मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vishnu Shankar Jain on Gyanvapi) उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त हिंदू साम्राज्य दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराणा प्रताप यांचे वंशज मेवाडचे महाराजा विश्वराज सिंह उपस्थित होते. तर मुख्य वक्ते म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ते विष्णू शंकर जैन उपस्थित होते. 'ज्ञानवापीद्वारे जगात धर्माची पुनर्स्थापना होईल, असे मत त्यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.
विष्णू शंकर जैन म्हणाले की, हिंदू समाजाच्या स्वाभिमानाशी दररोज तडजोड केली जात आहे, हिंदू हिताचे मुद्दे उपस्थित करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. देश धर्मनिरपेक्ष होण्याची शर्यत सुरू आहे का असा प्रश्न उद्भवतोय. आपल्याला ज्ञानवापी मुक्त करायची आहे आणि तिचा सन्मान परत मिळवायचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. नवयुग मार्केट येथील बलिदान पथावर आयोजित कार्यक्रमादरम्यान अनेक ठिकाणी भगवे झेंडे फडकत होते. त्याचदरम्यान ठाकुरद्वारा मंदिरातून कलश घेऊन येणाऱ्या महिला यज्ञ मार्गात प्रवेश करताच वातावरण आध्यात्मिक उर्जेने भरून गेले. खड्ग वाहिनीच्या मुलींनी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले.