंचा आत्मविश्वास तसेच, आत्मप्रतिष्ठा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे हे यातून अधोरेखित होते. हिंदू समाजाबद्दल असणार्‍या तथाकथित समजूती व भ्रामक कल्पना यानिमित्ताने गळून पडल्या आहेत. भारतविरोधी वृत्तींना, यापुढे थारा मिळणार नाही, अशी सकल हिंदूंची निर्णयाक भूमिका यातून स्पष्ट होते.

प्रस्तुत पुस्तकाचा आवाका लक्षात घेता, अत्यंत संयत, शास्त्रशुद्ध आणि काटेकोर मांडणी व अचूक शब्दरचना, संदर्भांची रेलचेल ही या पुस्तकाची बलस्थाने आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास, राम जन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने डाव्या सेक्युलर विचारवंतांची संभावना, ‘गिर्‍हाईक गमावून बसलेले दुकानदार’ या शब्दात लेखकांनी केली आहे. अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ व संयत साहित्य निर्माण होणे आणि विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये ते प्रचलित होणे, हे फार मोठे योगदान ठरते. त्या दृष्टीने एक ऐतिहासिक दस्तावेज मराठी भाषेत आणल्याबद्दल, प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकांचे आभार आणि राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अशा विषयांवर त्यांच्याकडून अधिकाधिक वैचारिक लेखन घडो ही अपेक्षा.

पुस्तक परिक्षक : अपर्णा कुलकर्णी
पुस्तकाचे नाव : अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद
लेखक : डॉ. अशोक मोडक व डॉ. प्रशांत धर्माधिकारी
प्रकाशक : परममित्र प्रकाशन, ठाणे
मूल्य : रु. ४५०
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121