विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, साहस, जिद्द आणि आत्मविश्वास जागृत करणारे ठाण्यातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणजे संदीप शिरगावकर. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा मांडलेला आलेख...
संदीप सदानंद शिरगावकर यांचा जन्म दि. ४ जून १९८३ रोजी ठाणे पूर्वेतील कोपरी येथे झाला. त्यांचे बालपण चाळीतील एका लहानशा खोलीत गेले. वडील पंखे बनवण्याच्या कंपनीत कामाला होते, तर आई घरातील कामाचा व्याप सांभाळायची. ही वस्ती म्हणजे मोठी झोपडपट्टी होती. संदीपचे लहानपण अशा सहकार्यांच्या संगतीत गेले, जिथे शिक्षणाचा लवलेशही नव्हता. त्यामुळे मोठी बहीण सारिका शिक्षणासाठी आजीकडे राहायची. अशा परिस्थितीत संदीपला शालेय भविष्याची चिंता भेडसावत होती. ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मराठी माध्यमातून इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी शालेय अभ्यासापेक्षा संदीपला मैदानी खेळांमध्ये अधिक रुची होती. शाळेत धावणे, खो-खो आणि व्हॉलीबॉल यांसारखे खेळ खेळले जायचे. आठवीत असताना सर्वप्रथम ’एनसीसी’ची (नॅशनल कॅडेट कोअर) माहिती वर्गात मिळाल्यानंतर, संदीपला ‘एनसीसी’चा ध्यास लागला. येथेच एका मोठ्या प्रवासाची वाट सापडली. ’एनसीसी’ प्रशिक्षक म्हणून त्यावेळी महाजन सर होते. ‘एनसीसी’चा सराव हा शनिवार अर्धा दिवस असतो म्हणून त्या दिवशी केला जात असे.
संदीपने ‘एनसीसी’ची वैद्यकीय चाचणी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्याचा ‘एनसीसी’त समावेश झाला. संदीपच्या जीवनाला आता वेगळे वळण मिळाले. ‘एनसीसी’मध्ये चुणूक दाखविल्याने, संदीप यांची ‘एनसीसी’ प्रशिक्षणाच्या सर्वोच्चपदी निवड झाली; किंबहुना शालेय शिक्षणात सातत्याने तीनही वर्षे ’एनसीसी बेस्ट कॅडेट’चे पारितोषिक त्याने पटकावले.भारताला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे पूर्ण झाली. दि. १५ ऑगस्ट १९९७ रोजीच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात शालेय अध्यक्ष म्हणून संदीप शिरगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर अथक मेहनत करून संदीप शिरगावकर यांनी ‘एनसीसी’चे प्रशिक्षण ‘अ’ श्रेणीने पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात घेतले. महाविद्यालयात व्हॉलीबॉलमध्ये तालुका पातळीवर उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक मिळवले.कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे, संदीपने वर्तमानपत्र टाकणे, दुधाची लाईन टाकणे, तसेच लहान मुलांना शाळेतून घेऊन येणे अशा छोट्या-मोठ्या कामांबरोबर कपड्याच्या दुकानात, तर कधी ’गोदरेज’ कंपनीत सेल्समध्ये कष्ट उपसले. २००३ साली जिज्ञासा सैनिकी स्कूल आणि सिंघानिया स्कूलमध्ये सैनिकी प्रशिक्षण शिकवण्याची संधी संदीपला मिळाली. निवृत्त मेजर सुभाष गावंड सरांशी तेव्हा जवळीक नव्हती.
पण, मेजर गावंड यांच्यामुळे संदीपच्या स्वप्नमय प्रवासाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम प्रामाणिकपणे करत असताना, अल्पावधीतच त्याची अकॅडमी प्रमुख म्हणून निवड झाली. त्यानंतर एक दिवस मेजर गावंड म्हणाले की, ”संदीप कामाचा पसारा वाढवायचाय. तुला इथे काम करणे आवडेल का?” क्षणाचाही विलंब न करता, संदीपने सरांना होकार दर्शविला आणि ‘प्रभाव ट्रेनिंग अकॅडमी’च्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. काम जोमाने सुरू होताच, संदीपवर विद्यार्थ्यांना भूदल, नौदल आणि वायुदल या क्षेत्रांत कसे सहभागी होता येईल, याची माहिती देण्याची जबाबदारी आली आणि २००८ साली ’प्रभाव डिफेन्स मोटिव्हेशन सेंटर’ (झऊचउ) या संस्थेची स्थापना झाली. १५ प्रशिक्षक, तीन मुख्य प्रशिक्षक आणि सहकार्यांच्या सोबतीने कामाला सुरुवात केली. १५ वर्षांत पोलीस, भूदल, नौदल आणि वायुदलात बरेच विद्यार्थी सैनिक म्हणून भरती झाले. २०२४ मध्ये त्यांचा माजी विद्यार्थी आर्यन देवळेकर याची लेफ्टनंट पदावर निवड झाली. ’अटलबिहारी वाजपेयी माऊंटेनरिंग इन्स्टिट्यूट, मनाली’ येथे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामागिरी करून अभ्यासक्रम पूर्ण केला. ’पीडीएमसी’ची ऑफिसर वृषाली शिरगांवकर हिचा सन्मानाचिन्ह देऊन, सत्कार करण्यात आल्याने, ही एक प्रकारे कामाची पोचपावती असल्याचे संदीप सांगतात.
संदीप यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून’, ‘इंडियन नेव्ही अकॅडमी, केरळ’, ‘ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी’ येथे व्हिजिट करणार्याला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र गर्ल्स बटालियन’ ‘एनसीसी’ आयोजित संचलन स्पर्धेत सातत्याने दोन वर्षं विजयी होऊन, त्यांच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिकेही मिळवली. पोलिसांच्या संचलनात तसेच ‘क्रीडा भारती’च्या आंतरशालेय संचलन स्पर्धेत उत्कृष्ट संचलन आणि उत्कृष्ट परेड कमांडर अशी पारितोषिके मिळवली. संदीप यांच्या मार्गदर्शनानुसार, ’प्रभाव’च्या निमेश जाधव, तन्मय गायकवाड, आर्यन देवळेकर आणि शशांक नाईक या माजी विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्रीय एअर रायफल शूटिंग’ स्पर्धेत सहभागी होऊन, महाराष्ट्राचे नाव रोशन केले. परिणामी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि विरार या शहरांमधील २८ शाळा आणि ८०० ते एक हजार विद्यार्थी दरवर्षी सैन्य दलाचे प्रशिक्षण घेत आहेत. दरवर्षी आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या, दहा विद्यार्थ्यांना ते विनाशुल्क प्रशिक्षण देतात. मोबाईल, टीव्हीमध्ये न रमता मैदानी प्रशिक्षण घेऊन देशसेवेसाठी खंबीर व साहसी सैनिक बनण्याचा सल्ला संदीप युवा पिढीला देतात. भविष्यात निवासी प्रशिक्षण स्कूल उभारण्याचा मानस संदीप व्यक्त करतात. अशा या ’प्रभाव’शाली व्यक्तिमत्त्वाला दै. ’मुंबई तरूण भारत’च्या शुभेच्छा!
-दीपक शेलार