काठमांडू : नेपाळमध्ये शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भुकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के नेपाळसह भारतातील अनेक भागांमध्ये जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील जाजरकोट जिल्ह्यात जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता.
नेपाळमधील भुकंपाचे धक्के उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान आणि हरियाणामध्ये जाणवले. या भूकंपात आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य अद्याप सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११.४७ वाजता नेपाळमध्ये भुकंप झाला आहे. या भूकंपामुळे जवळपास ४० सेकंद पृथ्वी हादरत होती. या भुकंपाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच मदत आणि बचाव कार्यासाठी सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेपाळमधील भूकंपामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत त्यांनी या दुःखाच्या प्रसंगी नेपाळला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.