मुंबई, दि.६ : विशेष प्रतिनिधी भारतातील पहिला ४१० मीटरचा हायपरलूप चाचणी ट्रॅक बांधून पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प भारताच्या अति-आधुनिक वाहतूक प्रणालींमध्ये एक मैलाचा दगड ठरेल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या समाजमाध्यमातून या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची घोषणा केली. यासोबत त्यांनी या चाचणी ट्रॅकचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यावेळी वैष्णव यांनी म्हंटले आहे की, “भारताचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक (४१० मीटर) पूर्ण झाला. टीम रेल्वे, आयआयटी मद्रासची आविष्कार हायपरलूप टीम आणि TuTr यांचा हा एक इनक्युबेटेड स्टार्टअप आहे.”
भारतातील वाहतूक तंत्रज्ञानात नवा अविष्कार घडविण्यासाठी आयआयटी मद्रास सज्ज झाले आहे. आयआयटी मद्रासच्या चेन्नई कॅम्पसमध्ये भारतातील पहिला हायपरलुप चाचणी ट्रॅक विकसित करण्यात आला आहे. याठिकाणी भारतच नाहीतर जगभरातून हायपरलुपाचे पॉडची चाचणी घेण्यात येईल. हा प्रकल्प आयआयटी मद्रासच्या आविष्कार हायपरलूप टीमने संस्थेत उभ्या असलेल्या TuTr या स्टार्टअपच्या सहकार्याने विकसित केला आहे. TuTr हायपरलुपचा प्रारंभिक फोकस ६०० किलोमीटर प्रतितासची गती मिळवणे नाही तर भारतात सार्वजनिक वापरासाठी या तंत्रज्ञानाला व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य बनवणे आहे.
मुंबई आणि पुणे दरम्यान हायपरलूप प्रकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी ॲक्ट (2018) अंतर्गत हायपरलूपला मंजुरी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर २०१९मध्ये आलेल्या महाविकास आघडी सरकारने हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे कारण देत रद्द केला. मात्र आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले असताना या प्रकल्पाच्या आशा उंचावल्या आहेत. मुंबई-पुणे हायपरलुप कॉरिडॉरमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ केवळ २५ मिनिटांपर्यंत कमी होईल.