लखनौ : (Jain Community Rescue Bakara from Qurbani) बकरी ईदनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी बकरे कुर्बानी चढवले जातायत. एकीकडे इस्लाम समर्थकांकडून हे घडत असताना दुसरीकडे जैन समुदायाने आदर्श उदाहरण समोर ठेवल्याचे दिसतेय. जैन समुदायाचे लोक या बकऱ्यांना वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बागपतमधील अमीननगर सराई येथे 'जीव दया संस्था' नावाचे एक पशु पालन केंद्र सुरु केले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, कुर्बानीसाठी आणलेल्या तब्बल ४०० हून अधिक बकऱ्यांचे प्राण वाचवण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील जामा मशीद, सीलमपूर आणि गाझीपूर आणि गुलावठी बकरा मंडी या भागातून हे बकऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत कुर्बानी प्रकरण सुरु राहणार असल्याने येत्या काही दिवसांत आणखी १५ लाख रुपये खर्च होणार असल्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे. संस्थेने बांधलेल्या पशू पालन केंद्रात एका वेळी जास्तीत जास्त १८०० बकरे पाळण्याची क्षमता यात आहे. सध्या येथे ६५० हून अधिक बकरे आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या संस्थेमुळे, गळ्यात दोरा बांधलेल्या बकऱ्या दिल्लीपासून उत्तर प्रदेशपर्यंत वाचल्या गेल्या.