ज्ञानदीप ‘सावरकर’

    20-May-2025
Total Views |
well read Savarkar

कलेच्या विविध प्रांतात मुशाफिरी करत, शिक्षणाच्या समृद्ध वाटेवर विद्यार्थी घडवणार्‍या सलील सावरकर यांची गोष्ट!


भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे. व्यक्तीच्या जीवनापासून ते राष्ट्रनिर्मितीच्या कार्यापर्यंत गुरूंच्या मार्गदर्शनातूनच अनेक महामानव घडले. आजमितीलाही जर विद्यार्थ्यांची पाऊलवाट अडखळली, तर त्यांच्या जीवनात गुरूच दीपस्तंभ होतात. ज्ञानाचा दीप उजळून विद्यार्थ्यांना उत्कर्षाची वाट दाखवणारे असेच एक गुरू म्हणजे सलील सावरकर होय! वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये मुशाफिरी करत सलील सावरकर यांनी, विद्यार्थ्यांसहित शिक्षकांसाठीही एक आदर्शच घालून दिला आहे.

लहानपणी तब्येतीच्या अनेक तक्रारींनी ते ग्रस्त असल्याने, साहजिकच त्यांच्या घरचेही चिंतेतच होते. परंतु, कालपरत्वे त्यांच्या प्रकृतीत सकारात्मक बदल झाला. शाळेमध्ये चांगले शिक्षक लाभल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्येही बदल होत गेला असे सलील सांगतात. इंग्रजी तसेच संगीत शिकवणार्‍या देशपांडे बाईंचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. त्यामुळेच इंग्रजी आणि संगीत हे दोन्ही विषय, त्यांच्या कायमच जिव्हाळ्याचे राहिले. सर्वसाधारणपणे ज्या गणिताची मुलांना भीती वाटते, त्याच गणित विषयाच्या लहानपणीच ते प्रेमात पडले. त्यांच्या या गणितप्रेमाचे श्रेय ते आईवडिलांना देतात. कारण, त्यांच्या आई गणिताच्या प्राध्यापिका तर वडील इंजिनिअरिंगचे प्राध्यापक. गणितावर त्यांची चांगली हुकुमत असल्याने, हे ज्ञानसंचित सलील यांच्यापर्यंत पोहोचले असावे. आपल्या गणित प्रेमाविषयी बोलताना सलील म्हणतात की, तासनतास ते गणित या विषयाशी खेळत राहायचे. वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेत राहायचे आणि शोध लावायचेसुद्धा. विषयाची आवड असल्यामुळे, आपसूकच सर्जन होत असे.

रुढार्थाने शिक्षणाचा प्रवास न करता, सलील यांनी स्वतःची वेगळी वाट निर्माण केली. या वाटेवर चालताना, त्यांनी आपल्या थोरल्या बंधुंसहित ‘सोहम् कलानिर्मिती’ ही संस्था उभारली. या संस्थेसाठी त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांनीच हातभार लावला. या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जाहिराती, लघुपट, मालिकांची निर्मिती करण्यात आली. यातील कार्यक्रमांसाठी सलील यांनी, संगीत दिग्दर्शनसुद्धा केले. कलेच्या प्रांतात मुशाफिरी करताना, साहित्यापासून माणूस दूर राहूच शकत नाही. याच धर्तीवर कविवर्य कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांना स्वतंत्र चाली लावून, ‘कुसुमांजली’ हा काव्यवाचन व गायनाचा कार्यक्रम त्यांनी साकार केला. या काळात काही वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखनसुद्धा केले. त्याचबरोबर विविध विषयांवर भाष्य करणारे लेखही त्यांनी लिहिले आहेत. या काळात त्यांनी ‘ईटीव्ही’वर ‘आकाशगंगा’ या नाट्य अणि चित्रसाहित्य विषयक प्रश्नमंजुषेचेही लेखन केले. छायालेखक बाळ जोगळेकर यांच्या ‘हा खेळ सावल्यांचा’ या आत्मचरित्राचे शब्दांकनही सलील यांचेच.

वेगवेगळ्या अनुभवांचे संचित गोळा करता करता सात वर्षांचा कालावधी गेला, यानंतर ते पुन्हा एकदा गणिताकडे वळले. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत त्यांनी विविध ठिकाणी नोकर्‍या केल्या. काम करताना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवाने ते समृद्ध झाले. यानंतर उल्हासनगर येथील सी.एच.एम. महाविद्यालयात ते गणिताचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गणिताच्या विश्वात रमत असताना, संस्कृतचेही भावविश्व त्यांना खुणावत होते. त्यांनी संस्कृत भाषा संस्थेचा, मौलिक आणि प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केला. मागची अनेक वर्षे ते संस्कृतचे अध्ययन आणि अध्यापनही करत आहेत. भारतीय भाषांचे शिक्षण घेतल्यावर चांगले करिअर घडवता येऊ शकते असा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांना सलील सावरकर हे आदर्श उदाहरण ठरावे. सलील म्हणतात की, “संस्कृतमुळे मला अनेक कामेही मिळाली आणि चांगले अर्थार्जनही झाले.” भारतीय गणित आणि गणिती या विषयावर त्यांनी अनेक व्याख्याने दिली असून, स्वतंत्र लेखनसुद्धा केले. गणितावर आधारित ‘अगणिताच्या अंतरंगात’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित झाली. मराठीमध्ये अशा पद्धतीचे हटके लेखन या आधी झाले नाही. त्याचबरोबर सलील यांनी मराठी विश्वकोशासाठीही नोंदलेखन केले आहे. ‘मराठी विज्ञान परिषदे’तर्फे त्यांनी सदर लेखनसुद्धा केले. या व्यतिरिक्त ’कलियुगाचा नेमका आरंभ कधी झाला असावा, याचा वेध घेणार्‍या युगात’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केला. अक्षरचित्रांचा कलाप्रकार ‘कॅलिग्राफी’ त्यांना अवगत असून, मोडी लिपीचेही ते अभ्यासक आहेत. याव्यतिरिक्त ‘खगोलशास्त्र’ या विषयातही त्यांना रुची असल्याचे सलील सांगतात.

आजच्या शिक्षणक्षेत्रावर भाष्य करताना, वर्तमानातील परिस्थितीवर ते चिंता व्यक्त करतात. मूळ विषय समजून न घेता वरवरचे शिक्षण घेणारे व देणारे, यांच्यामुळेच शिक्षणक्षेत्राची हानी होते आहे असे मत ते व्यक्त करतात. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना म्हणतात की, “या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल मनात आस्था आहेच. परंतु, सदर धोरण कशाप्रकारे राबवले जाईल, यावरच त्याचे यश अवलंबून आहे. शिक्षणक्षेत्रात खर्‍या अर्थाने समर्पणाचा विचार ठेवून काम करणार्‍या लोकांची आवश्यकता आहे. शालेय वयापासून मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगणारे व त्या शिक्षणाची गोडी कशी लागेल, यावर काम करणार्‍या शिक्षकांची आपल्या देशाला गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. कलेच्या, शिक्षणाच्या विविध प्रांतांमध्ये मुशाफिरी करणार्‍या सलील सावरकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

9967826983
मुकुल आव्हाड