नवी दिल्ली : भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देश आनंदात नाहून निघाला आहे.. अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला. या विजयानंतर भारतासह जगभरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा फोन करून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. रोहित शर्माच्या उत्कृष्ट कर्णधारपदासाठी पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आणि त्याच्या टी-२० कारकिर्दीची प्रशंसा केली. त्यासोबतचं अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या खेळीचे आणि भारतीय क्रिकेटमधील योगदानाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. भारतीय संघाच्या दोन्ही स्टार खेळाडूंनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
यासोबतच, पंतप्रधानांनी शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले आणि महत्त्वपूर्ण झेलसाठी सूर्य कुमार यादवचे कौतुक केले. जसप्रीत बुमराहच्या योगदानाचेही पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले. या विश्वचषकाच्या सांगतेसोबतचं भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला आहे. पंतप्रधान मोदी राहुल द्रविडचेही आभार मानायला विसरले नाही.