मुंबई, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दोन तासांत ६५ लाख मतदारांनी मतदान केल्याचा संशय व्यक्त करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने या आरोपांची मुद्देसूद माहिती देत, स्पष्ट शब्दांत खंडन केले असून, "निवडणूक यंत्रणा कायद्याच्या चौकटीत आणि पूर्ण पारदर्शकतेने काम करते. अपयश पचवता न आल्याने काही नेते निवडणूक आयोगाची प्रतिमा मलीन करत आहेत," अशी टिपण्णी केली आहे.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण ६.४० कोटी मतदारांनी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान केले. सरासरी ५८ लाख मते प्रति तास पडली. याच्या तुलनेत शेवटच्या दोन तासांत पडलेली ६५ लाख मते ही सरासरीपेक्षाही कमीच आहेत, त्यामुळे गैरप्रकाराचा आरोप पूर्णतः निराधार आहे.
मतदान केंद्रांवर सर्व उमेदवारांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेसच्या कोणत्याही एजंटने मतमोजणीच्या दिवशी कोणतीही तक्रार केली नाही, हेही आयोगाने अधोरेखित केले. मतदार यादी ही कायद्यानुसार तयार केली जाते आणि सर्व राजकीय पक्षांना अंतिम यादी आधीच पुरवली जाते. ९.७७ कोटी मतदारांच्या यादीबाबत फक्त ९० तक्रारी झाल्या, त्यापैकी फक्त एक मुख्य निवडणूक अधिकार्याकडे दाखल झाली होती, हे वास्तवही आयोगाने मांडले.
विशेष म्हणजे, २७ हजारांहून अधिक बूथ एजंट्स काँग्रेसने स्वतः नियुक्त केले होते, तरीही आता मतदार यादीबाबत आरोप करणे म्हणजे स्वतःच्या यंत्रणेवरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. या प्रकरणात सर्व पुरावे आणि स्पष्टीकरण काँग्रेसला दि. २४ डिसेंबर २०२४ रोजीच देण्यात आले होते, तरीही हेच मुद्दे पुन्हा उचलले जात असल्याने, आयोगाने अशा वागणुकीला लोकशाही प्रक्रियेचा अवमान ठरवत कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न
"भारतातील निवडणुका जगभरात अचूकतेसाठी ओळखल्या जातात. निकाल अनुकूल न आल्यास आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न हा लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे," अशी नाराजी निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे.
१) शेवटच्या दोन तासांत ६५ लाख मतदार कसे वाढले?
राहुल गांधी यांचा आरोप : मतदानाच्या शेवटच्या दोन तासांत तब्बल ६५ लाख मते नोंदवण्यात आली, जी आकस्मिक आणि संशयास्पद आहेत. हा आकडा नेहमीपेक्षा फार मोठा असल्याने यंत्रणेबाबत शंका निर्माण होते.
निवडणूक आयोगाचे उत्तर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण ६ कोटी ४० लाख ८७ हजार ५८८ मतदारांनी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केले. या काळात सरासरी ५८ लाख मते प्रति तास नोंदवली गेली. यानुसार, शेवटच्या दोन तासांत १ कोटी १६ लाख मतदारांनी मतदान करणे शक्य होते. प्रत्यक्षात, ६५ लाख मते नोंदवली गेली, जी सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.
२) मतमोजणीच्या पारदर्शकतेवर शंका
राहुल गांधी यांचा आरोप : मतमोजणी, मतदान आणि ईव्हीएमवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. मतमोजणीचे सॉफ्टवेअर आणि यंत्रणा केंद्र सरकारच्या नियंत्रणात आहे.
निवडणूक आयोगाचे उत्तर : मतमोजणी प्रक्रिया ही सरकारी कर्मचारी आणि सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकृत पोलिंग एजंट्स असतात. काँग्रेसच्या एजंट्सनी एकही तक्रार नोंदवलेली नाही.
३) मतदार याद्यांमध्ये अपारदर्शकता
राहुल गांधी यांचा आरोप : मतदार यादीत अवैध फेरबदल, बोगस नावे आणि अधिकृत यादी न मिळणे अशा अनेक समस्या होत्या.
निवडणूक आयोगाचे उत्तर : मतदार यादी ही १९५० चा कायदा आणि १९६० चे नियम यानुसार तयार केली जाते. कायद्यानुसार, निवडणुकीपूर्वी मतदार यादीची विशेष संक्षिप्त पुनर्रचना केली जाते. अंतिम मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना, यामध्ये काँग्रेसचा देखील समावेश आहे, सुपूर्द केली जाते. महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान ९ कोटी ७७ लाख ९० हजार ७५२ मतदारांच्या अंतिम यादीविरुद्ध फक्त ८९ अपील प्रथम अपील प्राधिकरणाकडे आणि फक्त एक अपील द्वितीय अपील प्राधिकरणाकडे दाखल झाले. यावरून स्पष्ट होते की, २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस किंवा इतर राजकीय पक्षांकडून कोणतीही तक्रार नव्हती.
४) निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न
राहुल गांधी यांचा आरोप : निवडणूक आयोग आता केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करतो, त्यामुळे लोकशाही संकटात आहे.
निवडणूक आयोगाचे उत्तर : भारतातील सर्व निवडणुका कायद्याने पार पडतात. भारतात निवडणुका ज्या प्रमाणात आणि अचूकतेने घेतल्या जातात, त्याची जागतिक स्तरावर प्रशंसा केली जाते. मतदार यादी तयारीपासून ते मतदान आणि मतमोजणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया सरकारी कर्मचारी राजकीय पक्ष, उमेदवारांनी नियुक्त प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पाडतात. कोणाकडूनही चुकीची माहिती पसरवणे हे केवळ कायद्याचा अवमान नाही, तर राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींचा अपमान आहे. तसेच, निवडणुकीत अथक आणि पारदर्शकपणे कार्य करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे मनोबल खचवणारे आहे. मतदारांनी प्रतिकूल निकाल दिल्यानंतर निवडणूक आयोगावर तडजोड केल्याचा आरोप करणे पूर्णपणे निराधार आहे.
५) निवडणूक आयोगाला पूर्वी पाठवलेल्या पत्रांवर ठोस कृती नाही
राहुल गांधी यांचा आरोप : आम्ही आयोगाला आधी पत्र पाठवले होते, त्यावर ठोस कृती झालेली नाही
निवडणूक आयोगाचे उत्तर : निवडणूक आयोगाने दि. २४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला दिलेल्या उत्तरात याबाबतची सर्व तथ्ये स्पष्ट केली असून, ती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरीही, त्याकडे दुर्लक्ष करून वारंवार असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत.