कीर्तनाच्या माध्यमातून गोरक्षणाचा जागर

    25-Oct-2024
Total Views | 39

harishchandra
 
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या लगत असलेल्या पैठण भागातून अध्यात्माची कास धरलेला एक तरूण केवळ कीर्तन, भजनच नव्हे, तर गोरक्षण आणि अध्यात्म शिक्षणासारखे कार्य करताना, आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात संस्कारित पिढी घडविण्याचे कार्य करीत आहे. त्या ह.भ.प. हरिश्चंद्र चंद्रभान व्यवहारे यांच्याविषयी...
 
हरिश्चंद्र महाराजांचे प्राथमिक शिक्षण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटण येथील जनता विद्यालयात झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी शेवगाव येथील ‘न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज’मधून पूर्ण केले. त्यांच्या घरात पूर्वीपासूनच वारकरी परंपरा असल्याने लहानपणी त्यांच्यावरही या वारकरी संप्रदायाचे संस्कार आपसुकच होत गेले. हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन यामध्येच त्यांचे मन हळूहळू रमू लागले. त्याचवेळी हिंदू धर्मातील परंपरा, संस्कृतीचे संवर्धन करण्याचा निश्चय त्यांनी केला आणि हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सुरूवातीला हरिश्चंद्र महाराज यांनी त्यांच्या घराशेजारीच श्रीरामाचे एक मंदिर उभारले. गावातील मुलांना हरिपाठाची गोडी लागावी, त्यांना वारकरी संप्रदायाच्या संपन्न संस्कृतीचा आणि वारशाचा परिचय व्हावा, आपला धर्म, त्याचे आचरण, संस्कार या मुलांमध्ये रुजावे, यासाठी त्यांनी मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवायला सुरूवात केली.
 
भारतीय संस्कृती प्राचीन असून त्यात अध्यात्माला अतिशय महत्त्वाचे स्थान. आजकालचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे असले, तरी या माध्यमांसोबत अध्यात्मदेखील हातात हात घालून राहावे म्हणून प्रयत्न होताना दिसतात. यासाठी अभंग गायन, कीर्तन आणि भक्ती संप्रदाय यांची भूमिका मोलाची. ह.भ.प. हरिश्चंद्र व्यवहारे महाराजांची पाऊलेही त्याच दिशेने वळली. प्रबोधनासोबतच गोरक्षण आणि अध्यात्म शिक्षणासाठी ते कार्यरत आहेत.
 
कोणत्याही कीर्तनकाराला आपली महान संतपरंपरा, तिचा वारसा हा अवगत हवाच. अर्थात, महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांच्या कार्याचा फार मोठा वाटा आहे. संतांनी आपल्या साहित्यातून समतेच्या विचारांची पेरणी महाराष्ट्रात केली. जेव्हा प्रबोधनाची आणि लोकजागृतीची कोणतीही साधने नव्हती, तेव्हा गावागावांत संतविचार पोहोचविण्याचे सद्कार्य कीर्तनकारांनी केले. कीर्तनाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरांचे त्यांनी मनोभावे जतन केले. आज कीर्तनाच्या माध्यमातून गोरक्षा, संस्कृती संवर्धन आणि हिंदू धर्माची शिकवण सामान्य माणसापर्यंत कीर्तन सेवेच्या माध्यमातून पोहोचविण्याची कामगिरी ह.भ.प. हरिश्चंद्र चंद्रभान व्यवहारे महाराज भक्तिभावाने करीत आहेत.
 
