एकीकडे अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होत असताना, दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सुवार्ता कानी आली. सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर बाजारमूल्यानुसार, भारतीय शेअर बाजार हाँगकाँगच्या शेअर बाजाराला मागे टाकत, चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्यानिमित्ताने भारतीय शेअर बाजाराच्या या कौतुकास्पद कामगिरीचे केलेले आकलन...
न संपणारे रशिया-युक्रेन युद्ध, मागील चार महिन्यांपासून धुमसणारा इस्रायल-हमास संघर्ष आणि त्यातून जगाची तेलाची तहान भागवणार्या पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेली अशांतता, या सर्व जागतिक घडामोडींवर नजर टाकल्यास, सगळीकडेच नकारात्मकतेचे वातावरण पसरलेले. पण, या नकारात्मक वातावरणातसुद्धा भारतीय अर्थव्यवस्था न डगमगता, यशस्वी वाटचाल करताना दिसते. त्यामुळेच भारतातील आणि परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास भारतीय अर्थव्यवस्थेवर वाढत आहे. हा दिवसेंदिवस वृद्धिंगत झालेला विश्वासच भारतीय शेअर बाजारातील विक्रमी गुंतवणुकीतून प्रतिबिंबित झाला आहे.
भारतीय शेअर बाजार विक्रमी घोडदौड करत, नवनवे विक्रम रचत आहे. दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय शेअर बाजाराच्या एकत्रित बाजारमूल्याने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला होता. विशेष म्हणजे, या चार ट्रिलियनमधील निम्म्या रकमेची म्हणजेच दोन ट्रिलियन डॉलरची भर मागच्या चार वर्षांत पडली. यावरून आपल्या लक्षात येईल की, भारतीय शेअर बाजार किती झपाट्याने उच्चांकी झेप घेत आहे. त्यातच आता भारतीय शेअर बाजार मूल्यानुसार, हाँगकाँगच्या शेअर बाजाराला मागे टाकत, चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सोमवार, दि. २२ जानेवारीला भारतीय शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्सचे एकत्रित बाजार मूल्य ४.३३ ट्रिलियन डॉलर इतके होते, तर त्याचवेळी हाँगकाँगच्या शेअर बाजाराचे एकत्रित बाजार मूल्य ४.२९ ट्रिलियन डॉलर इतके नोंदवले गेले. यामुळे भारतीय शेअर बाजार हाँगकाँगला मागे टाकत, जगातला चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला. कोणाच्याही पुढे जाण्यासाठी एक तर आपल्याला चांगली कामगिरी करावी लागते, नाही तर दुसर्याने खराब कामगिरी केल्याचा फायदा आपल्याला मिळाला, तर आपण पुढे जाऊ शकतो. या प्रकरणात दोन्ही गोष्टी घडल्या, असे म्हणता येईल.
मागील दशकभरात भारत सरकारचे उद्योगस्नेही धोरण, पायाभूत सुविधांचा विकास, ‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह’ (पीएलआय) योजना, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारत जागतिक पातळीवर उद्योजकांसाठी आकर्षक गुंतवणूक स्थळ ठरला आहे. यामुळेच भारताची गणना मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगाने विकास करणारा देश म्हणून आवर्जून केली जाते. भारताच्या वेगाने विकसित होणार्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी देशातील आणि परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराच्या एकत्रित बाजारमूल्यात झपाट्याने वाढ होताना दिसते.
२०२३ मध्ये परदेशातील गुंतवणूक फंडांनी भारतीय शेअर बाजारामध्ये तब्बल २१ अब्ज डॉलरपेक्षा जास्त रक्कम गुंतवली. याउलट चीनमध्ये डाव्या पक्षाच्या एकहाती वर्चस्वातून निर्माण झालेल्या हुकूमशाहीचा फटका हाँगकाँगच्या शेअर बाजाराला बसला. १९९७ पर्यंत ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग जगातील एक प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून उदयास आले होते. पण, आता चीनच्या कम्युनिस्ट साखळदंडात अडकल्यामुळे हाँगकाँगची ती ओळख पुसली जात आहे.
हाँगकाँगच्या शेअर बाजाराच्या पिछेहाटीचे कारणसुद्धा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगच. चीनमध्ये ’कोरोना’ रोखण्यासाठी अमलात आणले जात असलेले अविचारी लॉकडाऊन, उद्योजकांवर करण्यात येत असलेली कारवाई, रिअल इस्टेट क्षेत्राचे आणि बँकिंग व्यवस्थेचे संकट, राजकीय अस्थिरतेचे वातावरण आणि पाश्चिमात्य देशांसोबत सुरू असलेला भू-राजकीय संघर्ष यांमुळे चीनची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा चीनच्या अर्थव्यवस्थेवरील विश्वास कमी झाला. याचाच विपरित परिणाम हाँगकाँगच्या शेअर बाजारावरही प्रकर्षाने दिसून आला.
आजतागयत हाँगकाँगचा शेअर बाजार हा चिनी कंपन्यांना आणि परदेशी गुंतवणूकदारांना जोडणारा दुवा मानला जात होता. पण, आता चिनी कंपन्यांवरील गरजेपेक्षा जास्त अवलंबित्व हाँगकाँगच्या शेअर बाजाराला महागात पडत आहे. २०२१ पासून, हाँगकाँगच्या शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य सहा ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त घसरले आहे. दुसरीकडे भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांना सलग आठव्या वर्षी फायदा मिळवून देत आहे.
हाँगकाँगच्या शेअर बाजारात चीन कंपन्यांच्या बाजारमूल्याची माहिती देण्यासाठी ‘हँग सेंग चायना एंटरप्रायझेस इंडेक्स’ आहे. हा इंडेक्स जानेवारीमध्येच दहा टक्क्यांनी खाली आला. यावरून चिनी कंपन्यांची दुर्दशा लक्षात यावी. चिनी कंपन्यांची ही दुर्दशा रोखण्यासाठी चीनचे सरकार उपाययोजना आखत आहे. पण, त्यांच्या अविचारी डाव्या धोरणांच्या उपाययोजना चिनी उद्योजकांसाठी ’रोगापेक्षा इलाज भयंकर’ सिद्ध होत आहेत. त्यामुळे चीनच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला सावरणे आता अशक्यच. दुसरीकडे, जागतिक वित्त संस्थांच्या अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड अशीच सुरू राहील.
जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनणे, ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फक्त एक सुरुवात आहे. खरं लक्ष्य तर चीनला मागे टाकून, जगातील क्रमांक दोनची अर्थव्यवस्था म्हणून नावारुपास येण्याचे. ‘विकसित भारता’ची उद्दिष्टपूर्ती म्हणूनच अशा ऐतिहासिक टप्प्यांमधून साकार होत असल्याचे आणि देश योग्य हातात, योग्य मार्गावर असल्याचेच हे शुभसंकेत!
श्रेयश खरात