मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे सावरकरांना दूषणे देणाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी सर्वांनी सावरकर वाचून त्यांना समजून घ्यावे, असे आवाहन सावरकर अभ्यासक अक्षता देशपांडे यांनी केले. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘कालजयी सावरकर’ विशेषांक प्रकाशन सोहळा आणि व्याख्यान वसईतील समाज उन्नती मंडळ सभागृह, माणिकपूर येथे मंगळवार, दि. २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न झाला. यावेळी सावरकर अभ्यासक अक्षता देशपांडे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित विशेष व्याख्यान प्रकाशना सोहळ्यानंतर संपन्न झाले. यावेळी ‘श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज वसई विभाग’चे अध्यक्ष मावजी पटेल, सामवेदी ब्राह्मण संघ वसई-विरारचे अध्यक्ष अनंत पाटील, समर्थ मराठा संस्थेचे सचिव अशोक जाधव, समाज उन्नती मंडळ माणिकपूरचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जाधव तसेच चंद्रशेखर धुरी उपस्थित होते.
अक्षता देशपांडे यांनी आपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच ‘भारतातील सर्व समाज वेगळे असले, तरी लोक एकत्र आहेत’असे म्हणत त्यांनी भारतीय समजव्यवस्थेच्या चांगुलपणावर भाष्य केले. त्यांनी आपल्या भाषणात दै. ‘मुंबई तरुण भारत’चे कौतुक करत वसईच्या रसिक संस्कृतीविषयी भाष्य केले. त्या पुढे म्हणाल्या की, “सावरकर पराकोटीचे विचारवंत, थोर स्वातंत्र्ययोद्धा, हिंदुत्ववादी होतेच. त्याचबरोबर ते विज्ञाननिष्ठ उपयुक्ततावाद स्वीकारलेले द्रष्टे नेते होते. त्यामुळे सावरकरांचे विचार आत्मसात करून त्यांना दूषणे देणार्यांना चोख उत्तर देण्याची जबाबदारी तरुणांची आहे.”
सावरकरांच्या लहानपणापासूनच्या आठवणी आणि आवडीनिवडी सांगत अक्षता देशपांडे म्हणाल्या की, “सावरकर कोणत्याही जाती-पंथाचे नव्हते, तर ते हिंदुत्वाचे होते. म्हणून आज आपण सर्व समाज मिळून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आणि त्यांची जयंती साजरी करायला एकत्र आलो आहोत. आज आपला खरा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलाच नाही. आपलाच इतिहास आपला भूतकाळ सांगण्यास का कमी पडला?” असे म्हणत त्यांनी सावरकरांवर समाज घालत असलेली सर्व दूषणे खोडून काढली. व्याख्यानानंतर तुडूंब भरलेल्या सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात आनंद व्यक्त केला.
दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मॅनेजर स्पेस सेलिंग सेल्स आनंद वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोमसाप वसईचे कार्यवाह संतोष गायकवाड यांनी भूषविले. उदयकुमार उपाध्ये यांनी स्वागतगीत गाऊन सावरकर रचित ‘ने मजसी ने...’हे गीत गायले. त्यांना केशव कर्वे यांनी हार्मोनियमवर साथ दिली. डॉ. लतिका पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर कुंदन खंडागळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या संस्थांनी आपल्या विषयी थोडक्यात माहिती दिली.