आज दि. २६ डिसेंबर म्हणजे ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक अध्यक्ष वनयोगी रमाकांत केशव देशपांडे उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांची जयंती आणि ‘वनवासी कल्याण आश्रमा’चा स्थापना दिन. त्यानिमित्ताने बाळासाहेबांनी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून उभारलेल्या समाजहित, राष्ट्रहिताला समर्पित कार्याचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरावे.
’वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक अध्यक्ष वनयोगी रमाकांत केशव देशपांडे उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांचा जन्म दि. २६ डिसेंबर १९१३ रोजी अमरावती येथे झाला. बाळासाहेबांचे वडील तुरुंगाधिकारी होते. त्यामुळे बरेचदा बाळासाहेबांचेही तुरुंगामध्ये येणे-जाणे व्हायचे. तिथे त्यांची अनेक स्वातंत्र्यसैनिकांशी भेटही होत असते. एवढेच नाही, तर बाळासाहेब चक्क त्या स्वातंत्र्यसैनिकांबरोबर व्यायामही करायचे. अगदी न चूकता दररोज ते व्यायामशाळेत जायचे. म्हणूनच त्यांचे शरीर कसलेले होते. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी स्वामी विवेकानंदांचे चरित्र बाळासाहेबांनी वाचून काढले. त्यातून ’दरिद्री नारायणाची सेवा’ हा मंत्र त्यांच्या मनावर कोरला गेला. १९२६ साली परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांचा बाळासाहेबांना परीसस्पर्श झाला आणि मग आपसुकच देशभक्तीचे, सामाजिकतेचे संस्कार प्राप्त होत गेले.
एकदा मोठ्या भावाबरोबर बसमधून जात असताना, रस्त्यात काही गायी, इतर जनावरं चालली होती. बसचा चालक मुसलमान होता. त्या गायींवरून तो चालक हिंदू समाजाची टिंगलटवाळी आणि शिवीगाळ करत होता. बाळासाहेबांनी त्याला चांगलेच बकोतीला पकडले व दोन सणसणीत मुस्कटात मारल्या व त्याचे डोके ठिकाणावर आणले.
’एमएलएलबी’ झाल्यावर काही दिवस प्रपंचाची गरज म्हणून रेशन अधिकार्याची नोकरी करत असताना, एका व्यापार्याला भ्रष्टाचार, अफरातफर करताना बाळासाहेबांनी पकडले. बाळासाहेबांना अन्याय, खोटेपणा वगैरे अजिबात सहन होत नव्हता. परंतु, वरच्या अधिकार्यांची मिलीभगत असल्याने तो भ्रष्ट अधिकारी मात्र सपशेल सुटला. बाळासाहेबांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला; पण नंतर न्यायालयात त्या व्यापार्याच्या विरोधात खटलाही दाखल केला. पुरावे सादर केले. त्या दोषी अधिकार्याला शिक्षाही झाली. नागपूरच्या वृत्तपत्रांत त्याच्या सुरस कहाण्याही तेव्हा प्रसिद्ध झाल्या होत्या. परमपूजनीय श्रीगुरुजींनी त्यावेळी बाळासाहेबांचे अभिनंदनही केले होते.
आपले मामा गंगाधरराव देवरस यांच्याबरोबर रामटेकमध्ये बाळासाहेबांनी वकिलीला प्रारंभ केला. पुढे रामटेकमध्ये १९४२च्या ’भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला व त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, मे १९४८ रोजी बाळासाहेबांची नियुक्ती त्या वेळच्या मध्य प्रदेशात वनवासीबहुल क्षेत्र असलेल्या जशपूर नगर येथे मागासवर्गीय जाती कल्याण विभागात क्षेत्रीय अधिकारी म्हणून झाली. त्यावेळी अवघ्या एका वर्षात बाळासाहेबांनी १०८ विद्यालयांचा शुभारंभ केला. बाळासाहेबांच्या या समाजहितैषी कृत्याने गांधीवादी समाजसेवी पूज्य ठक्करबाप्पा प्रसन्न झाले. तसे या ठिकाणची ‘इसाई मिशन’ची दहशतही बाळासाहेबांनी समाप्त केली. स्वाभाविकपणे ‘इसाई मिशन’ यामुळे नाराज होती. पुढे १९५२च्या निवडणुका आल्या. तुष्टीकरणाच्या नीतीमुळे खोटेनाटे आरोप लावून, बाळासाहेबांची बदली गडचिरोलीत झाली. त्याविरुद्ध लढा देऊन, आरोपमुक्त झालेल्या बाळासाहेबांनी शासनाने पुन्हा सन्मानाने जशपूरनगरला पाठवले.
रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक परम पूजनीय गुरुजींच्या बरोबर विचारविनिमय करून, नोकरीचा राजीनामा देऊन, जशपूर नगरलाच मग बाळासाहेबांनी वकिली प्रारंभ केली. परंतु, वकिली हे केवळ एक माध्यम होते, उद्देश होता निर्धन, अशिक्षित वनवासी बंधूंच्या सर्वांगीण विकासाचा!
दि. २६ डिसेंबर १९५२ रोजी जशपूरचे राजे श्रीमंत विजयभूषण सिंह देवांच्या सहयोगाने एक विद्यालय व छात्रावासाचा बाळसाहेबांनी प्रारंभ केला. सुरुवातीला १३ वनवासी, जनजाती बालक या विद्यालयात सहभागी झाले. छात्रावासासाठी राजमहालाच्या काही खोल्या राजेंनी दिल्या होत्या. अशा प्रकारे ’वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्य प्रारंभ झाले. दि. ९ ऑक्टोबर १९५६ साली आश्रम नोंदणीकृत झाला. जशपूरमध्ये भोळ्या, अशिक्षित जनतेच्या निर्धनतेचा लाभ उठवत, ख्रिश्चन धर्मांतरणाचे षड्यंत्र त्यावेळी जोमात होते. मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांनी १९५४ साली ख्रिश्चन मिशनर्यांच्या देशविरोधी कारवायांच्या चौकशीसाठी ’नियोगी कमिशन’ची स्थापनाही केली. ५०० पानांची लिखित माहिती त्यांनी आयोगाला दिली व ’नियोगी कमिशन’ने तपास करून, आपला अहवाल सरकारला दिला. त्यात हे सिद्ध झाले की, इसाई चर्च वाममार्गाने कार्य करत होती. सुरुवातीला अथक प्रयत्नाने शिक्षण, स्वास्थ्यसेवा, संस्कार, खेलकूद, श्रद्धा जागरण केंद्र सुरू झाले. संत महंत गावागावात जाऊ लागले. दहशत कमी होऊ लागली आणि कार्यकर्ता मिळू लागले.
पण, म्हणतात ना, चांगल्या कामाला संकटे खूप येतात. १९७५ साली आणीबाणी लागू झाली. तेव्हा बाळासाहेबांना जेलयात्रा झाली. पुढे १९७८ साली ’वनवासी कल्याण आश्रमा’ला बाळासाहेबांनी अखिल भारतीय रूप दिले आणि आज कल्याण आश्रमाचे देशभरात हजारो प्रकल्प चालू आहेत.
’वनवासी कल्याण आश्रमा’ची ख्याती ऐकून देशाचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई आश्रमाचे कार्य बघण्यासाठी जशपूरला आले. आश्रमाचे कार्य बघून तेही प्रभावित झाले. त्यांनी बाळासाहेबांना सरकारी मदत घेण्याचा पुन्हा आग्रह केला. पण, बाळासाहेबांनी त्यासाठी नम्रपणे नकार दिला. संघटन अखिल भारतीय झाल्यावर, बाळासाहेबांनी संपूर्ण भारतात प्रवास केला. उत्तर पूर्वांचलात प्रवास केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व संघटन विस्तार केला. आज शिक्षण, आरोग्य, श्रद्धा, खेलकूद, हितरक्षा, ग्रामविकास, लोककला, प्रचारप्रसार अशा अनेक आयामांद्वारे आश्रमाचे कार्य अविरतपणे सुरु आहे.
जनजाती क्षेत्रात महिला कार्याचा देखील विस्तार झालेला दिसतो. भारतातले सर्व लोक हे मूळ निवासी आहेत, ही भूमिका विश्व स्तरावर कल्याण आश्रमाने अगदी प्रभावीपणे मांडली. त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांना निवेदन दिले. १९९३ साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व दायित्वांतून मुक्त होऊन, कार्यकारी अध्यक्ष जगदेव रामजींना आश्रमाचा कार्यभार बाळासाहेबांनी सुपूर्द केला. पुढे दि. २१ एप्रिल १९९५ला जशपूरनगरातच, त्यांच्या कर्मभूमीतच बाळासाहेबांचे देहावसान झाले. असा हा अनेकांना प्रेरणा देणारा कर्मयोगी, वनयोगी सदैव स्मरणात राहील. जनता जनार्दनाच्या सहयोगाने आज आसेतु हिमाचल कार्य वनवासी बंधूंच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून असंख्य हात पुढे नेत आहेत-
बूंद बूंद लहू दे अपना
सिंच गये यह हिंद चमन
जबतक जिंदा कलम रहेगी
याद करेगा तुम्हे वतन...
९४२१२५९३८६