भारतीय नौदलाची ताकद वाढणार! संरक्षण मंत्रालयाने केली मोठी खरेदी!
16-Feb-2024
Total Views | 33
नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी नऊ आणि भारतीय तटरक्षक दलासाठी सहा गस्ती विमाने खरेदी करण्याच्या कराराला मंजुरी दिली आहे. या करारानुसार, मेड इन इंडिया प्रकल्पांतर्गत देशात १५ सागरी गस्ती विमानांची निर्मिती केली जाणार आहे. हा करार एकूण २९ हजार कोटी रुपयांचा असेल. त्यासोबतच, बुधवारी संरक्षण मंत्रालयाने कानपूरस्थित कंपनीसोबत १७५२.१३ कोटी रुपयांचा करारही केला.
या करारांतर्गंत संरक्षण मंत्रालय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांसाठी रिमोट कंट्रोल गन खरेदी करणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या सौद्यांमुळे भारताची सागरी शक्ती तर वाढेलच शिवाय केंद्र सरकारय्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळेल. या करारांतर्गत टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम आणि एअरबस संयुक्तपणे विमानाची निर्मिती करतील. ही विमाने आधुनिक रडार आणि सेन्सर्सने सुसज्ज असतील.
करार पूर्ण झाल्यानंतर नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या निगराणी क्षमतेत कमालीची वाढ होणार आहे. हिंद महासागरात चीन ज्या प्रकारे आपली ताकद वाढवत आहे, चीन आणि पाकिस्तानच्या कुरापतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या विमानांचा वापर होईल. त्यासोबतच मालवाहतुक विमानांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा या गस्ती विमानांचा उपयोग होईल.