देशभरात आजही असे असंख्य हात आहेत, जे ‘स्व’ऐवजी ‘समाजा’चा साकल्याने विचार करतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या विचाराने ते समाजासाठी समर्पित भावनेने कार्यरत आहेत. या पठडीतील एक व्यक्ती म्हणज वय उणेपुरे ४० वर्षे असलेले शरद गजानन शिरसाठ. आपल्या स्व-कमाईतला काही हिस्सा समाजातल्या दुर्लक्षित घटकांसाठी ते खर्च करतात.
शरद यांचा जन्म दि. ८ जानेवारी १९८४ रोजी नाशिक शहराजवळील आडगाव येथे झाला. असे म्हणतात की, अतिलाडाने घरातले सर्वात लहान मूल बिघडते. मात्र, शरदराव याला अपवाद ठरावे. लहानपणापासूनच त्यांना आपल्या आजूबाजूला घडणार्या घटनांची जाण होती. त्यामुळेच की काय, आज वयाच्या चाळीशीतही ते आपल्या कामाशी प्रामाणिक असून, समाजहित जोपासताना दिसतात.
शरद शिरसाठ यांचे वडील सुतारकाम करायचे. कामानिमित्त ते दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आले आणि कायमचे तिथेच स्थायिक झाले. अगदी लहानपणापासूनच शरद यांनी बारकाईने आपल्या वडिलांच्या कामांचे निरीक्षण केले. त्यात त्यांचे दोन्ही भाऊदेखील सुतारकामांत सहभागी होते. मग काय शरद यांनाही या कामाची इतकी गोडी निर्माण झाली की, अगदी पाचवीला असतानाच शरद यांनी उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी लागणारा लाकडी पॅड स्वत: तयार करायला सुरुवात केली. शरद यांनी स्वहस्ते तयार केलेले ते पॅड इतके सुबक आणि टिकावू होते की, जवळजवळ निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांकडे हेच पॅड परीक्षेदरम्यान बघायला मिळायचे. मात्र, याच काळात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे शरद यांनी हळूहळू व्यवसायाची जबाबदारी उचलायला सुरुवात केली आणि आपला पिढीजात सुतारकामाचा व्यवसाय पुढे नेण्याचा शरद यांनी निर्णय घेतला.
माणूस अनुभवातून शिकतो, तसा शरद यांनीदेखील आकर्षक फर्निचर बनवायला सुरुवात केली. या कामात ते इतके निष्णात झाले की, एकदा बनवलेले फर्निचरचे डिझाईन कधीच बनवले नाही. त्यामुळे शरद यांच्या कामात साचलेपणा कधी आलाच नाही. फर्निचर बनविण्याचे काम १९९७ ते २००७ पर्यंत त्यांनी केले. या दहा वर्षांच्या काळात आपल्या कामाने त्यांनी ओळख कमावली.पण, सगळे सुरळीत असताना अचानक त्यांनी आपला व्यवसाय बंद करून २००८ साली ‘फॅब्रिकेशन’च्या व्यवसायात पाऊल टाकले. प्रारंभी शेतीसंबंधी छोटी-मोठी कामे केल्यानंतर मोठमोठ्या बांधकामांच्या रुफिंग -रेलिंगची कामे ते करू लागले. त्यांचे काम पंचक्रोशीतील लोकांना प्रचंड आवडले. यामुळेच त्यांना ‘मराठा विद्या प्रसारक समाजा’च्या विविध शाळांचे काम मिळाले.
त्यानंतर, शरद यांनी कादवा सहकारी साखर कारखान्याचा डोम एका रात्रीमध्ये उभा केला. त्यांच्या कामाच्या हातोटीमुळेच नाशिक जिल्ह्यातील अनेक बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट हे शरद मिस्तरी यांची मागणी करू लागले. सध्या त्यांचे कांदा साठवणूक चाळ आणि शेड बनविण्यासाठी कळवण देवळा, सटाणा, दिंडोरी आणि वणी या परिसरांत ते सुप्रसिद्ध असून, आज त्यांचे मोठे प्रकल्प नाशिक जिल्ह्यात सुरू आहेत. २००८ ते २०२४ या कालावधीत त्यांनी पाच लाख चौरस फुटांचे शेड विविध ठिकाणी बांधले, तर सर्वात मोठ्या दीड लाख चौरस फुटांच्या शेडची उभारणीही त्यांनी केली आहे. आज या उद्योगातून त्यांनी बरीच प्रगती साधली असून, २५ ते ३० तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोरोनाकाळात संपूर्ण देश थांबला असताना, शरद यांनी मात्र या संधीचे सोने केले. या कालखंडात त्यांनी 50 हजार चौरस फूट इतके शेड बांधले.
याविषयी बोलताना शरद सांगतात की, “संधी कोणत्या रूपात येईल, हे कधीच कोणी सांगू शकत नाही. मात्र, ती मिळाल्यानंतर स्वीकारण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असायला पाहिजे. कोरोनाकाळात इतर लोक घरी बसलेले असताना, मी मात्र एकही दिवस रिकामा नव्हतो.” त्यांच्या या कामाच्या झपाट्यामुळे त्यांना २०२२ साली ‘ब्रॅण्ड ऑफ नाशिक’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आपल्या व्यवसायाचा व्याप शरद यांनी वाढवला असला तरीही, सामाजिक बांधिलकीचा विसर पडू दिलेला नाही. खेडगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भेडसावत होती. शरद यांच्या कानांवर ही समस्या पडताच, त्यांनी कोणताही मागचापुढचा विचार न करता स्वखर्चाने बोअरवेलची व्यवस्था करून दिली. चांगल्या मनाने त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे याला खूप पाणी लागले. आता विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात पाणीउपलब्ध झाले आहे. इथेच शरदराव थांबले नाहीत तर, नाशिक येथील मूकबधिर मुलांची शाळादेखील त्यांनी दत्तक घेतली आहे. येथील २२ ते २३ मुलांच्या संगोपनासाठी ते मोठा हातभार लावतात. प्रत्येक महिन्याला किराणा सामान ते भरून देतात. तसेच दरवर्षी मोठी वस्तू येथे भेट म्हणून देतात. आतापर्यंत पाणी साठविण्यासाठी मोठमोठ्या टाक्या तसेच जीवनावश्यक इतर वस्तूदेखील त्यांनी दिल्या आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या पुढील कार्यासाठी दै. ’मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!