हरिश्चंद्र महाराज हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी पैठण आणि नजीकच्या परिसरात विविध उपक्रम राबवित असतात. एका गावातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास बघता-बघता संपूर्ण तालुक्यात विस्तारला. हरिश्चंद्र महाराजांनी हिंदू धर्मांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी कीर्तन सेवा करण्यास सुरूवात केली. गावागावात जाऊन त्यांनी कोणतेही मानधन न घेता कीर्तने केली. देव, धर्म, देशाचे रक्षण करण्याचा संदेश ते या माध्यातून देऊ लागले. गोसेवा, व्यसनमुक्ती या गोष्टींवर त्यांनी आपल्या कीर्तनांतून अधिकाधिक भर दिला. त्याचबरोबर गावातील लहान मुलांवर संस्कार करण्याच्या हेतूने त्यांनी मुलांना अध्यात्मिक शिक्षणाचे धडे देण्यास सुरूवात केली. मुलांना अध्यात्माची गोडी लागावी, देव-देश, धर्मासाठी त्यांनी पुढे कार्य करावे, हाच त्यांचा उद्देश आणि हेच ध्येय.
बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना एकत्र करत गोसेवेचे काम हाती घेतले. गोमातेच्या रक्षणासाठी त्यांनी शेतकर्‍यांना गोमातेची विक्री न करता, त्याचे दान करण्याचे आवाहन केले. वारकरी पंथाचा पाया ज्ञानदेवांनी रजला, असे संत बहिणाबाईंनी आपल्या सुप्रसिद्ध ‘ज्ञानदेवे घातला पाया उभारिले देवालया’ या अभंगात म्हटले आहे. त्यांचेच कार्य हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारांसाठी पुढे नेण्याचे कार्य आज हरिश्चंद्र महाराज करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या कार्याची दखल म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात ‘ज्ञानेश्वर सेवा धाम’च्या वतीने ‘एकता, समता आणि विश्वबंधुत्व’ पुरस्काराने त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला आहे.
 
गोरक्षण आणि गोसेवेसाठी हरिश्चंद्र महाराजांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी परिसरातील गोशाळांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठीही लागेल ती मदत केली. तसेच दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गोशाळांना आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. गोमातेच्या रक्षणासाठी गोमातेची विक्री न करता, गोमातेचे दान करण्याची एक चळवळच त्यांनी उभी केली. त्यांच्या या कार्यामुळे शेकडो गोमातांना कत्तलीपासून वाचविण्यात यश आले. याविषयी बोलताना हरिश्चंद्र महाराज सांगतात की, “पुरातन काळापासून देशी गायीस मातेचे स्थान दिलेले आहे. देशी गाय धार्मिक-वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून, धर्मशास्त्रात तिला ‘कामधेनू’ म्हणून संबोधले आहे. महाकाव्यांमध्ये देशी गायीची स्तुती अनेक ठिकाणी काव्याच्या रूपाने साठवली गेली आणि वेदांतील कथांमधून सर्व देवी-देवता गायीच्या शरीराच्या अवयवांमध्ये वास करतात, असे म्हटले आहे. गाय सर्व नक्षत्रांच्या किरणांचा प्राप्तकर्ता असल्याचे म्हटले जाते. वेदांमध्ये गायीच्या मागच्या बाजूला ‘सूर्यकेतु नाडी’ असे वर्णन केले आहे. ‘सूर्यकेतु नाडी’मध्ये सूर्याच्या किरणांद्वारे गायीच्या रक्तात सोने तयार होते, त्याच सोन्याचा पाया ‘गोरस’मध्ये आहे. गायीपासून मिळविलेले दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण यांना ‘पंचगव्य’ असे म्हणतात आणि गायीला ‘सुरवशुकप्रदा’ म्हणतात. प्रतिजैविक गुणधर्मामुळे ते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून शारीरिक संतुलन राखतात. गायीला ‘पंचभूमीची माता’देखील म्हणतात. ‘मातर: सर्वभूता: नाम गाव: सर्वसुखप्रदा’ म्हणजे गाय ही सर्वांना आनंद देणारी निसर्गमाता आहे. त्यामुळे गोमातेचे रक्षण हे प्रत्येक हिंदूचे आद्य कर्तव्य आहे,” असे महाराज सांगतात. तसेच देव, दर्म आणि देशासाठी नेहमीच कार्य करत राहणार असल्याचेही त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले. त्यांच्या या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...
 
सुनिल चव्हाण
(अधिक माहितीसाठी संपर्क ९८८१११५२२७)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121