“राज ठाकरेंवर टाडा लावून त्याला कारागृहात टाकले पाहिजे”; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संताप!
05-Aug-2024
Total Views | 108
अमरावती : राज ठाकरेंवर टाडा लावून कारागृहात टाकले पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. यावर प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "राज ठाकरेंवर टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशा लोकांना सरळ आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. महाराष्ट्रातला माणूससुद्धा युपीमध्ये आहे, ओडीसा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही आहे. त्यांचं काय करायचं? त्यामुळे समाज दुभंगण्याची ही वक्तव्य आहेत. समाज दुभंगला की, देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांच्यावर लागला पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, "आम्ही सुरु केलेल्या आरक्षण बचाव यात्रेला प्रचंड यश मिळालं आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असं विधान केलं. आज मी खात्रीलायक एक विधान करु शकतो. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. यातून एक मराठा समाजाचा आणि दुसरा ओबीसींचा असे दोन गट पडले आहेत. राजकीय भांडणं सामाजिक भांडणात परिवर्तित करण्याचे अनेक जणांचे मनसुबे या यात्रेमुळे उध्वस्त झाले आहेत," असेही ते म्हणाले.