प्रगतिशील शेतकरी, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आणि तितकेच यशस्वी उद्योजक म्हणून देविदास महाले हे नाशिक जिल्ह्यात सुपरिचित. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
कला शाखेत प्रवेश घेतो, आपल्याला काही विज्ञान शाखेतला अभ्यास झेपणार नाही, असे देविदास यांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे विष्णू यांना सांगितले. पण, त्यांना आपल्या मुलाची गुणवत्ता माहीत होती. ते म्हणाले नाही, “तू विज्ञान शाखेतच प्रवेश घे. शिकण्याआधीच तू असे कसे म्हणू शकतोस?” देविदास यांनी त्यांच्या बाबांचे म्हणणे ऐकले आणि बारावीला ते परिसरातील तिन्ही आश्रमशाळेतून पहिले आले. निराश न होता, आयुष्यात सातत्याने प्रयत्न करत राहिलेच पाहिजे. किडा-मुंगीही प्रयत्न करतात, तर आपण तर माणसं आहोत. त्यामुळे न थांबता, न थकता आपल्या उद्दिष्टांसाठी प्रयत्न करायलाच हवेत, हे संस्कार या घटनेतून देविदास यांना मिळाले.
सगळ्याच नकारात्मक परिस्थितीवर स्वार होत, स्वतःसोबतच समाजाचाही उत्कर्ष साधणार्या काही व्यक्ती असतात. त्यांचा संघर्ष, त्यांचे यश ऐकूनच त्यांचे जगणे हे समाजासाठी दीपस्तंभासारखे असल्याचे जाणवते. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे देविदास महाले. ते एक यशस्वी शेतकरी आहेत. सरकारच्या कृषक उत्थानासाठीच्या अनेक योजना आहेत. देविदास यांनी या योजनांचा अभ्यास केला. त्या योजना प्रत्यक्षात स्वतः राबवल्या. त्यात यश आल्यानंतर, स्थानिक ग्रामीण भागांतील शेतकर्यांनाही त्यांनी या योजनांचा लाभ मिळवून दिला. शेतकर्यांमध्ये त्यांनी आधुनिक शेतीपद्धतीबाबत जागृती केली. शेडनेट, शेततळे, आधुनिक ट्रॅक्टर आणि अवजारे यासंदर्भात शेतकर्यांना सरकारी संस्थांचे सहकार्यही मिळवून दिले. आजही नाशिक ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थी नाशिक शहरात शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल, अशी व्यवस्था उपलब्ध करणे गरजेचे होते. देविदास यांनी काही वर्षांपूर्वीच नाशिक येथे अभ्यासिका सुरू केली. विद्यार्थ्यांकडून नामपात्र शुल्क घेऊन तिथे विद्यार्थी दिवसभर अभ्यास करू शकतील, अशी ती व्यवस्था आहे. आज नाशिक ग्रामीण भागातले 300 विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ आहेत. त्यातले काही विद्यार्थी आज सरकारी अधिकारीही झाले आहेत. गरीब कुटुंबातल्या मुलांनीही मोठी स्वप्न पाहावी आणि त्यांनी आयुष्यात शैक्षणिक आणि आर्थिक यश मिळवावे, यासाठीचा देविदास यांचा हा प्रयत्न होता.
शेतकरी सामाजिक कार्यकर्ता असलेले देविदास, हे यशस्वी उद्योजकही आहेत. दिंडोरीत नव्याने उदयास येणार्या ‘एमआयडीसी’मध्ये ‘लेट्स प्रिंटस’ ही त्यांची प्रिटिंग प्रेस उभी राहत आहे. तर त्यांच्या पत्नीचाही सॅनिटरी नॅपकिन उत्पादन प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे. देविदास यांचे कर्तृत्व जितके लक्षणीय आहे, तेवढाच त्यामागचा संघर्षही लक्षणीय आहे.
विष्णू आणि चंद्रभागा महाले हे आदिवासी कोकण समाजाचे दाम्पत्य मूळचे दिंडोरी तालुक्यातील देवळीचा पाडा (अंबाड) या गावचे. त्यांचे सुपुत्र देविदास. विष्णू यांनी शुन्यातून विश्व उभे केले. आपल्या मुलांनी शिकावे, असे महाले दाम्पत्यांना वाटे. त्यासाठी त्यांनी, देविदास यांना नाशिकमधील सरकारी आश्रमशाळेत शिकायला पाठवले. इयत्ता पहिली ते बारावी देविदास या आश्रमशाळेत शिकले आणि पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नाशिकला आले. मात्र, शहरातल्या वातावरणाशी जुळवून घेताना त्यांची खूपच तारांबळ झाली. तसेच, शहरात राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्चही झेपेनासा झाला.
या सगळ्याचा परिणाम म्हणजे, बारावीला तीन आश्रमशाळेतून पहिले आलेले देविदास तेरावीत अनुत्तीर्ण झाले. त्यांच्यासाठी हा मोठाच धक्का होता मात्र, त्यांनी हार मानली नाही. पुन्हा त्यांनी विज्ञानशाखेत प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. याचदरम्यान त्यांना नाशिक प्रिटिंग प्रेसमध्ये अॅप्रेंटिसशिप मिळाली. शिक्षण घेतच ते अर्थाजनही ही सुरू झाले. त्यांनी ‘बीएएसी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे नितीन जनक सारडा, राम पाटील, अॅड. शैलेश चव्हाण वगैरेसारख्या समाजशील व्यक्तींनी देविदास यांना सहकार्य केले. देविदास यांनी रतन टाटा यांच्या ‘उद्योग प्रशिक्षण योजने’तून प्रिटिंग टेक्नोलॉजीचे प्रशिक्षण घेतले. तसेच, महाराष्ट्र शासनाकडूनसुद्धा उद्योग प्रशिक्षण घेतले. तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्यांनी चीन आणि हाँगकाँगची वारी देखील केली आहे. प्रिटिंग संदर्भातले उच्च तंत्रज्ञान भारतात कसे उपलब्ध होईल, तसेच त्यातून अत्याधिक रोजगार कसा निर्माण करता येईल? याबाबत काम करण्याचाही प्रयत्न केला. देविदास हे सरकारी योजनेतून मिळणार्या उद्योजक साहाय्याच्या 50 कोटी रकमेसाठी पात्र आहेत.
देविदास यांनी नाशिक किंवा इतर कुठेही शहरात उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा घेतली नाही, तर त्यांनी गावाकडेच म्हणजे देवळीचा पाडा (दिंडोरी) येथेच अडीच एकर जागा घेतली आहे. ग्रामीण भागांतील युवकांना आणि महिलानांही रोजगाराची संधी त्यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. देविदास म्हणतात, “आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या गरीब असलेल्या समाजामधून उद्योजक निर्माण व्हावेत, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत, म्हणून मी आयुष्यभर काम करणार आहे.” भाकरीचा चंद्र शोधण्यातच आयुष्य घालवले. त्यामुळे यशाचा सूर्य तर सोडाच किरणही दुरूनसुद्धा अनुभवायला मिळाला नाही, असे कोटी लोक या जगात आहेत. या सगळ्यांसाठी देविदास महाले यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे. देविदास महाले यांच्या पुढील वाटचालीसाठी दै.’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!