नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते शंकर सरदार यांच्या घरावर आता महिलांनी हल्ला केला आहे. यापूर्वी टीएमसी नेते अजित मैती यांना चप्पलने मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला फटकारले असून शेख शाहजहानला तात्काळ अटक करण्यास सांगितले आहे.दरम्यान संदेशखालीच्या पोलपारा येथील टीएमसी नेते शंकर सरदार यांच्या घरावर महिलांनी हल्ला केला. त्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शंकर सरकार यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आंदोलकांना तेथून हटवले. संदेशखालीच्या पोळपारा गावात शंकर सरदार यांचे घर आहे. पोलिसांसह आरएएफही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अजित मैती यांना बंगालच्या उत्तर २४ परगणा येथील संदेशखाली गावात महिलांवरील अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अजित मैती यांच्यावर ग्रामस्थांच्या जमिनी हडप केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला शेख शाहजहानच्या जवळच्या साथीदाराच्या घरातून पकडले आहे. गावकरी त्याचा पाठलाग करत असल्याने त्याने येथे ४ तास स्वत:ला कोंडून घेतले. मैती यांना दि. २५ फेब्रुवारी रोजीच ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी जमीन बळकावल्याच्या तक्रारीनंतर मैती यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन अजित मैती यांना अटक करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले होते.
दि.८ फेब्रुवारी २०२४ पासून संदेशखाली येथील शेख शहाजहान येथे महिला आणि आंदोलक लैंगिक छळ आणि जमीन हडपण्याच्या विरोधात सातत्याने आंदोलन करत आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने सांगितले की, त्यांना टीएमसी नेता आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध वनवासी कुटुंबांकडून “लैंगिक शोषण आणि जमीन बळकावण्याच्या” ७० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना अशांत भागातून सुमारे १,२५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात ४०० जमीन समस्यांशी संबंधित आहेत. मात्र अद्यापपर्यंत शेख शहाजहानला पोलिसांनी अटक केलेली नाही.