मुंबई : अभिनेता सलमान खान याला गेले अनेक दिवस बिश्नोई गॅंगकडून धमक्यांचं सत्र सुरुच आहे. यातल्या काही धमक्या तपासाअंती फक्त खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी काही बाबतीत मुंबई पोलीस तपास करून धमकी देणाऱ्यांच्या मागावरही आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्यामुळे मुंबई पोलिसांची चिंता आणखी वाढली आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा वरळी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानला नव्याने आलेल्या धमकीमागेही लॉरेन्स बिश्नोई गँगच असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गुरुवारी रात्री मुंबईच्या वाहतूक शाखेला हा धमकीचा मेसेज मिळाला. ज्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा उल्लेख असल्याचंही बोललं जात आहे. यासंदर्भात वरळी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांना आलेल्या धमकीत लिहिले आहे की, "एक महिन्याच्या आत गाणं लिहिणाऱ्याची अशी अवस्था करु की तो पुन्हा स्वत:च्या नावानेही गाणं लिहू शकणार नाही. सलमानमध्ये हिंमत असेल तर त्याने येऊन वाचवावं." असा इशारा देण्यात आला आहे.