आदर्श ‘वनवास’ प्रभू रामांचाच!

    06-Jan-2024
Total Views | 194
Prabhu Ram And Vanvas

वनवासाच्या काळात काय करावे, याबद्दलचे दंडक धर्मशास्त्राने सांगितले आहेत. रामाने ते कसोशीने पाळले. कुठेही कसूर ठेवली नाही. धर्मदंड पाळत असताना त्याने कसलाही भेदभाव केला नाही. ऋषींचा सन्मान राखला, वन्य-नागर जमातींशी सौख्य ठेवले आणि राक्षसांचा नाश केला. सीता शोधनाच्या कार्यात वनातील आदिम प्रजेच्या मदतीने त्याने सैन्य उभारणी केली आणि रावणाच्या लंकेवर आक्रमण केले. वनवासात राम धर्माने वागला. त्यामुळे तो लोकप्रिय तर ठरलाच; पण हळूहळू राम सगळ्या भारतवर्षाचा लाडका ‘रामलला’ झाला!

प्रभू राम, पांडव आणि नल यांच्या वनवासाविषयी आपल्या इतिहासात वाचायला मिळते. पांडवांच्या वनवासात म्हणे हजार-पाचशे लोकांच्या जेवणाच्या पंगती रोज उठत. यज्ञाची अनुष्ठानं, कथा, कीर्तन, प्रवचनं असा दिवसभराचा दिनक्रम असे. नलाच्या बाबतीत त्याच्या भावाने सांगून ठेवलेलं होतं, याला जो मदत करेल, त्याला मोठा दंड केला जाईल. त्यामुळे नलाला त्रास होणे स्वाभाविक. राम वनवासाला निघाला, तेव्हापासून त्याच्याबद्दल सर्वत्र सहानुभूती होती; कारण सारी प्रजा, राम राजा व्हावा या मताची होती. पण, रामाने नीती श्रेष्ठ मानून, वनगमनाचा मार्ग निवडला. त्याने आदर्श घालून दिला की, लोकमतापेक्षा नीती, धर्म उजवा असतो!
सत्ययुगात स्वराज्य व्यवस्था होती. जिथे स्वतःचे नियंत्रण स्वतःवर असते आणि स्वयंनियंत्रणाने सर्व व्यवहार चालतात, ते स्वराज्य होय. रामाच्या वेळी अशी स्वयंशासित प्रजा होती. प्रत्येक माणूस स्वतःच्या वाचनाने बांधलेला असे. जो तो योग्यरितीने आणि आपल्या मर्यादेत वागणार, त्याला दुसर्‍याच्या नियंत्रणाची गरज नाही, हा दंडक जर प्रजा सांभाळत असेल तर राजाला, राजकुमाराला तद्वत वागणे बंधनकारक! वनवासात निघण्याच्या आधीच रामाला सांगितले होते की, यापुढे नगरात राहायचे नाही, नागरी सुखे भोगायची नाहीत, वनात राहायचे आणि फक्त वन्य आहार घ्यायचा. ते ऐकून रामाने, ‘मी असाच वागेन’ असे वचन दिले होते आणि तसे कित्येक उल्लेख रामायणात सापडतात. रामाने वचन दिले म्हणजे तसे घडणारच, याबद्दल सर्वांची खात्री होती.

