मारकडवाडी १० वर्षांत झालेल्या मतदानाची पक्षनिहाय आकडेवारी समोर
09-Dec-2024
Total Views | 202
1
मुंबई : मारकडवाडी येथे ‘इव्हीएम’विरोधी आंदोलन कोणी घडवून आणले, हे जगजाहीर आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी या गावाला भेट देत विषय चिघळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक मतदार अत्यंत जागरूक असल्यामुळे त्यांची डाळ शिजली नाही. भाड्याच्या कार्यकर्त्यांना जमवून घेतलेली सभा त्यांना आटोपावी लागली. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, ज्या थापा मारून हे आंदोलन उभे करण्यात आले, त्याचा बुरखा फाटला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मारकडवाडीत दहा वर्षांत झालेल्या मतदानाची पक्षनिहाय आकडेवारी समोर आणली आहे. याविषयी माहिती देताना बावनकुळे म्हणाले, “मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही. येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना मारकडवाडीतून ५३३ मते मिळाली, तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मते मिळाली. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४, तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.”
“२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मते मिळाली. मात्र, त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १ हजार, ३४६, तर भाजपकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मते मिळाली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १ हजार, २१, तर भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३, तर भाजपच्या राम सातपुते यांना १ हजार, ३ मते मिळाली.
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला, कधी अपक्ष तर कधी भाजपला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही. यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारले. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ‘ईव्हीएम’वर खापर फोडू नका. जरा मारकडवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा, म्हणजे तुमचे डोके ठिकाणावर येईल,” असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
आता रडगाणे थांबवा : एकनाथ शिंदे
“झारखंड, कर्नाटकात ‘इंडी’ आघाडी जिंकली. वायनाडमध्ये पोटनिवडणुकीत प्रियांका गांधीदेखील जिंकल्या. तुम्ही जिंकता तेव्हा ‘ईव्हीएम’चा घोटाळा नसतो आणि हरता तेव्हाच ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा होतो. हा दुटप्पीपणा आहे. विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. मी आधीच म्हणालो, विरोधी पक्षाला लाडकी बहीण चारीमुंड्या चित करेल. या महाराष्ट्रात महायुतीचे काम जनतेने पाहिले. अडीच वर्षांत महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, कल्याणकारी योजना सुरू केल्या. या योजनांचा परिपाक, या कामांची पोचपावती लोकांनी दिली. विरोधी पक्षांना माझे आवाहन आहे, आता रडगाणे थांबवा आणि विकासकामे सुरू करा,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आकडेवारी काय सांगते?
लोकसभा २०१४
विजयसिंह मोहिते-पाटील (५३३ मते) राष्ट्रवादी
सदाभाऊ खोत (६६४ मते) स्वाभिमानी पक्ष
विधानसभा २०१४
हनुमंत डोळस (२९४ मते) राष्ट्रवादी
अनंत खंडागळे (९७९ मते) अपक्ष
लोकसभा २०१९
संजयमामा शिंदे (३९५ मते) राष्ट्रवादी
रणजितसिंह निंबाळकर (९५६ मते) भाजप
विधानसभा २०१९
उत्तमराव जानकर (१,३४६ मते) राष्ट्रवादी शरद पवार गट
राम सातपुते (३०० मते) भाजप
लोकसभा २०२४
धैर्यशिल मोहिते पाटील (१,०२१ मते) राष्ट्रवादी शरद पवार गट