राज्य कौशल्य विभागाच्या उपक्रमांना महाविद्यालयांत उत्स्फूर्त प्रतिसाद
18-Jul-2024
Total Views | 33
मुंबई : राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून नामांकित १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यासाठी आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
दरम्यान, रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे युवक घडावेत, यासाठी राज्य व केंद्र सरकार काम करत असल्याचे मत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे. असे असतानाच विभागामार्फत पुढील ३ महिन्यात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून विविध महाविद्यालयांकडून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर पुढील महिन्यापासून प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरु होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली आहे.
प्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण १,५०,००० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी शासनाने १५० कोटी रुपयांची तरतूद केली असून १५ ते ४५ वयोगटातील सर्व युवक-युवती पात्र आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून योजनेद्वारे पुढील ३ वर्ष सहकार्य देण्यात येणार आहे.