संस्कृती मुलांपर्यंत पोहोचवली नाही तर धर्म नष्ट होईल : गोविंद शेंडे

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचा "स्मरणिका प्रकाशन सोहळा" थाटात संपन्न

    22-Jul-2024
Total Views | 30
 
Govind Shende
 
मुंबई : आपण आपली संस्कृती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवली नाही तर एक दिवस आपला धर्म नष्ट होईल, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी केले. शनिवार, २० जुलै रोजी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने बी. एन. वैद्य सभागृहात 'स्मरणिका प्रकाशन आणि गुणीजन कौतुक' सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण, संपादिका अल्का गोडबोले आणि संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश वाड उपस्थित होते.
 
याप्रसंगी बोलताना गोविंद शेंडे म्हणाले की, "या देशात मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका, असे म्हणणारे लोक निर्माण झाले होते. पण देशातील काही लोकांनी आपल्या संस्कृती आणि परंपरेकडे पुन्हा वळण्याच ठरवलं. या देशातील संस्कृती आणि परंपरा नष्ट करण्यासाठी एक हजार वर्ष प्रयत्न झालेत."
 
"देशात धर्म वाचवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. पण आज त्याच देशात लाखों लोकांचं धर्मांतरण होत आहे. कारण समाज स्वाभिमानशून्य बनला आहे. आपल्याला आपल्या पुरातन कथा आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायला हव्या. अन्यथा एक दिवस या देशातून धर्म नष्ट होईल," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांची वाघनखे भारतात आली आहेत. पण त्याचं स्वागत करण्याऐवजी लोक त्याला विरोध करत त्यांची चेष्टा करत आहेत. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी. नरसिंह अवतारानंतर दुसरा अवतार झाला असेल तर तो छत्रपती शिवरायांचा होता. नरसिंह अवताराने आपल्या नखांनी हिरण्यकश्यपचा वध केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. जर धर्मनिरपेक्षतेच्या नावावर ही कथा आपण आपल्या मुलांना सांगू शकत नसू तर अशा लोकांचा धिक्कार आहे. बालपणापासून या अभिमानास्पद गोष्टी आपल्या मुलांना सांगितल्या तरच ते मोठे होऊन वाईट गोष्टींचा प्रतिकार करतील," असेही ते म्हणाले.
 
यावेळी बोलताना पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले की, "माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे वैदिक धर्म. पण आपण आपला इतिहासच विसरत चाललो आहोत. मात्र, संस्कृति संवर्धन प्रतिष्ठानद्वारे तो इतिहास जपला जातोय. आपल्याला अजूनही आपली ताकद कळलेली नाही. आपण कुणापेक्षाही कमी नाही. आपल्याला आपली ताकद ओळखून निर्भय बनायला हवं. आपल्याला पुन्हा एकदा जगाला आपलं अस्तित्व दाखवायचं आहे," असे ते म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात अनेक गुणीजनांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गुरू नृत्यनाटिकेने झाली तर शांतीमंत्राने शेवट झाला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121