रामाला सर्व लोक हवी ती मदत द्यायला तयार होते; पण राम स्वतः नागरिकांनी दिलेले काहीही घेत नसत. सुग्रास अन्नाचा स्वीकार करत नसत. अयोध्येची सीमा ओलांडून दुसर्‍या राज्यात गेल्यावर राम ही बंधने शिथिल करू शकला असता, त्याला अडवणारे कुणीही नव्हते, तरीही त्याने वनवास व्रत कसोशीने पाळले. रामाने मनात आणले असते, तर या १४ वर्षांत एखाद्या नव्या प्रदेशावर सत्ता स्थापन करू शकला असता. रामाने तसे केले नाही, ही लक्षणीय बाब. लक्ष्मणाला वनवास नव्हता, म्हणून महत्त्वाच्या प्रसंगी रामाने लक्ष्मणाला नगरात पाठवले. गुहाच्या भेटीच्या वेळी असो किंवा सुग्रीवाच्या भेटीला राम स्वतः नगराबाहेर राहिला. लक्ष्मण एकटाच किष्किंधा किंवा लंका नगरीत गेला. विभीषणाच्या राज्याभिषेकाच्या वेळीसुद्धा रामाने लंकेत प्रवेश केला नाही. रामाने १४ वर्षे कोणत्याही नगरात पाय ठेवला नाही, त्यांनी पूर्ण १४ वर्षे नगराच्या बाहेर काढली. रामाचा आत्मसंयम विलक्षण आहे. स्वतःचा संयम, आत्मशासन किंवा आत्मसंयम आणि धर्मनीती याचा केवढा आदर्श रामाने घालून दिलाय.

धर्मशास्त्र असे सांगते की, वनवासाचा स्वीकार केल्यावर, त्या व्यक्तीने नगरात राहून जे भोजन करतात, त्याचा त्याग करावा. नागरिक ज्या वस्तूंचा उपभोग घेतात, त्याचाही त्याग करावा. इच्छा असेल तर पत्नीला सोबत घ्यावे किंवा मुलाजवळ ठेवावी. अरण्यात इंद्रियसंयम करून राहावे. फळे, फुले, शका यांच्या मदतीने पंच यज्ञ करावे. मृगचर्म, वल्कले, जटा धारण कराव्या. तीन वेळा मंगल स्नान करावे, श्मश्रू, नखे व केस वाढू द्यावेत. स्वतःसाठी खाण्याला जे मिळेल, त्याचा काही भाग दुसर्‍याला द्यावा. दान द्यावे, मात्र दान घेऊ नये, स्वीकारू नये. ऋतुकाली उत्पन्न होणारे, मुनींनी स्वीकार करायला योग्य असे जे अन्न त्याचाच स्वीकार करावा. मधु आणि मांस यांचा त्याग करावा. अपवित्र शाकभाज्याही घेऊ नयेत. अश्विन महिन्यात नवी वस्त्रे घ्यावीत, नांगरलेल्या जमिनीतील धान्य खाऊ नये, झाडावर पिकलेली फुले, फळे, आणि इतर मुळे सेवन करावीत.

राम वनवासाला निघाला, तेव्हा त्याने लक्ष्मणाला आज्ञा केली की, दोन धनुष्ये, दोन्हीची कवचे, बाणांनी भरलेले भाते आणि आचार्यांच्या घरी ठेवलेली खडगे घेऊन ये. लक्ष्मण ते घेऊन आला. कुदळ आणि पेटारा आणण्यात आला. रामाने त्यानंतर वल्कले मागून घेतली. लक्ष्मणाने सोबत कुर्‍हाड घेतली. सीतेला वनवास सक्तीचा नव्हता. त्यामुळे कुलगुरू वसिष्ठांच्या आज्ञेनुसार सीतेसाठी वस्त्रे आणून, आभूषणे घेऊन राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात निघाले. वनात गेल्यावर लागणारी पुरेशी सामग्री सोबत होती; पण तिकडे गेल्यावर भोजन काय करायचे, हा प्रश्न होताच. त्याबद्दल रामाची भूमिका आधीपासून स्पष्ट दिसते. वनवासात निघण्यापूर्वी राम कौसल्येच्या महालात गेला, तेव्हाच त्याने तिला सांगितले होते, “मी राज्यभोग्य वस्तूंचा त्याग करून, एखाद्या मुनीप्रमाणे कंदमुळे आणि फळे भक्षण करून जीवन निर्वाह करेन आणि १४ वर्षे निर्जन वनामध्ये वास करेन.“

