मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक जोड्या या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशीच एक लोकप्रिय नवरा-बायकोची जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. प्रिया आणि उमेश तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर ‘जर तरची गोष्ट’ हे नवं कोरं नाटक घेऊन आले आहेत. आजच्या तरुण पिढीसाठी हे खास नाटक असून या नाटकाचा शुभारंभ आज, शनिवार, दि. ५ ऑगस्टपासून होणार आहे. यानिमित्ताने प्रिया-उमेशसोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...
आमची पात्र वाद मिटवण्यास मदत करतात
‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया-उमेश पुन्हा एकदा आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे नाटक सादर करणार आहे. अर्थात, खर्या आयुष्यातही दोघे पती-पत्नी असल्यामुळे वाद-विवाद होणे साहाजिकच. परंतु, घरच्या वादाचा नाटकांच्या तालमीवर किंवा नाटकांच्या प्रयोगांवर परिणाम होतो का, असा प्रश्न विचारल्यावर उमेश म्हणतो, “प्रयोगाआधी किंवा तालमीच्या आधी भांडण झालं असेल आणि त्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रयोगासाठी उभे राहात असू, त्यावेळी आमची नाटकतील पात्रे आम्हाला आमच्यातील वाद विरुन जाण्यास मदत करतात,” तर प्रियाने ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकाचा एक किस्सा सांगत, “बर्याचदा आम्ही घरी भांडून यायचो आणि नाटक करताना आमचा तो वाद संपून जायचा. त्यामुळे पती-पत्नी ताकदीचे कलाकार असतील, तेव्हा अभिनय आणि आपण साकारत असलेली व्यक्तिरेखा आपले नाते अधिक घट्ट करण्यास नक्कीच मदत करते.”
हिंदी मनोरंजनसृष्टीची ओढ म्हणूनच लागली...
मराठी मालिका, चित्रपट, नाटक या सर्व व्यासपीठांवर आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकप्रियता कमावलेली प्रिया सध्या हिंदी मनोरंजनसृष्टीतही उत्तम काम करताना दिसते. विविधांगी भूमिका साकारणारी प्रिया नुकतीच ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ आणि ‘रफुचक्कर’ या दोन वेब मालिकांमध्ये झळकली होती. हिंदीत काम करतानाचा अनुभव सांगत प्रिया म्हणाली की, “सध्या हिंदीत मी जी दोन कामं केली, ती मला माझ्या मागच्या दहा वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत मराठीत कुणीही विचारणा केली नाही किंवा तशी गोष्ट, व्यक्तिरेखा माझा विचार करुन लिहिली नाही किंवा माझ्यापर्यंत आलेली नाही. पण, जी पात्रं मी आता हिंदीत करत आहे, त्या भूमिका मी आजवर केल्या नाही आणि कलाकार म्हणून त्या भूमिका साकारणं आणि त्याही वेगळ्या भाषेत साकारणं, हे फार आव्हानात्मक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माध्यम आणि भाषा वेगळी असल्यामुळे अधिक मोठ्या प्रेक्षकांच्या आवाक्यापर्यंत तुम्हाला पोहोचता येते आणि त्याचमुळे मला हिंदी मनोरंजनसृष्टीची ओढ लागली,” अशी कबुली प्रियाने दिली, तर ताकदीची कथा किंवा संहिता न मिळाल्यास वाटेल ती भूमिका हिंदीतही करणार नसल्याचेही प्रियाने अगदी ठामपणे सांगितले. जिथे काम आवडेल आणि भूमिका आवडेल तेच करायचं, असा माझा हट्ट असल्यामुळेच पुन्हा नाटकाकडे वळल्याचेही प्रिया म्हणाली.
आपल्या भाषेत गोष्ट सांगायचा अट्टहास
‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाच्या निमित्ताने प्रिया निर्मिती क्षेत्रात आली. त्यामुळे ज्यावेळी या नाटकाची निर्मिती केली, त्यावेळी असे लक्षात आले की, “आपल्याला हवी ती गोष्ट आपण आपल्या भाषेत सांगू शकतो आणि त्यामागे निर्माती म्हणूनही ठामपणे उभी राहू शकते आणि त्याचमुळे पुन्हा नाटक निर्मितीचा विचार केला. कारण, मला जी गोष्ट सांगायची आहे, ती चित्रपटाच्या माध्यमातून मी निर्माती म्हणून सांगू शकेन की नाही, याची मला खात्री नाही. पण, जी गोष्ट मी माझ्या भाषेत सांगू शकते, मी तीच भाषा आणि माध्यम आवर्जून निवडले आहे,” असेही प्रियाने यावेळी सांगितले.
...म्हणूनच उमेशसोबत ओळख वाढवली
नातेसंबंधांवर भाष्य करणारी अनेक नाटकं, चित्रपट येत असतात आणि यातूनच प्रत्येक नातं हे मैत्री आणि विश्वासावर कसे टिकून राहते, याची शिकवण प्रत्येक माध्यमातून दिली जाते. याच मैत्रीबद्दल बोलताना उमेश म्हणाला की, “आमच्यात इतकी वर्षं मैत्री कायम टिकून आहे. जरी आम्ही एका नात्यात असलो, तरी आम्ही सहकलाकार आणि मित्र आहोत. त्यामुळे आमच्यात ठरवून काही घडलं नाही. जशा घटना आमच्या आयुष्यात घडत गेल्या, त्या आम्ही आमच्या स्वभावाप्रमाणे आणि नात्यांप्रमाणे जगत गेलो.” मात्र, यावर प्रियाने, “माझं उमेशवर प्रेम होतं म्हणूनच ओळख वाढवली आणि मैत्री केली याची कबुली दिली.”