नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखाली हिंसाचारप्रकरणानंतर ममता सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेचे धिंधवडे निघाले आहेत. हिंदूविरोधी व्यक्तींना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेची उमेदवारी दिल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. तसेच, संदेशखाली हिंसाचारावर तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून या प्रकरणावर कोणतीही ठोस पावले उचलली नाही आहेत.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीचा बचाव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हिंदूविरोधी हिंसाचार करणाऱ्या आणि दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या अहमद हसनलादेखील ममतांनी राज्यसभेवर पाठवले आहे.
नलियाखाली येथील हिंसाचाराचा मास्टरमाईंड अहमद हसन इम्रान
अहमद हसन इम्रान याने नलियाखली गावात हिंदुविरोधी हिंसाचार घडवून आणला होता. त्याचबरोबर, दि. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी, मौलवी रोहुल कुद्दूस यांच्या कथित हत्येवरून कट्टरवादी इस्लामिक जमावाने नलियाखली गावातील हिंदूंविरोधात हिंसाचार केला होता. त्यामुळेच, अहमद हसन इम्रान हा त्या हिंदूविरोधी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असल्याचंही म्हटलं जातं.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कॅनिंग पोलिस स्टेशन कॉम्प्लेक्स अंतर्गत येणाऱ्या नलियाखली गावात हा हिंसाचार झाला, जेथे सुमारे १० हजार लोकांच्या जमावाने नलियाखली आणि शेजारील हेरोभंगा, गोपालपूर आणि गोलडोगरा गावात २०० घरे जाळली. त्यानंतर ही गर्दी कोलकाता येथून ट्रकमधून मोठ्या प्रमाणात आणून नालियाखली येथे आणण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.