कालबाह्य वस्तूंचे जतन करणारा ‘भगवान’

    01-Nov-2024
Total Views | 22

bhagwan jadhav
 
कालबाह्य वस्तू येणार्‍या पिढीला परिचित असाव्यात, या उद्देशाने १२ हजार वस्तूंचा संग्रह करीत ‘लक्ष्मी-नारायण वस्तुसंग्रहालय’ स्थापन करणार्‍या भगवान जाधव या अवलियाविषयी...
 
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पोसेवाडी गावात भगवान जाधव यांचा जन्म झाला. भगवान यांच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव नारायण. भगवान यांचे शिक्षण हे पोसेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. सध्या ते एका पतसंस्थेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. पण, अशा या अवलियाने कालबाह्य वस्तूंचे जतन करण्याचा अनोखा छंद जोपासला. एवढेच नाही तर छंदाप्रती अवघे आयुष्य वेचून ते जगावेगळे जीवन जगले, असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. भगवान यांनी आपल्या वस्तुसंग्रहालयात तब्बल १२ हजार वस्तूंचा संग्रह करून ठेवला आहे.
 
इयत्ता सातवीत शिकत असताना भगवान यांना ‘भूगोल’ या विषयात ’विविधसंग्रह’ नावाचा धडा अभ्यासासाठी होता. तेव्हा भगवान यांच्या मास्तरांनी सर्व विद्यार्थ्यांना अभ्यास म्हणून वहीत वस्तू चिकटवून संग्रह करण्यास सांगितला होता. जसे की, दगडांचे विविध प्रकार, फुलांचे प्रकार वगैरे. तेव्हा भगवान यांनी पत्रांची तिकीटे गोळा करून आपल्या वहीत चिकटवली होती. सर्व विद्यार्थ्यांमध्ये भगवान यांच्या वस्तुसंग्रहाचे कौतुक करत शिक्षकांनी शाबासकीची थाप दिली. त्यानंतर भगवान यांनी मागे वळून न पाहता, विविध कालबाह्य वस्तू गोळा करत त्यांचा संग्रह करण्यास सुरूवात केली. आज त्याच वस्तुसंग्रहालयाचे नाव आहे ’लक्ष्मी-नारायण वस्तुसंग्रहालय.’
 
मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक वस्तुसंग्रहालये असल्याने तेथील हौशी नागरिकांना अशा विविध वस्तूंचे दर्शन घडत असते. मात्र, ग्रामीण भागातही अशाच काही कालबाह्य वस्तूंचे दर्शन सर्वांना घडावे, या हेतूने भगवान यांनी वस्तुसंग्रहालय उभारले.
 
सुरूवातीला त्यांनी तब्बल सहा पेट्या भरतील एवढ्या वस्तूंचे जतन करून ठेवले होते. एका खोलीत संसार आणि दुसर्‍या बाजूला जनावरांचा गोठा होता. जतन केलेल्या वस्तू ठेवायच्या तरी कुठे? असा प्रश्न त्यांना पडायचा. मग पोसेवाडीच्या शाळेतील कामकाजासाठी वापर न होणार्‍या एका खोलीत आपल्या सर्व जतन केलेल्या वस्तू ठेवल्या. मात्र, एकेदिवशी आलेल्या मुसळधार पावसामुळे जतन केलेल्या वस्तू पाण्यात भिजल्याने भगवान यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. तरीही भगवान यांनी हार न मानता पुन्हा विविध वस्तूंचा शोध घेण्यास सुरूवात केली.
 
भगवान जाधव यांनी वृत्तपत्रातील क्रिकेट खेळाडूंची कात्रणे काढून वहीत चिकटवली. त्यासाठी त्यांचे पहिल्यांदा वृत्तपत्रात नावही छापून आले आणि त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. आज या वस्तुसंग्रहालयात ८०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या वस्तूंचाही संग्रह आहे. या संग्रहालयात भारतीय संस्कृतीचा अख्खा इतिहास डोळ्यांसमक्ष उभा राहतो. पुरातन दगडी वस्तूंचा अप्रतिम संग्रह, स्वयंपाकातीलवस्तू, विविध प्रकारची कुलुपे, उतरंड, रांजण, युद्धासाठी वापरली जाणारी दगडी, लोखंडी हत्यारे, भाले, तलवारीपासून ते खंजीरांपर्यंत, दगडी पुरातन शिल्प अगदी काल परवा तयार केल्याचा भास होतो. सौंदर्यप्रसाधनाच्या वस्तू ठेवण्यासाठी महिला ज्या लाकडी वस्तूंचा पूर्वीच्या जमान्यात वापर करत होत्या, त्या कालबाह्य झालेल्या वस्तू जशाच्या तशा या संग्रहालयाची शोभा वाढविताना दिसतात.
 
एवढेच नाही तर भगवान यांनी आपल्या संग्रहालयात घेरा, आसारी, गांधीजी वापरत असलेल्या काही चरख्यांच्या वस्तूंचा संग्रहही करून ठेवला. तसेच, ७० ते ८० वर्षांहून जुने १० ते १५ प्रकारचे ग्रामोफोनही या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतात. काही जुन्या रेडिओंचाही यात समावेश आहे. विविध आकारांच्या पणत्या, समई, लामण दिवा, दगडी दिवा, रेल्वेचे दिवे, सायकलीचे दिवे, १८६० सालापासूनची नाणी, १२५ दस्तऐवज, पत्त्यांच्या पानावरचे ४०० जोकर्स, पुरातनकाळातील नाणी, तसेच ७० देशातील नाणी आणि नोटा असा भगवान यांचा हा अफाट वस्तुसंग्रह!
 
भगवान यांना नाटक, सिनेमा पाहण्याचीही प्रचंड आवड. ते नाटक, सिनेमा पाहायला गेल्यास नामवंत कलाकरांच्या स्वाक्षर्‍याही आवर्जून घ्यायचे. त्यांनी ९५० हून अधिक नामवंतांच्या स्वाक्षर्‍यांचा संग्रह केला आहे. निळू फुले, अजय देवगण, अनिल कपूर, श्रीदेवी, अमिताभ बच्चन, सिंधुताई सपकाळ तसेच, रतन टाटांचीही भगवान यांनी स्वाक्षरी घेतली होती. त्यावेळी रतन टाटा हे इस्लामपूर येथील एका शाळेच्या दौर्‍यावर होते. मात्र, रतन टाटांकडे स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांनी शिष्टमंडळाकडून आलो असल्याचे भासवून स्वाक्षरी घेतली होती. मात्र, ही घटना सुरक्षारक्षकांना कळली असता, मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचीही आठवण ते सांगतात.
 
भगवान यांनी कालबाह्य वस्तूंचा छंद जोपासत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘छत्रपती शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार’, ‘राष्ट्रसंचार पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी भगवान यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 
आई-वडील आपल्या मुलांची सेवा करतात. त्याचप्रमाणे कालबाह्य झालेल्या वस्तू येणार्‍या पिढीला परिचित असाव्यात, या उद्देशाने छंदातून समाजाप्रती उभारलेले ‘लक्ष्मी-नारायण वस्तुसंग्रहालय’ निर्माण करणारे भगवान जाधव यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून देदीप्यमान शुभेच्छा!
 
सुशांत काळे 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121