चतुर्दश हि वर्षाणि वत्स्यामि विजने वने।
मधुमूलफलैर्जीवन्हित्वा मुनिवदामिषम्॥२९॥ (अयोध्या.२० )
पुढे उल्लेख आहे की, आसेवमानोवन्यानिफलमूलैश्चवर्तयन - वनवासातील जेवणाबद्दल बोलताना सीता सांगते आहे, ‘फलमुलाशनानित्यंभविष्यामि न संशय: ।२१। (अयोध्या.२७)’ वनवासाचे जीवन कसे असते, याचे वर्णन करताना, रामाने सीतेला तिथे फक्त कंदमुळे आणि फळांवर भोजन भागवावे लागते, याची जाणीव करून दिली आहे. (अयोध्याकांड १६, १७ श्लोक)राम सीतेला म्हणतो की, ”निबार म्हणजे आपोआप उगवणारे तृणधान्य. तेच वनवासी लोकांचे मुख्य अन्न असते.“

भुक्त्वाशनंविशालाक्षीसुपदंशान्वितंशुभम्। वन्यंनैवारमाहारंकथसीतोपभोक्ष्यते॥ (अयोध्या सर्ग ६१)
चमचमीत चटण्या आणि कोशिंबिरी यांनी युक्त भोजन खाण्याची सवय असलेली सीता वनातील निवार -सावे कसे बरे खाईल? साव्याचे पीठ, साव्याचे तांदूळ, वर्‍या, शिंगाड्याचे पीठ, इंगुदी फळांचे पीठ इत्यादी शुष्क नीरस अन्न वनात मिळणार, ते सीतेला कसे बरे आवडेल?) सीतेनेही रामाला मी ते भक्षण करण्यास तयार आहे, याबद्दल सनद संमती दिली आहे. (अयोध्या ३० सर्ग श्लोक १५) सीता म्हणाली आहे, ‘पत्रं मूलं फलं यत्तूअल्पं वा यदि वा बहु।’ पाने, मुळे, अथवा फळे यापैकी जे थोडे बहुत आपन्न स्वतः मला आणून द्याल, तेच मला अमृतासारखे होईल.

गुहा आणि त्याचे नावाडी रामाला गंगापार घेऊन जात होते, तेव्हा त्यांनी आणलेले सुमधुर भोजन रामाने नम्रतेने नाकारले आहे, याचे एकमेव कारण वनवासी मनुष्याचा तो आहार नाही. रामावर वनवासाची बंधने होती; पण लक्ष्मणाने आणि सीतेने हे अन्न घ्यायला काय हरकत? पण, तरीही त्या दोघांनीसुद्धा वनवासात सुग्रास अन्न घेतले नाही, हे विशेष. भारद्वाज मुनींच्या आश्रमात तर रामांच्या स्वागतासाठी वनातील फळे आणि मुळे यांच्या योगाने तयार केलेले नाना प्रकारचे अन्नरस त्यांनी राम-लक्ष्मणाला दिले आणि रामांनी ते ग्रहण केले. कारण, ते धर्मशास्त्राच्या चौकटीत बसणारे होते. रामाच्या शाका-फल-भक्षणाचे उल्लेख रामायणात सात वेळा आलेले आहेत.
 
चित्रकुटावरील वातावरण रमणीय होते, तिथे राम, लक्ष्मण, सीता मुक्कामी राहिले. या वनवासात शहरी ऐशआराम नव्हते; पण राज्यातील ईर्षाद्वेष यांनाही जागा नव्हती. चित्रकुटावरचा वनवास हा शरीर-मन बुद्धी यांचे पोषण करणारा होता. राजकुमार या दृष्टीने तो त्रासाचा असेलही; पण माणसाच्या मूलभूत गरजा भागवून नराचा नारायण होण्यास साहाय्य करणारा होता. धर्मशास्त्राने जे नियम घालून दिले आहेत, त्याच्या चौकटीत राहून रामाने वनवास व्यतीत केला, हेच यावरून सिद्ध होते.

