शेअर बाजारातील ‘वाघ’

    27-Dec-2023
Total Views | 101
article on Indian stock markets are witnessing an IPO surge


मावळते वर्ष चोखंदळ गुंतवणूकदारांसाठी अनेकार्थांनी लाभदायी ठरले. त्यामुळे ते मालामाल झाले. २०२३ या वर्षात थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १७३ लहान आणि मध्यम स्वरुपातील आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) बाजारात आले. ज्यांनी त्यात गुंतवणूक केली, त्यांना चांगल्या स्वरुपात परतावाही मिळाला. भारतीय अर्थव्यवस्था सद्यःस्थितीत गतिमान अवस्थेत आहे. देशाचा जीडीपी म्हणजेच ६.३ असून, तो अन्य देशांच्या तुलनेत गतिमान आहे. भारताने आगामी काळात पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य निश्चित केले आहे. सद्यःस्थितीत भारताच्या पुढे असलेल्या जर्मनी आणि जपानला मागे टाकण्यासाठी, भारताला २०२५ची अखेर किंवा २०२६ची वाट पाहावी लागणार आहे. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर किती पटींनी विकासात्मक असेल, याची कल्पनाही करवत नाही.देशात स्थिर आणि विकासात्मक सरकार असल्यामुळे भारताचा जीडीपी आपले लक्ष्य गाठत आहे. त्याचा परिणाम देश-विदेशात दिसून येत आहे. कधी काळी भारताची अर्थव्यवस्था सांभाळणारे, मोठमोठे अर्थतज्ज्ञ होते, त्या काळात भारताचा जीडीपी गंटागळ्या खात होता. आज मात्र स्थिर आणि विकासात्मक वाटचाल सुरू आहे. हे सारे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमला द्यावे लागेल. भारताच्या विकासाच्या या गंगाजळीत शेअर बाजाराने विक्रमी उच्चांकी गाठत, देश-विदेशातील भांडवलदार आणि गुंतवणूकदार यांना आकर्षित केले आहे. त्यातूनच कधी नव्हे, ते १७३ आयपीओ वर्षभरात बाजारात आले. त्यातून भांडवलदारांना निधी मिळाला, तर गुंतवणूकदार मालामाल झाले. आगामी २०२४ हे वर्षे निवडणुकीचे असल्यामुळे, पहिले सहा महिने बाजारपेठेत काहीसे चढ-उतार अनुभवले जातील. त्या कालावधीत गुंतवणूकदार सावध भूमिका घेतील. मात्र, त्यानंतरच्या काळात २०२३ पेक्षाही अधिक आयपीओ बाजारपेठेत येतील आणि त्यात गुंतवणूक करणारे अर्थजगतातील ‘वाघ’ ठरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसर्‍या क्रमांकावर झेप घेणार असल्याचे स्पष्ट झाल्याने, सारे काही आलबेल आहे.

विक्रमी उच्चांकी निर्देशांक

देशातील शेअर बाजार यंदाच्या वर्षात विक्रमी उच्चांकी गाठत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘बीएसई’ने विक्रमी ७२ हजारांचा पल्ला गाठला असताना, राष्ट्रीय शेअर निर्देशांक ‘निफ्टी’ची २१ हजार, ५००च्या पुढे घोडदौड सुरू आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय शेअर बाजारात तेजी सुरू आहे. भांडवलदार आणि गुुंतवणूकदार यांचा वाढत असलेला विश्वास पाहता, येत्या काळात ‘बीएसई’ ७५ हजार आणि ‘निफ्टी’ २५ हजारांचा पल्ला सहज पार करेल, असे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था एकीकडे गतिमान अवस्थेत आहे, तर दुसरीकडे शेअर बाजारही प्रचंड तेजीत आहे. त्यामुळे येता काळ अर्थजगतासाठी सुगीचा काळ ठरणार आहे. अमेरिका आणि युरोपसह जगातील अन्य शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. त्यात जपान आणि जर्मनीचा अपवाद वगळता सर्वत्र अर्थसंकट वाढत आहे. त्यातच युक्रेन-रशिया आणि इस्रायल-’हमास’ युद्धामुळे दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. या सर्व संघर्षात भारताने कधी तटस्थ तर कधी परिस्थितीनुसार भूमिका घेतली. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर किंचितसाही परिणाम झाला नाही. एवढेच नाही तर अमेरिका चीनसह अन्य देश अद्याप कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाशी मुकाबला करत आहेत. मात्र, भारताची अर्थव्यवस्था गतिमान आहे. त्यातूनच जागतिक क्रमवारीत भारत ११व्या क्रमांकावरून पाचव्या आणि तेथून थेट तिसर्‍या क्रमांकावर झेप घेण्याच्या तयारीत आहे. स्थिर अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार यांचा थेट संबंध असतो. त्यासोबत स्थिर आणि विकासात्मक सरकार असेल, तर त्यास अधिक प्रोत्साहन मिळते. याचे उदाहरण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था म्हणता येईल. त्याचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटत असल्यामुळे, २०२३च्या सुरुवातीला ‘बीएसई’चा निर्देशांक ६० हजारांवर होता, तो आजघडीला ७० हजारांच्या पुढे गेला आहे. सोने-चांदीचे दरही जवळपास स्थिर आहेत, तर परकीय चलनही आवाक्यात आहे. एकंदरीतच शेअर बाजारात ‘ऑल इज वेल’ स्थिती आहे. त्यामुळे गुंंतवणूकदारांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्यातूनच शेअर निर्देशांकाने विक्रमी उच्चांकी गाठली आहे.

मदन बडगुजर


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121