राम वनवासात आला, याचा आनंद ऋषीकुलाला झाला, हे मात्र नक्की. त्यांच्यापैकी अनेकांनी असे म्हटले आहे की, रामाचा वनवास राक्षसांच्या क्षयाला आणि राष्ट्राच्या वृद्धीला कारण ठरेल, झालेही तसेच. रामाच्या हातून रावणवधाचे महत्कार्य याच वनवासात पार पडले. वनवासात राम ऋषींच्या सान्निध्यात राहिला. ऋषींनी आपल्या आश्रमात त्याचे स्वागत केले आणि अनेकदा तर ऋषींनी त्याला दिव्यायुधे अर्पण केली. वनात असणार्‍या राक्षसांची जाणीव त्याला झाली आणि ‘क्षत्रिय राजपुरूष’ म्हणून त्यांचा बिमोड करावा, यासाठी राम सज्ज झाला. पुढे सीताहरणानंतर त्याचा संबंध वनातील विविध नगर जमातींशी आला, अशावेळी वर्णभेद दूर सारून रामाने सैन्यरचना केली, वानरसमूह एकत्र केला. एका क्षत्रिय राजपुरुषाच्या सैन्यात लक्ष्मण सोडला, तर अयोध्येचा एकही सगोत्री सैनिक नाही. राम तर अयोध्येचा आहे, आपण त्याच्यासाठी का लढावे, असा प्रश्न पुढे दक्षिण भारतातील ना त्या वानरांना पडला ना त्या राजांना! राम हा अयोध्येचा युवराज राहिला नाही, तो एक कर्तृत्ववान, बलवान, आणि खलांचे निर्दालन करणारा, सनातन धर्मध्वज मिरवणारा महापुरूष असल्याने अवघे भारतवर्ष त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि रामाच्या नेतृत्वात भारतवर्षाने पहिल्यांदाच सागर उल्लंघून परराष्ट्रावर यशस्वी आक्रमण केले.

पण, कालौघात समाजाची मानसिकता कशी बदलली बघा. आत्मनियंत्रण असणारे स्वराज्य ही संकल्पना मागे पडून, आपल्यावर दुसर्‍याने नियंत्रण ठेवले, तरच नीट आचरण घडते, अशी विचारसरणी वाढली. सात कुलपांच्या आड बंदिस्त असलेला कैदी आजच्या काळात फरार होतो. राम वनात असताना, त्याच्यावर कुणाचीही देखरेख नसताना, आपण आपण घेतलेले व्रत आणि दिलेली वचने कसोशीने पाळतो. आपला राम धर्माचरणी आहे, हे समजल्यावर अवघे राष्ट्र त्याच्या पाठीशी उभे राहते. या दोन युगांमधला हा फरक चिंतन करण्यासारखा आहे. उद्याचा अयोध्येचा राजा ही बंधने सानंद पाळतो, हे उदाहरण कलियुगातील राजनेत्यांनी समोर ठेवले तर काय बहार येईल!

राजनेते असोत किंवा प्रजा, मानवी वृत्ती तीच! सत्वाबरोबर रजोगुण आणि तमोगुण प्रत्येकात अंशतःअसतातच. अशा वेळी धर्माचरण करणार्‍या दशरथ, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या आदर्श कहाण्या पुनःपुन्हा लोकांना सांगाव्या लागतात. सध्या हिंदुस्थानात सुरू असलेला ‘रामगौरव’ हा एका अर्थाने सत्वबहुल समाज घडवण्याच्या दृष्टीने पुढे पडलेले सर्वसमावेशक पाऊल आहे. रघुवंशाने जो आदर्श आपल्यापुढे घालून दिलाय, तो पुढच्या पिढ्यांना सांगून सत्वाचा उदयोस्तु करूया, हे राष्ट्र राममय करूया!


पार्थ बावस्कर
९१४६०१४९८९
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121